2021 या नवीन वर्षातील पहिले तीन महिने संपत येत असतानाच करोना महामारीचे संकट काही संपायला तयार नाही. आता या महामारीची दुसरी लाट आली आहे की काय, अशी शंका घेण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषत: महाराष्ट्रातील परिस्थिती अधिकच बिकट आणि चिंताजनक आहे. वर्षभराच्या कालावधीतील आकडेवारी पाहिली असता देशात सर्वात जास्त रुग्णांची संख्या महाराष्ट्रातच होती. आता या महामारीवर नियंत्रण मिळवले आहे, असे म्हणत असतानाच रुग्णांची संख्या वाढण्यात पुन्हा एकदा महाराष्ट्राचा हातभार सर्वाधिक आहे.
देशातील इतर अनेक मोठ्या राज्यांमध्ये या महामारीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात आले आहे. तेथील रुग्णांची संख्याही घटत्या प्रमाणात आहे पण महाराष्ट्रात मात्र दिवसेंदिवस परिस्थिती अधिकच चिंताजनक होत आहे. याला जबाबदार कोण, याचा शोध घेण्याची हीच वेळ आहे. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या वर्षी जनतेला संबोधित करताना “माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवली होती. आपल्या कुटुंबाच्या आसपास करोना फिरकू नये याची जबाबदारी त्या कुटुंबाने घ्यावी, ही संकल्पना या मोहिमेमध्ये होती आणि या संकल्पनेला बऱ्यापैकी यशही मिळाले होते. महाराष्ट्रातील आणि मुंबईतील महामारीवर बऱ्यापैकी नियंत्रण आले होते. नवीन वर्षामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी “मी जबाबदार’ या मोहिमेची घोषणा केली. प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून वर्तणूक ठेवली, तर करोना महामारीचे संकट वाढणार नाही, ही संकल्पना या मोहिमेमागे होती. पण जेवढे यश “माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेला मिळाले तेवढे यश “मी जबाबदार’ या मोहिमेला मिळताना दिसत नाही. साहजिकच राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लोकडाऊन न करता कडक निर्बंध लादले जातील अशी घोषणा केली असली तरी लोकांच्या मनात लॉकडाऊनची भीती आहेच. 2020-21 हे आर्थिक वर्ष संपत आले असताना बहुतेक सर्व समाजघटकांना आर्थिक वर्षातील व्यवहार पूर्ण करण्याची चिंता आहे. त्यामुळे जर लॉकडाऊन झाले किंवा अतिशय कडक निर्बंध जरी लागू झाले तरी या सर्व व्यवहारांवर मर्यादा येणार आहेत. गेले संपूर्ण आर्थिक वर्ष लॉकडाऊन आणि कडक निर्बंध यामुळे वाया गेले असल्याने नव्या आर्थिक वर्षात तरी आपण नव्या उमेदीने व्यापार आणि व्यवसाय करू अशी आशा अनेकांच्या मनात आहे. पण सध्याची परिस्थिती तशी नाही. ज्याअर्थी या महामारीचे संकट महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्याअर्थी कोणत्या ना कोणत्या घटकाचा त्याला हातभार लागत आहे, हे उघड आहे. करोना ही संसर्गजन्य महामारी असल्याने जर मूलभूत नियम पाळण्यात आले नाहीत तर या महामारीची लाट तीव्र होण्याचा धोका आहे.
सध्या महाराष्ट्रात रात्री अकरा ते सकाळी सहा या कालावधीमध्ये संचारबंदी असली तरी रात्री अकरापर्यंत देशातील सर्व शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. बाजारपेठा, शैक्षणिक व्यवहार, वाहतूक व्यवस्था हे सर्व व्यवहार नेहमीप्रमाणेच सुरू असल्याने त्या ठिकाणची गर्दी कायम आहे, अशा गर्दीच्या ठिकाणी एका जरी बाधित व्यक्तीने मूलभूत नियमांचे पालन केले नाही तरी महामारीचा धोका शंभर पट वाढण्याची शक्यता असते. महाराष्ट्रातील एसटी महामंडळाने बस वाहतूक सुरू करत असताना “नो मास्क नो एन्ट्री’ अशी घोषणा केली असली तरी एकदा एसटी बसमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रत्येक प्रवासी नाका-तोंडावरील मास्क बाजूला घेऊनच प्रवास करतात. कोणत्याही बाजारपेठेमध्ये विक्रेते आणि खरेदीदार व्यवहार पूर्ण करताना नाका-तोंडावर मास्क योग्य स्थितीत असेल याची काळजी घेत नाहीत.
रस्त्यावर विक्री करणारे हजारो विक्रेते केवळ नावापुरता हनुवटीवर मास्क लावून आपला व्यवहार पूर्ण करत असतात, हे वास्तव आहे. त्यामुळे या महामारीच्या वाढत्या संकटाची जबाबदारी कोणाची हे शोधायचे असेल तर ती जबाबदारी निष्काळजीपणे वागणाऱ्या नागरिकांची आहे असेच नाईलाजाने म्हणावे लागते. सरकारने सर्व माध्यमातून सर्व प्रकारचे प्रबोधन करूनही अद्याप निष्काळजीपणे वागणाऱ्या अनेक सामान्य नागरिकांना जाग आलेली नाही आणि त्यामुळेच या महामारीचा धोका पुन्हा एकदा वाढू लागला आहे, हे वास्तव आता स्वीकारावे लागेल. दुसरी एक गोष्ट म्हणजे, गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये राज्यात अनेक ठिकाणी लसीकरण झाले आहे. या लसीकरणानंतर राज्यातील नागरिक अधिकच बेसावध आणि निष्काळजी झाले आहेत की काय, अशीही शंका घेण्यास वाव आहे. लस टोचली म्हणजे संपूर्ण धोका संपला हा जर काही समज सामान्य नागरिकांच्या मनात असेल तर तो दूर करायला हवा.
लसीकरण झाले तरी सर्व मूलभूत नियमांचे पालन करावेच लागणार आहे, ही गोष्ट सर्वांच्याच मनात बिंबवावी लागणार आहे. गेल्या वर्षी भारतात जेव्हा करोनाचा प्रभाव वाढत होता तेव्हा 22 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू जाहीर केला होता. एका दिवसाच्या कर्फ्यूला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला होता. या घटनेला आता लवकरच एक वर्ष पूर्ण होईल. जनता कर्फ्यूच्या दिवशी किंवा नंतरच्या कालावधीमध्ये कडक लॉकडाऊन असताना सामान्य नागरिकांनी ज्या प्रकारे शासनाला सहकार्य केले होते अशाच प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा आगामी कालावधीत करावी लागणार आहे. आता आणखी लॉकडाऊन लागला, आणखी कडक निर्बंध लागू झाले तर ते समाजातील कोणत्याही घटकाला परवडणारे नाहीत, ही गोष्ट लक्षात घेऊन समाजातील सर्वच घटकांनी आपली जबाबदारी ओळखून महामारीचा प्रसार वाढणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
देशातील सर्व राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातच हा आकडा का वाढत आहे, याचा अभ्यास करून याला जबाबदार कोण, याचा शोध घेऊन जर प्रतिबंधात्मक उपाय योजले तरच आगामी कालावधीमध्ये या संकटावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे. अन्यथा 2020 प्रमाणेच 2021 हे वर्षही चिंताजनक आणि निराशाजनक ठरण्याचा धोका लक्षात घ्यायला हवा.