– अरुण गोखले
तुम्हा-आम्हाला मांडलेला संसार-प्रपंच सोडवत नाही, मोडवत नाही आणि निदान थोडा तरी परमार्थ जोडावा, ही आपल्या मनातली इच्छाही काही केल्या कमी होत नाही. त्यावेळी आपल्या समोर असा प्रश्न उभा राहतो की नेमके करायचे काय? अशा वेळी ज्यांनी प्रपंचाकडे पाठ फिरविली नाही तरीही मोठ्या कौशल्याने परमार्थ साधला आहे असे साधक, उपासक आणि साधू-संतांचे आपल्याला हेच सांगणे आहे की, तुम्ही प्रपंच्यातला परमार्थ पाहायला शिका.
काय आमच्या प्रपंच्यातच परमार्थ आहे? तो कसा? यावर ते सांगतात, प्रपंच आणि परमार्थ याची अगदी साधी सोपी व्याख्या आहे. स्वार्थ म्हणजे प्रपंच आणि नि:स्वार्थ म्हणजे परमार्थ. आता तुम्ही म्हणाल की हे कसं? तर रोजच्याच जीवनातलं एक उदाहरण पाहू या. स्त्री रोजच न सांगता घरच्या सर्व लोकांसाठी स्वयंपाक करते. तो तिच्या दैनंदिन प्रपंच्यातला एक भाग आहे. पण ज्या वेळी तीच स्त्री ही माध्यान्ह वेळी दारी आलेल्या याचकाला भगवंत मानून भाजी-भाकरी खाऊ घालते तेव्हा तिच्या हातून घडतो तो परमार्थ.
प्रपंच करताना माता-पित्यांचा आदर, वृद्धांची केलेली सेवा, मुलांचे पालनपोषण, गृहलक्ष्मीचा मान, प्रेमाने जोडलेली नाती, एकमेकांसाठी केलेला त्याग, घेतलेले कष्ट, नि:स्वार्थपणे केलेली मदत. हे सारं नकळत त्या परमार्थातच मोडत असते. अनेकदा तर असं घडत असतं की कृती तीच पण फक्त त्या मागचा हेतू, दृष्टिकोन बदलला की आपल्या प्रपंच्याचा परमार्थ कधी होतो ते आपल्यालाच कळत नाही. परमार्थासाठी आवश्यक असणारे गुण, भावना, कसब हे प्रपंच्यातूनच शिकायचं असतात. त्यासाठी घेण्याची भावना देण्यात बदलावी लागते. स्वार्थी “मी’चा विचार बाजूला सारून “आपण सारे’ असा निःस्वार्थी विचार करावा लागतो. ही वैचारिक व्यापकता आली की प्रपंचच परमार्थ होतो. ही गुंफण कशी घालायची ते हे लोक शिकवतात.
देवाशी संवाद
जीवनाच्या संध्याकाळी नाना आणि नानी हे तसे एकटेच. त्यांचा परस्परांना काय होता तेवढाच आधार. त्या परिस्थितीला आनंदाने, सुखासमाधानाने सामोरे जात ते एकटेपण त्यांनी स्वीकारलेले. या अशा परिस्थितीला सामोर जात असताना नानांच्या मनाला आधार होता तो दु:ख देवाला सांगावे । सुख देवासी मागावे ।। हे त्यांच्या जणू अंगवळणीच पडलेलं.
यान्तु देवगणा:… असे म्हणून अक्षता टाकून विसर्जनासाठी ताटात ठेवलेला गणपती त्यांच्या समोर असतो. नाना त्या विघ्नहर्त्या गजाननास सांगत असतात, “हे देवा! तू आमच्या घरात आलास. आमची वेडीवाकडी पूजा स्वीकारलीस. दिलेला नैवेद्य प्रेमाने ग्रहण केलास. आम्ही भरून पावलो. देवा तुझ्या पूजेत, भक्तीत जर आम्ही कुठे कमी पडलो असलो तर आम्हाला क्षमा कर. आम्हाला काय हवं नको ते तू जाणतोस, तेव्हा मागायचे ते काय?’ हे बोलत असताना, देवाकडे मागत असताना त्यांच्या डोळ्यातील आसवांचा अभिषेक हातातील तबकातल्या विसर्जनाच्या मूर्तीवर होत असतो. तोच असतो त्यांचा देवाशी संवाद.