-हेमंत देसाई
“लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेजवळची परिस्थिती तणावपूर्ण असल्याने, खबरदारी म्हणून भारताने तेथे लष्करी सज्जता ठेवली आहे. हे अत्यंत योग्य पाऊल असून, आम्ही कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यास समर्थ आहोत’, असे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी सार्थपणे केले आहे. अनेक दिवस चर्चेचे गुऱ्हाळ चालू ठेवूनही, उभय देशांतील मतभेद मिटलेले नाहीत. उलट चीनने भारतावर खोटेनाटे आरोप केले आहेत.
भारत सरकारने सुमारे दोनशे चिनी ऍप्सवर बंदी घातली असून, हा खुल्या बाजारव्यवस्थेचा अपमान आहे, असा शेरा चीनच्या परराष्ट्र खात्याच्या महिला प्रवक्त्याने मारला आहे. भारताने ही जी कारवाई केली, तशीच इतर देशांनी चीनवर करावी, असे आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे; परंतु भारत व चीन यांचे प्राचीन संबंध आहेत. “दंगल’सारखे हिंदी चित्रपट चीनमध्ये लोकप्रिय आहेत. त्यामुळे भारताने अमेरिकी दडपणापासून मुक्त राहावे, असेच या प्रवक्त्या बाईंनी सुचवले आहे. गंमत म्हणजे, हे सर्व प्रवचन ऐकवताना, त्यांनी सीमेपाशी चीनने जी घुसखोरी चालवली आहे, त्याचा उल्लेखदेखील केला नाही.
याचा अर्थ असा की, भारताने चिनी उत्पादन, गुंतवणूक व कंपन्यांवर जे आर्थिक निर्बंध घातले आहेत, त्यामुळे चीनला कुठेतरी जखम झालेली दिसते. इतर देशांनीही भारताचे अनुकरण केले, तर चीनचा त्रास वाढणारच आहे. चीनच्या लष्करी दादागिरीला सीमेलगत आपण उत्तर देत आहोत आणि देतच राहू; परंतु चीनच्या आर्थिक हितसंबंधांवरही वारंवार आघात करण्याची गरज आहे. चीनच्या शिंजियांग प्रांतातील उइघ्यूर या अल्पसंख्याकांची धार्मिक पिळवणूक केली जात आहे. त्याबद्दल पाकिस्तानने मौन धारण केले असून, हा मुद्दाही भारताने आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर उपस्थित केला पाहिजे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आशियात भारताशी आणि जागतिक स्तरावर अमेरिकेशी पंगा घेण्याचे ठरवलेले दिसते. इंडो-पॅसिफिक विभागातील अमेरिकेच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी चीनने नुकतेच दक्षिण चीन समुद्रात मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रे डागली.
इकडे लडाख क्षेत्रात नियंत्रण रेषेलगत चीनने जाणीवपूर्वक लष्करी हालचाली वाढवल्या आहेत. तेथे संघर्ष वाढल्यास, आमच्याकडे लष्करी पर्याय उपलब्ध असेल, अशी स्पष्टोक्ती चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी केली आहे; परंतु याचा कोणताही परिणाम जिनपिंग यांच्यावर होत असल्याचे दिसत नाही. जिनपिंग यांना चीनचे दुसरे माओ बनण्याची आकांक्षा आहे. जिनपिंग यांनाच बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे आपल्याकडे फारसा वेळ नाही हे त्यांच्या लक्षात आले असेल. म्हणूनच त्यांना घाई झाली आहे. माओ हे चिनी कम्युनिस्ट पक्षाचे चेअरमन होते. हे पद पुन्हा निर्माण करण्याच्या जिनपिंग यांच्या हालचाली सुरू आहेत. तसे झाल्यास, आपल्या विरोधकांना संपवणे त्यांना सोपे जाईल; परंतु त्यासाठी जिनपिंग यांना आपली निर्विवाद जागतिक नेत्याची प्रतिमा लोकांच्या मनात निर्माण करावी लागेल. यासाठीच जिनपिंग यांनी एकीकडे अमेरिका व दुसरीकडे भारताविरुद्ध पवित्रा धारण केला आहे. वास्तविक चीनची अर्थव्यवस्था घसरत चालली आहे.
कोविडची महामारी सुरू असतानाही, चीन जगाच्या घडामोडीत नाक खुपसत होता. करोनाचा उगम वुहान येथेच झाला; परंतु चीन हे नाकारत होता आणि त्यावेळी झालेल्या वादात भारताने आपल्याला पाठिंबा दिला नाही, म्हणून चीन दुखावला होता. जम्मू-काश्मीर राज्याचे विभाजन करून, त्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांत रूपांतर करण्यात आले. तेही चीनला रुचलेले नाही. कोविडवरून अमेरिकेने चीनला लक्ष्य करताच, चीनने दक्षिण चीन सागरी क्षेत्रात आपले लष्करी सामर्थ्य वाढवले. तैवानमध्ये चीनच्या हवाई दलाने कवायती केल्या. त्यानंतर मियाको सागरी क्षेत्रात नौदलाच्या विमानवाहू जहाजांनी हालचाली सुरू केल्या.
चीनने फिलीपाइन्सच्या नौदलाच्या जहाजास हाकलण्याचा प्रयत्न केला. व्हिएतनामची बोट बुडवली. तसेच दक्षिण चीन समुद्रात मासेमारी, तेल व वायुखोदाई करू नये, असे अन्य काही देशांना बजावले. यास उत्तर देण्यासाठी म्हणून अमेरिकेनेही दक्षिण चीन समुद्रात आपले सामर्थ्य असल्याचे चीनला दाखवले. हॉंगकॉंगमध्ये चीनची उघडउघड दडपशाही सुरू असून, त्यावरून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी जिनपिंग यांची धडपड सुरू आहे. जागतिक स्तरावर चीन ही दुसऱ्या क्रमांकाची लष्करी सत्ता आहे. आशियामधील अमेरिकेचा प्रभाव संपुष्टात आणायचा आणि व्हिएतनाम, फिलीपाइन्स, मलेशिया व तैवानला आपली जागा दाखवून द्यायची, असे चीनचे धोरण दिसते. शिवाय भारतालाही मागे रेटले, तर इतर सर्व आशियाई देशांना आपल्याच मागे यावे लागेल, असे जिनपिंग यांचे डावपेच आहेत.
उत्तर कोरिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, तुर्कस्तान आणि काही आफ्रिकी देश हे चीनच्या जवळचे आहेत. तर जपान, ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, इस्रायल, फ्रान्स, ब्रिटन वगैरे देश अमेरिकेच्या बाजूने कललेले आहेत. दुर्दैवाने आज रशिया चीनच्या बाजूने कलल्याचे स्पष्टपणे दिसते. त्यामुळे भारताने रशियाशी असलेले संबंध सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत.
मॉस्को येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत प्रादेशिक शांतता व स्थिरतेसाठी विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याची आवश्यकता संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रास्तपणे व्यक्त केली. तेथे हजर असलेल्या चीनच्या संरक्षणमंत्र्यांना त्यांनी मस्तपैकी टोमणेही मारले. हे बरेच झाले. परंतु त्याचवेळी भारताने आपले नौदल सामर्थ्य वाढवले पाहिजे आणि चीनविरुद्ध जागतिक स्तरावर आर्थिक आघाडी उघडली पाहिजे.