-अजय बाविस्कर
आज साठीच्या घरात व त्यावरील वयोगटातील असलेल्या प्रत्येक मराठी माणसाला चिमणराव गुंड्याभाऊ ही दूरचित्रवाणीवरील विनोदी मालिका आठवून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य लकिर उमटणार नाही असा माणूस सापडणे अगदीच विरळा. चिंतामण विनायक जोशी किंवा विनोदाचे बादशहा चिं. वि. जोशी यांच्या कथेवर आधारित असलेली ही मालिका त्यावेळी खूपच गाजली होती.
19 जानेवारी 1892 रोजी त्यांचा जन्म झाला. पुण्यात जन्मलेले चिं. वि. जोशी हे विनोदी मराठी साहित्यातील एक नावाजलेले लेखक असले तरी त्यांचे पाली भाषेवर विशेष प्रेम व विशेष अभ्यासकपण होते. इतकेच नव्हे तर बडोदे महाविद्यालयात ते पाली विषयाचे प्राध्यापकही होते. त्यांचे वडील विनायक रामचंद्र जोशी हे शिक्षक होते. त्यांनी आगरकर यांच्या “सुधारक’ या वृत्तपत्राचे काही काळ संपादनही केले होते. साहित्याचा वारसा त्यांच्याकडूनच मिळाला असे म्हणावयास हरकत नाही. “सार्वजनिक काका’ म्हणून ओळखले जाणारे गणेश वासुदेव जोशी हेदेखील जोशींच्याच घराण्यातले होते.
चिं. वि. जोशी यांच्या कथेवर सन 1942 मध्ये “सरकारी पाहुणे’ नावाचा चित्रपट निघाला होता. त्याचे दिग्दर्शन मास्टर विनायक यांनी केले होते. चिमणरावांची भूमिका दामुअण्णा मालवणकर यांनी केली होती. चिं. वि. जोशी यांचे बहुतांशी लेखन हे विनोदी वाङ्मय असले तरी ते व्यावहारिक जीवनात धीरगंभीर प्रवृत्तीचे गृहस्थ होते. त्यांच्या मुलाचा अकाली मृत्यू झाला होता, त्यामुळे ते मनातून दु:खी असत. पण आपल्या साहित्यातून मात्र त्यांनी वाचकांना मनसोक्त, हसवून जो आनंद वाटला त्याला तोड नाही.
“चौथे चिमणराव’ चिं. वि. जोशी यांनी लिहिलेला कथासंग्रह 1958 साली प्रसिद्ध झाला होता. हे पुस्तक कथासंग्रह असले तरी या पुस्तकात सुरुवातीला प्रल्हाद केशव अत्रे यांनी चिं. वि. जोशी यांची ओळख करून देणारा लेख लिहिला आहे. तसेच चिं. वि. जोशी यांनीही त्यांच्या चिमणराव या पात्राच्या निर्मितीबद्दल व आपल्या लेखक होण्यास कारणीभूत ठरलेल्या बाबींबद्दल एक लेख लिहिला आहे. चिं. वि. जोशी यांनी हे पुस्तक प्र. के. अत्रे यांना अर्पण केले आहे. अर्पणपत्रिकेवरून हे स्पष्ट होते की प्र. के. अत्रे हे चिं. विंचे प्रिय मित्र होते. ती अर्पणपत्रिका अशी आहे-
महाराष्ट्रीय विनोद ज्यांनी कथा व निबंध वाङ्मयातून बाहेर काढून नाट्य, बोलपट, व्यासपीठ, काव्य व वृत्तसृष्टी या भिन्न क्षेत्रांत खेळविला ते माझे प्रिय मित्र आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांस सप्रेम.
“विनोदाचे बादशहा चिं. वि. जोशींचे “निवडक विनोद’ या नावाचे एक अतिशय छोटे पुस्तक प्रकाशित केलेले आहे. या पुस्तकात त्यांनी लिहिलेले विनोद एकत्रित संकलित केले आहे. असा हा विनोदाचा बादशहा पुणे येथे 21 नोव्हेंबर 1963ला पडद्याआड गेला पण त्यांनी निर्मिलेल्या चिमणराव, गुंड्याभाऊ या पात्रांना मात्र अजरामर करून ठेवले. महाराष्ट्र साहित्य परिषदेने दरवर्षी एका विनोदी पुस्तकाला चिं. वि. जोशी यांच्या नावाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येऊन साहित्य क्षेत्रात त्यांच्या स्मरणाची ज्योत सतत पेटत ठेवली आहे.