-शर्मिला जगताप
“माणूस जगतो कशासाठी?’, “जगायचं कशासाठी?’ या प्रश्नांचा शोध “सुखाची दारं’ या पुस्तकात लेखक विश्वास वसेकर यांनी घेतला आहे. “जगावं कसं?’ याचेही दिग्दर्शन काही श्रेष्ठ कलाकृती घडवतात. परंतु जीवनाला सर्वांगांनी कसे भिडावे आणि आपले अवघे जगणेच कसे आनंदमय करावे, हे सांगणारी ललित कृती क्वचितच हाती लागते. नेमका हाच अनुभव विश्वास वसेकर यांच्या या ललित गद्य लेखनातून मिळतो. “सुखाची दारं’ किलकिली करणाचा लेखकाने प्रयत्न केला आहे.
विश्वास वसेकर हे कविवृत्तीचे आहेत. हा इहलोक लोभस आहे, आनंदाच्या कितीतरी परी इथे आहेत. या परी समजून घेत जगणे हेच मुळी काव्यमय आहे. जीवनातील सौंदर्याकडे ताजेपणाने आणि निकोपपणे पाहणारी निर्मळ दृष्टी आपल्याकडे हवी. कारण त्यामुळे ही “सुखाची दारं’ आनंदाच्या आवारात नेणारी आहेत.
“दुःख कुणाला हवं असतं? सुख कुणाला नको असतं? या प्रश्नरूपाने या ललित गद्याच्या आविष्काराला आरंभ होतो आणि सुखाचे रहस्य उलगडता उलगडता सुखाचे सकारात्मक जाणिवेने ओथंबलेले तत्त्वज्ञान वाचकांसमोर उभे राहते. सुख-दुःखाचे रहस्य मूलतः आपल्या स्वभावातच दडलेले असते. जो आयुष्यात सुखाचा गुणाकार आणि दुःखाचा भागाकार साधतो तोच आनंदाच्या डहाळीवर बसून जीवनाचे गाणे गाऊ लागतो. सुखाचे हे सरळसाधे तत्त्वज्ञान लेखक अतिशय सहजपणाने वाचकांसमोर ठेवतात.
“पूर्व वसंत हा भोगी असतो तर उत्तर वसंत हा जोगी असतो’, अशा वाक्यांमधून लेखकाचे निसर्गाचे निरीक्षण प्रतिबिंबित होते. या पुस्तकातील “दवबिंदू’ हा लेखही अभिजात रसिकतेने ओथंबलेला आहे. दवाच्या इवल्याशा थेंबात आकाश सामावलेले दिसावे, त्याप्रमाणे कितीतरी विशाल आणि निरभ्र जीवनसत्य त्यातून व्यक्त होताना दिसते. शेवटचा लेख आहे तो “डेथ फेस्टिव्हल’ या शीर्षकाचा.
या लेखाने, त्यातल्या तत्त्वदृष्टीने ही अवघी आनंदयात्रा अधिक अर्थपूर्ण झाली आहे. जीवनातील सौंदर्याचा, आनंदाचा उद्घोष करीतच गौतम बुद्धांनी, आचार्य रजनीशांनी या इहलोकाचा निरोप घेतला. जीवनाचा उत्सव करणाऱ्यांनी मरणाचा महोत्सव पाहिला. त्यांच्या या दृष्टिकोनाने मरणालाही जीवनाचे गाणे गायला लावले. शेवटचा दिवसही गोड व्हावा, हा पुकारा लेखकाच्या आनंदव्रती लेखणीने केला आहे. त्यातले मर्म जाणणे महत्त्वाचे आहे.
“सुखाची दारं’ हा ललितगद्य संग्रह म्हणजे जणू नानाविध सुगंधाचे कलंडलेले घडे होत. जो या सुखाच्या दारातून जाईल त्याचे जीवन या परिमलाचा सुखद अनुभव घेईल.