– विठ्ठल वळसेपाटील
छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिवनीती अवलंबून स्वराज्याचे तोरण बांधले. शिवनीतीचा जगभर अभ्यास केला जातो. आज तिथीनुसार शिवजयंती. त्यानिमित्त शिवनीतीचे एक उदाहरण…
साडेतीनशे वर्षांपूर्वी अखंड हिंदुस्थान परकीय सत्तांनी गिळंकृत केला होता. या सत्ता अन्याय, जुलूम, जबरदस्ती करून दबदबा निर्माण करत असताना रयतेच्या सुखासाठी सह्याद्रीच्या कुशीत छत्रपती शिवरायांनी रयतेचे राज्य उभे केले. ते टिकवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. अनेक जीवाभावाची माणसे स्वराज्यासाठी अर्पण झाली. आदर्शवत् राज्य म्हणून छत्रपती शिवरायांच्या राज्यव्यवस्थेचा जगभर आज उत्सव साजरा केला जातो.
शिवरायांची राजनीती, न्यायनिवाडा, युद्धनीती, परराष्ट्र धोरण, संरक्षण धोरण, अर्थनीती, जलधोरण, तह, आरमार या विषयीची आज्ञापत्रे मोलाची माहिती देणारी आहेत. शिवरायांच्या विविध नीतींचा अभ्यास जगभर केला जातो. नियोजनाची अचूकता ही सुरतेची पहिली स्वारी यातून दिसून येते. हिंदवी स्वराज्य उभे राहिले ते मूठभर मावळ्यांच्या जीवावर. त्यातून रयतेला कोणताही उपद्रव न होता स्वराज्याचा गाडा हाकणे कठीण होते. अशा अनेक बाका प्रसंगांवर शिवरायांनी मात केली. स्वराज्यावर 1664 साली आर्थिक संकट निर्माण झाले. मुघल सरदार शाहिस्तेखान पुण्यात लालमहालात तळ ठोकून बसला होता. महसूल घडी विस्कटून पडली होती. यातून रयतेवर कोणताच भार टाकायचा नाही मात्र अर्थ नियोजन उभे करायचे या उदात्त हेतूने शिवरायांनी नियोजन पद्धतीचा अवलंब करून सुरतेची स्वारी आखली.
सुरत हे शहर मुघल साम्राज्याचे आर्थिक केंद्रस्थान होते. मोठ्या प्रमाणात कर मिळत असे. शिवाय ते प्रमुख व्यापारी बंदरही होते. ऐश्वर्य संपन्न शहर व जगातील एक व्यापारी केंद्र म्हणून सुरतची ओळख होती. या बंदरात मुघलांशिवाय इंग्रज, डच, फ्रेंच, इराणी, दुराणी, बगदादी, अरबी, यहुदी, अफगाणी आदी मंडळीचा मोठा व्यापार चालत असे. सोने, चांदी, मोती, माणिक, हिरे, पाचू या शिवाय अनेक नाणी, मोहरा, पुतळ्या, मूर्ती, भांडी, मसाल्याचे पदार्थ, कस्तुरी, चंदन, अत्तर, रेशीम, मलमल कपडे, गालिचे, हस्तिदंत अशा अनेक मौल्यवान वस्तूंचा येथे भरभरून खजिना होता. याची सारी माहिती हेरखात्याने जमा केली. शिवरायांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटल्यावर ही मोहीम फत्ते करण्यास घेतली.
तत्कालीन परिस्थितीनुसार सुरतवर हल्ला करणे फार सोपे नव्हते. खंबायतच्या आखातातील समुद्रमार्गावर इंग्रज, डच व पोर्तुगीज यांचे आरमार उभे होते.
