नरेंद्र मोदी यांचे राजकारण सकारात्मक आणि विकासवादी आहे, असे सामान्य लोकांना वाटते. त्यामुळे मोदी यांची ही बलस्थाने जाणून घ्या, असे जे प्रशांत किशोर म्हणत आहेत, ते अजिबात चुकीचे नाही.
निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर, ज्यांनी नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, नितीशकुमार अशा अनेक नेत्यांना यश मिळवून दिले आहे, आता त्यांनी निवडणूक रणनीतिकार म्हणून काम करणे स्वतःपुरते थांबवले आहे. किशोर हे सध्या बिहारच्या यात्रेवर असून, प्रत्येक जिल्हा पिंजून काढत आहेत आणि लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत. या समस्या कशा सोडवायच्या, त्यासाठी एखादा पक्ष व संघटना काढायची किंवा काय, याचा निर्णय ते जेव्हा घेतील तेव्हा घेतीलच. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपची साथ सोडत, लालूप्रसाद यादव यांच्या राजदशी युती केली आणि सरकार स्थापन केले. परंतु त्यानंतरही नितीशकुमार हे भाजपच्या संपर्कात आहेत, असे उद्गार प्रशांत किशोर यांनी काढले होते. तेव्हा किशोर यांचे नाव माझ्यासमोर घेऊ नका ते प्रसिद्धी मिळवण्यासाठी असे विधान करत आहेत, अशी टिप्पणी नितीशकुमार यांनी केली.
उलट नितीशकुमार यांनी भाजपसोबतचा आपला संपर्क थांबवलेला नाही, याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे खासदार हरिवंश नारायण सिंह हे संयुक्त जनता दलाचे खासदार आहेत आणि अद्यापही राज्यसभेच्या उपसभापतिपदावर आहेत, याकडे किशोर यांनी लक्ष वेधले होते. किशोर यांनी कॉंग्रेसचे पुनर्जीवन कसे करायचे, यासाठीचे सादरीकरणही केले होते. ते कॉंग्रेस पक्षात प्रवेश करतील, असेही बोलले जात होते. परंतु त्यांना कॉंग्रेसमध्ये घेण्यास अथवा त्यांचा सल्ला स्वीकारण्यास पक्षातूनच विरोध झाल्यानंतर ते कॉंग्रेसपासून दूर गेले.मात्र आजही ते आपली मते मोकळेपणाने मांडत आहेत.
राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर सर्व विरोधी पक्ष एकवटले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध करू लागले. मोदी यांच्याविरुद्ध विरोधी पक्ष एकसंधपणे रस्त्यावर उतरतील का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. इंदिरा गांधींविरोधात सर्व प्रमुख विरोधी पक्षाचे नेते आंदोलनात उतरले. त्यांनी तुरुंगवास स्वीकारला आणि नंतर जनता पक्षाची स्थापना करून इंदिराजींची राजवट उलथवून टाकली. परंतु मोदी यांचा पराभव करणे सोपे नाही. केवळ हिंदुत्वाच्या बळावर मोदी यांनी यश मिळवले आहे, असे समजणे चूक आहे. मोदी यांच्या लोकप्रियतेत हिंदुत्व हा एक घटक आहे, पण तो एकमेव घटक नाही, असे मत किशोर यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, मोदी यांनी अनेक कल्याणकारी योजना आणल्या असून, त्यांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. तसे पाहू गेले, तर डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने “कल्याणकारी राज्य’ या संकल्पनेवर भर दिला होता. पण भाजपने ही संकल्पना कधीच आपली मानली नव्हती. मात्र मोदी यांनी कल्याणकारी राज्याची संकल्पना राबवली, हे खरेच आहे.
मोदी यांनी देशांमध्ये राष्ट्रवाद जागवला आणि त्याचे एक वेगळे अपील आहे. हा राष्ट्रवाद केवळ हिंदू राष्ट्रवाद नाही. भाजपने 2013 साली, जेव्हा मोदी यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवड केली, तेव्हा त्यांच्या लोकसभा निवडणूक प्रचारसभांचे मुख्य सूत्र राष्ट्रवाद हेच होते. आमचा देश भ्रष्ट राजकारणी आणि त्यांच्या स्कॅम्सकरिता ओळखला जातो. तसेच या देशावर गोऱ्यांनी राज्य केले आणि नंतरही विदेशी व्यक्तींनी सत्ता गाजवली. तुम्ही माझ्यासाठी भाजपला मतदान करा, म्हणजे जगात भाजपला भारताला गौरवाचे स्थान मी मिळवून देईन. भारतीय म्हणून तुम्हाला अभिमान वाटू लागेल. माझ्या हाती सत्ता दिल्यास, मी अशी कामगिरी करून दाखवेन, की अवघे जग ही भारताची प्रशंसा करू लागेल’, हा मोदी यांचा मध्यवर्ती मेसेज होता व असतो, हे लक्षात ठेवले पाहिजे. मोदींचा पराभव करायचा असेल, तर मोदींची बलस्थाने कोणती याचाही अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. तो अभ्यास करूनच अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत पुन्हा पुन्हा सत्ता मिळवली आहे.
पुतीन जेव्हा सत्तेत आले, तेव्हा सोव्हिएत संघराज्य फुटलेले होते. मी देशाला पुन्हा एकदा जगात महत्त्वाचे स्थान प्राप्त करून देईन, असे आश्वासन देऊन पुतीन यांनी आपला करिष्मा निर्माण केला. “मेक अमेरिका ग्रेट अगेन’ हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचाराचे सूत्र होते. त्यांनी अध्यक्ष म्हणून स्वतःची आणि देशाची पतही घालवली हा भाग वेगळा. बराक ओबामा यांनीही “येस, वी कॅन’ अशी घोषणा देऊन अध्यक्षपद मिळवले.
अर्थात, ओबामा यांनी अमेरिकन राजकारणास सहिष्णू आणि सर्वसमावेशक असा चेहरा दिला. आज मोदी हे स्त्रिया तसेच वेगवेगळ्या जातीपातीच्या समाजघटकांत लोकप्रिय आहेत. नऊ वर्षांत त्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. उलट त्यांच्यामुळे भारताचे नाव जगाच्या राजकारणात सन्मानाने घेतले जाते. मोदी हेच विश्वगुरू झाले आहेत, अशी प्रतिमा निर्माण करण्यात भाजप यशस्वी ठरला आहे. देशासाठी ते अहोरात्र राबत आहेत. त्यांच्याइतके राष्ट्रप्रेम कोणत्याही दुसऱ्या नेत्यांमध्ये दिसले नाही, अशीही प्रतिमा निर्माण केली गेली आहे.
“भारत जोडो’ यात्रेनंतर राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढली. परंतु तरीदेखील त्यांच्या हातात देश केवळ सुरक्षितच राहील असे नाही, तर देशाचे नाव मोठे होईल, असा विश्वास जनतेला वाटायला हवा. त्यासाठी आत्मपरीक्षण करून, कोणत्या सुधारणा केल्या पाहिजेत याचा विचार कॉंग्रेस व अन्य पक्षांनी केला पाहिजे.