– हिमांशू
“हल्ली फोनवरून मी जरा सावधच बोलतो,’ हे वाक्य तुमच्या तोंडून कधी गेलंय? किंवा तुम्ही कुणाच्या तोंडून ऐकलंय? नसेल तर एकदा फोनवरून बोलता-बोलता असा विचार करा, की पलीकडचा माणूस तुमचा फोन रेकॉर्ड करतोय. तुमचा बोलण्याचा टोन अचानक बदलेल. या फीलिंगनंतर तुम्ही जे काही बोलाल त्यालाच “अभिनय’ म्हणतात.
आता या अभिनयाची पुढची पायरी चढून पाहा. फोनवर बोलणाऱ्याकडून तुम्ही एखादी माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करा. त्याला असं वाटलं पाहिजे की, तुम्ही त्याचा फोन रेकॉर्ड करताय. मग त्याचा बदललेला टोन अर्थात त्याचा अभिनय समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही दोघेही “पुरते कॉन्शस’ झाल्यानंतर खरोखर फोन रेकॉर्ड करा आणि नंतर तो ऐका.
येणेप्रमाणे अभिनयाचे धडे देता-घेता आपल्या सर्वांच्या मनात एकमेकांबद्दल पूर्ण अविश्वास निर्माण होईल, तो सुदिन! जी कहाणी फोनची तीच सोशल मीडियाची. एखाद्या सोशल प्लॅटफॉर्मवरचं तुमचं पर्सनल चॅट खरोखरच पर्सनल राहतं का, असा प्रश्न पडून तुम्ही “कॉन्शस’ झाला नाहीत, तर तुम्ही अंधश्रद्धाळू असण्याची दाट शक्यता आहे. परवाच्या पेगॅसस प्रकरणावरून आम्ही काही राजकीय भाष्य करू पाहात आहोत, असं वाटत असेल तर क्षमस्व! त्या विषयावर जेवढी राजकीय चर्चा होईल, तेवढे आपण अधिक “कॉन्शस’ होणार आहोत ही काळ्या दगडावरची रेघ!
अविश्वासाची पेरणी करण्याचा इथं अजिबात हेतू नाही. तंत्रज्ञानाच्या जादूविषयी पॉझिटिव्ह बोलण्याला हरकतही नाही; पण या जगातली स्वार्थी मंडळी ती संधी भविष्यात आपल्याला देतील असं दिसत नाही. एकीकडे पेगॅसस प्रकरणावरून राजकीय गोंधळ सुरू असतानाच दुसरीकडे सर्वसामान्य व्यक्तींवर तंत्रज्ञानाचे होत असलेले मानसिक परिणाम समोर आलेत. आपल्याला खासगीपणा राहिलेला नाही, या विचारांचा येणारा ताण लोकांना मनोविकारांकडे घेऊन चाललाय.
आपल्या शरीरात कुणीतरी “चिप’ बसवली आहे आणि त्याद्वारे आपल्याला “ऑपरेट’ केलं जातंय, अशी तक्रार एखादा तरुण सायबर विभागात नोंदवत असेल तर मामला गंभीर आहे. संबंधित तरुण उच्चशिक्षित आहे. परदेशातून परत आलाय. तिकडे असताना आपल्या शरीरात कुणीतरी चिप बसवलीय आणि त्याद्वारे आपल्यावर पाळत ठेवली जातेय, आपल्याकडून कामं करवून घेतली जाताहेत, असं या तरुणाला म्हणायचंय. आभास आणि भास हे मनाचे खेळ आहेत हे खरं; पण नवतंत्रज्ञानाचा दुरुपयोग त्या आगीत किती तेल ओतू शकतो, हे अशा घटनांवरून दिसून येऊ लागलंय. स्क्रीनमध्ये गढलेल्या किशोरवयीन मुलांची चिंता असंख्य पालकांना सतत कुरतडत असते, ती व्यर्थ कशी म्हणता येईल? “हा घास चिऊचा’ म्हणत अपरिहार्यतेचा घास आईनं मुलाला आनंदानं भरवायचा का?
आपल्या घराप्रमाणंच आपल्या फोनमध्येही चोर घुसतो आणि संवेदनशील माहिती घेऊन जातो, आपल्या फोनचा कॅमेरा, माइक कधीही सुरू करून आपल्यावर लक्ष ठेवतो, ही काही कविकल्पना राहिलेली नाही. परंतु शेतीविषयक, कामगारविषयक कायदे जितक्या वेगानं तयार आणि संमत झाले, तितका वेग डेटा सिक्युरिटीच्या कायद्याबाबत दिसत नाही. तंत्रज्ञानाची पावलं मात्र गतिमान असतात. भीती संपत नाहीच; उलट तिची क्षेत्रं आणि विस्तार वाढतच जातो. मग काय करायचं? मिनिटा-मिनिटाला “कॉन्शस’ व्हायचं?