उत्तर व पूर्व बाजूस हजारो मैल मोगल सत्ता ठाण मांडून बसली होती. शहर व किल्ला काही अंतरावर होते. किल्ला बळकट व बुऱ्हाणपूर दरवाजा मजबूत होता. सुरत शहराची बारीकसारीक माहिती बहिर्जी नाईक व त्यांच्या हेरसंस्थेने पार पाडली. तेथील बाजारपेठा, व्यापारीवर्ग, हवेल्या, महाल, मोठी घरे, इंग्रज व डच यांच्या वखारी, दानशूर मंडळी यांची खडान्खडा माहिती प्राप्त करून शिवरायांना दिली. बहिर्जी नाईकांनी सुरतमध्ये सैन्याची कुमक वाढवण्याच्या आत स्वारी केल्यास सफल होईल असा लाखमोलाचा सल्ला दिला.
रायगड या राजधानीपासून सव्वातीनशे किमी अंतराचा प्रवास होता. हा प्रवास सर्व मोगल सत्ता असलेल्या भागातून होता. त्यामुळे हूल देत हे अंतर पार केले. सैन्य नियोजन, परतीचा प्रवास आदींचे तपशीलवार नियोजन केले. यात रात्रीचा प्रवास व दिवसा मुक्काम या पद्धतीने प्रवास सुरू झाला. स्वारीसाठी घोडदळ सज्ज झाले. 15 डिसेंबर 1663 रोजी रायगडावरून प्रस्थान करत त्र्यंबकेश्वर पुढे खानदेशातून तापी खोऱ्यातून 20 दिवसांत 5 जानेवारी 1664 रोजी सुरत नजीक गणदेवी गावी पोहोचले. पुढे उधन्यावरून छत्रपती शिवरायांनी आपला वकील इनायतखान सुभेदाराकडे पाठवला. इनायतखान सुभेदाराने व सुरतेतील नामवंत व्यापारांनी महाराज सांगतील तेवढी खंडणी भरण्याची व्यवस्था करावी. पण कर्तबगारीशून्य असलेल्या इनायतखानाने हा आदेश धुडकावून लावल्याने शिवरायांनी स्वारी केली.
किल्ल्यात लपून बसलेल्या इनायतखानाकडून प्रतिकार झाला नाही. मराठी सैन्य शहरात घुसले. जागोजागी चौक्या बसविल्या. सुरतेच्या बंदरावर हल्ला चढवला. त्यामुळे समुद्र मार्गाने होणारा हल्ला थांबवता आला. युरोपीय वकिलाती, किल्ले किंवा आरमारांना धक्का लावला नाही. या भूमिकेने इंग्रज व डचांनी सावध भूमिका घेतली. त्यांनी प्रतिकार केला नाही. मात्र, पोर्तुगिजांकडून खजिना मिळविला.
यादरम्यान इनायतखानाने मराठ्यांकडे वाटाघाटींसाठी वकील पाठवला. मात्र, त्या वकिलाने शिवरायांवरच हल्ला चढविल्याने त्याचा व बरोबरच्या सैन्याचा पुरता समाचार घेतला गेला. यात इनायतखानाचे केवळ एक हजार सैन्यच लढले. त्यामुळे चार दिवसांत शहरातील मालमत्ता जमा झाली. ही बातमी युरोपी व अफगाणपर्यंत पोहोचली. अनेक राष्ट्रांनी यात मोठी जीवितहानी, इतर विध्वंस न होता लूट झाली, याचे आश्चर्य व्यक्त केले.
ही स्वारी पार पडत असताना शिवरायांनी शहराबाहेर आपले गुप्तहेर खाते व सैन्य सज्ज ठेवले होते. चौथ्या दिवशी मुघल सरदार महातबखान सुरतेच्या रक्षणासाठी येत असल्याचे निरोप धडकताच 10 जानेवारीस सुरत सोडले. खान 17 जानेवारीस सुरतमध्ये पोहोचला. तोपर्यंत राजे अर्धी वाट चालून गेले. 5 फेब्रुवारीस रायगडी सुखरूप पोहचेले. अशा अचूक नियोजन पद्धतीने राजे निसटले याची परिणती बादशहा औरंगजेबाने मिर्झा राजेंना स्वराज्यावर पाठवले. त्यातूनही राजे सुखरूप परतले. अचूक नियोजन, प्रभावी गुप्तहेर खाते, मावळे असल्याने हिंदवी स्वराज्याची भगवी पताका अभिमानाने गगनात डौलत राहिली.