भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी मानण्यात येत असल्याने या लोकशाहीतील अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टीही भारतातच घडताना दिसतात. सध्या भारतीय राजकारणामध्ये ज्या विविध प्रकारची आंदोलने केली जात आहेत आणि यात्रा काढल्या जात आहेत त्याचा विचार करतानाही हे लोकशाहीचे आगळे वैशिष्ट्य समोर येते. खरेतर सर्वसाधारणपणे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष ही कोणत्याही लोकशाहीची प्रमुख वैशिष्ट्य असतात. पण सध्या भारतामध्ये मात्र सत्ताधारी भारतीय जनता पार्टी विरुद्ध दिल्लीमध्ये सत्ताधारी असलेला आम आदमी पक्ष आणि केंद्रात प्रमुख विरोधी पक्ष असलेला कॉंग्रेस पक्ष यांच्यातील संघर्ष समोर येताना दिसत आहे.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी आपली बहुचर्चित भारत जोडो यात्रा सुरू केली असून या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरातचा दौरा केला आहे आणि तिथे सत्ताधारी भाजपला आव्हान दिले आहे. तिसरीकडे दिल्लीतील केंद्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पार्टीने दिल्लीमध्ये सत्तेवर असलेला आम आदमी पक्षाला व्यवस्थित काम करून द्यायचे नाही यासाठी सर्व करामती सुरू केल्या आहेत. यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यावी लागणार आहे ती म्हणजे, हा सत्ता संघर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी विरुद्ध दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यातील आहे. हा संघर्ष फक्त राजकीय पक्षाचा नसून नेतृत्वाचासुद्धा आहे. ज्याप्रकारे अरविंद केजरीवाल यांनी गुजरातचा दौरा करून वातावरण निर्मिती केली आहे ती पाहता त्याची दखल भाजपालाही घ्यावी लागणार आहे. तशी दखल त्यांना राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची घ्यावी लागणार आहे.
राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल हे दोघेही भाजपा विरोधात लढा देत असले तरी त्याच वेळी ते एकमेकांच्या विरोधातही लढा देत आहेत. यातील लक्षणीय गोष्ट म्हणजे अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमध्ये एका सभेत भाषण करताना सोनिया गांधी यांना मागच्या दाराने पंतप्रधान करण्याचा भाजपचा डाव आहे, असा अनाकलनीय आरोप केला होता. त्या आरोपाला उत्तर देताना कॉंग्रेसने अरविंद केजरीवाल यांच्यावर उपचार करण्याची गरज आहे, असा टोला मारला होता. केजरीवाल यांना भाजप आणि कॉंग्रेस हे दोघेही आपले राजकीय शत्रू वाटत असल्याने त्यांनी एकाच वेळी दोघांना टार्गेट केले आहे. कॉंग्रेसने मात्र आपल्या भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्याचे ठरवले असले, तरी अरविंद केजरीवाल यांच्या काही विधानांमुळे कॉंग्रेसला त्यांचीही दखल घ्यावी लागली आहे.
गेल्या दहा ते पंधरा वर्षांच्या कालावधीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे, ते भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांना अद्यापही मान्य करता आलेले नाही. कारण दिल्ली विधानसभेवर दीर्घकाळ कॉंग्रेसची सत्ता होती व त्यानंतर काही काळ भाजपचाही सत्ता होती; पण या दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांना बाजूला करून सलग तीन निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत सत्ता प्रस्थापित केल्याने त्याची सल कॉंग्रेस आणि भाजप या दोघांनाही वाटणे साहजिक आहे. याच कारणामुळे कॉंग्रेस आणि भाजपा या दोघांनाही आम आदमी पार्टी हाच आपला प्रमुख राजकीय शत्रू वाटतो. कॉंग्रेस आणि भाजप यांची वैचारिक बैठक वेगळी असली तरी राजकीयदृष्ट्या सत्ता चालवताना त्यांचे विचार समान असतात, अशी भूमिका अरविंद केजरीवाल यांची असल्याने त्यांनी या दोन्ही पक्षांना समान अंतरावर ठेवण्याचे काम केले आहे. त्यातूनच हे दोन्ही पक्ष आम आदमी पक्षाचे नेहमीच लक्ष्य होत असतात.
एकीकडे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या विरोधात विरोधकांची एकजूट उभे करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच ज्या राजकीय पक्षांकडे आशेने पाहण्याची गरज आहे असेच दोन पक्ष कॉंग्रेस आणि आम आदमी पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले असल्याने भाजप विरोधात एकजूट करण्याच्या प्रयत्नांना तडा जाणार आहे. भाजपचा विचार करता त्यांना जरी एकाच वेळी कॉंग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्याशी सामना करावा लागत असला तरी जेव्हा आम आदमी पक्ष आणि कॉंग्रेस एकमेकांवर टीका करू लागले आहेत तेव्हा भाजपने गप्प बसण्याची भूमिका घेतली आहे, हे विशेष. सध्या केजरीवाल यांनी गुजरातवर लक्ष केंद्रित केले आहे आणि काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनीसुद्धा गुजरातचा दौरा केला होता. येत्या दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत गुजरात विधानसभेची निवडणूक होणार असल्याने सर्वच राजकीय पक्ष आता गुजरातवर लक्ष केंद्रित करतील. त्यामुळे सध्या तरी भाजपालाही आपली गुजरातमधील सत्ता कायम ठेवण्यामध्ये जास्त रस आहे. गेल्या अनेक निवडणुकांत गुजरातमध्ये कॉंग्रेसला पराभव पाहावा लागला असला तरी गुजरातमध्ये कॉंग्रेसचा पक्का असा मतदार कायम आहे.
केजरीवाल यांना मात्र तिथे आपली मतदारांची बैठक तयार करावी लागणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नसल्याने नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार टीका झाली होती. कॉंग्रेसने तेव्हा चांगली कामगिरी केली होती. यावेळची निवडणूकही अशाच प्रकारे चुरशीची होणार आहे. त्यातच अरविंद केजरीवाल यांनी आता गुजरातच्या राजकारणात उडी घेतली असल्याने ही लढत अधिकच रंगतदार होणार आहे. नरेंद्र मोदी यांना पर्याय म्हणून देशात ज्या विविध चेहऱ्यांचा विचार केला जातो त्या चेहऱ्यांमध्ये आता राहुल गांधी यांच्यानंतर अरविंद केजरीवाल यांच्या नावाचाही समावेश झाला असल्याने या संघर्षाला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. अरविंद केजरीवाल यांनीसुद्धा याच एका भूमिकेतून गुजरातवर लक्ष केंद्रित केले आहे.
देशातील इतर राजकीय पक्ष अद्यापही अरविंद केजरीवाल यांना सर्वसंमत पंतप्रधानपदाचे उमेदवार मानत नसले, तरी आपल्या कार्यपद्धतीच्या जोरावर ही प्रतिमा तयार करण्याचे काम अरविंद केजरीवाल यांनी सुरू केले आहे. याच एका हेतूने त्यांनी एकाच वेळी कॉंग्रेस आणि भाजप यांना आव्हान देण्याचे काम केले आहे. एकीकडे मोदी विविध योजनांची घोषणा करून वातावरण निर्मिती करत असताना राहुल गांधी आणि केजरीवाल यांनीसुद्धा मोदी यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. साहजिकच नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी विरुद्ध अरविंद केजरीवाल हा तिहेरी संघर्ष निश्चितच आगामी कालावधीमध्ये उत्कंठावर्धक ठरणार आहे.