आता भाजपने दक्षिणेची भिंत तोडण्यासाठी तेलंगणची निवड केली आहे. एखाद्या दक्षिण भारतीयास राष्ट्रपतिपदासाठी भाजपचा उमेदवार म्हणून समोर आणले जाऊ शकते, अशी चर्चा आहे.
दक्षिणेकडील राज्य नेहमीच नाराज राहतात. यामागचे प्रमुख कारण म्हणजे उत्तरेच्या तुलनेत दक्षिणेकडील विकासकामांकडे फारसे लक्ष दिले जात नाही; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “सब का साथ, सब का विकास’ या मंत्राने अनेक दक्षिण भारतीयांना आकर्षित केले आहे. अयोध्येत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत राम मंदिराच्या गर्भगृहाची पायाभरणी केल्याने दक्षिण भारतातील लाखो श्रद्धांळूच्या मनात उत्साहाची भावना आहे. दक्षिणेत असेही म्हटले जात आहे की, भाजप आणि मोदी हे एखाद्या दक्षिण भारतीयास राष्ट्रपतिपदासाठी आपला उमेदवार म्हणून समोर आणतील. असा निर्णय घेतला तर दक्षिण भारतात भाजपचे राजकारण आणखी वेगाने वाढेल. मोदी, योगी आणि राम मंदिर या तीन गोष्टी दक्षिण राज्यांत अधिक चर्चेत आहेत; परंतु नाराजी सूर देखील उमटत आहेत. द्रमुक नेते एम. के. स्टॅलिन यांनी तमिळनाडूत द्रविड मॉडेलला हवा दिली आहे.
दक्षिण राज्यांत कॉंग्रेस अजूनही विशेष प्रभाव निर्माण करू शकलेली नाही. राहुल गांधी हे ज्या वायनाड मतदारसंघातून निवडून आले आहेत, तेथे ते नियमित जात नाहीत. म्हणूनच तेथील मतदार म्हणतात की, राहुल गांधींना मतदारसंघात येण्यापेक्षा परदेश प्रवास करण्यास अधिक रुची आहे. दक्षिण आणि उत्तर भारत यांच्यात दरी आहे. परंतु पंतप्रधान मोदी हे दक्षिण भारतात लोकप्रिय आहेत. तसेच दोन ते तीन टक्के युवकांचे मत मोदींकडे जाते. आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची मोदींवर अधिक निष्ठा आहे. दक्षिण भारतातील तीन मोठे आयटी हब असणाऱ्या हैदराबाद, बंगळुरू आणि चेन्नई येथे काम करणारे तीस वर्षांपेक्षा कमी वयागेटातील युवक ग्राफिक्स, एआय, सॉफ्टवेअर विकासातील नवतंत्रज्ञानामुळे मोदींवर खूश आहेत.
कर्नाटक आणि पुद्दुचेरी येथे मोदींचे डबल इंजिन सरकारचा फॉर्म्युला चांगले काम करत आहे. तेथे भाजपने चांगलेच बस्तान बसविले आहे. तमिळनाडूच्या ग्रामीण भागात भाजपने लोकप्रियता मिळवली आहे. तरुण नेते अन्नामलाई यांचे प्रयत्न फळाला येत आहेत. अलीकडेच महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने तमिळनाडूत स्वबळावर निवडणूक लढविली आणि त्यास 7 टक्के मते मिळाली. याप्रमाणे केरळमध्ये भाजपाच्या विचारधारेला पाठबळ मिळत आहे. परंतु तेथे डाव्यांचे वर्चस्व कमी करणे कठीण आहे. भाजपने त्रिपुरातून ज्या रितीने माकपला घरी बसविले, त्याच रितीने भाजप पुढील पाच वर्षांत केरळमध्ये डाव्यांना घरी पाठवू शकतो.
2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजप दक्षिणेत अधिकाधिक जागा जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. दक्षिण राज्यांत द्रमुक, अण्णाद्रमुक, पीएमके, टीआरएस, टीडीपी, वायएसआर कॉंग्रेस यासारखे विविध आठ पक्ष आहेत; परंतु तीन राज्यांत कर्नाटक, पुद्दुचेरी आणि तेलंगणात भाजपचे अधिक आकर्षण आहे. अर्थात, तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटकच्या काही भागांत तीव्र प्रतिकार होऊ शकतो. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथे के. चंद्रशेखर राव यांच्यावर टीका करताना तेलंगण राष्ट्र समिती ही राज्यात हिंदू अणि मुस्लीम समुदायात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. तेलंगणात हिंदूंची संख्या मोठी आहे. या कारणामुळे तेथे भाजपचा चांगला पगडा आहे. मात्र काही नेत्यांच्या वादग्रस्त विधानामुळे हिंदी-दक्षिणेत तेढ निर्माण होत आहे. तमिळनाडूचे आरोग्यमंत्री सुब्रह्मण्यम यांनी करोनाचे रुग्ण वाढीसाठी आणि संसर्गासाठी उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना जबाबदार धरले. याशिवाय द्रमुकचे मंत्री पोनुमुडी यांनी जी मंडळी तमिळनाडूत पाणीपुरी विकतात ते केवळ हिंदी बोलतात, असे विधान केले. त्यावर जितेनप्रसादने जोरदार प्रत्युत्तर दिले. जेव्हा द्रमुककडून अशाप्रकारची वक्तव्ये होत राहतात, तेव्हा उत्तरेत राहणाऱ्या दक्षिण भारतीय नागरिकांना त्रास होतो.
निश्चितच दक्षिण राज्यांत भाजपला सत्तेपर्यंतचा मार्ग वाटतो तेवढा सोपा नाही. दीर्घकाळापर्यंत भाजपने असेच गृहित धरले होते की, कर्नाटकात सरकार आल्यानंतर दक्षिणेत सहज प्रवेश करता येईल. केरळ, तमिळनाडू, तेलंगणातील मतदार मतदान करतील, अशी अपेक्षा बाळगून होते. परंतु ते स्वप्नच राहिले. आता भाजपने या सर्व राज्यांसाठी वेगवेगळी रणनीती आखण्याचे ठरविले आहे. त्यामुळे दक्षिणेची पोलादी भिंत फोडण्यासाठी तेलंगण राज्याची निवड केली आहे. तेलंगणाची निवड करण्यामागे ऐतिहासिक कारण आहे. पहिले म्हणजे भाजपने वेगळ्या तेलंगणला पाठिंबा दिला होता. तसेच तेलंगण राष्ट्र समिती जन्माला येण्यापूर्वी या पक्षाने तेलंगण राज्यासाठी वेगळा प्रस्ताव मांडला होता.
तमिळनाडूत 1960 ते 2008 याकाळात मंदिरातील दहा प्राचीन मूर्ती चोरीस गेल्या होत्या. या मूर्तींचा ठावठिकाणा लागल्यानंतरही त्या परत आणण्यासंदर्भात यूपीए सरकारने काहीच हालचाली केल्या नाही. परंतु रालोआ सरकारने जुन्या मूर्ती मिळवण्याचा प्रयत्न केला आणि अमेरिकेतून सहा आणि ऑस्ट्रेलियातून चार मूर्ती हस्तगत केल्या. या मूर्तींना केंद्र सरकारने एका सोहळ्यात राज्य सरकारकडे सुपूर्द केल्या. त्यामुळे दक्षिणेतील हिंदू समुदाय भाजपच्या कामगिरीवर खूश आहे. परिणामी उत्तर भारतीयांप्रती असलेली नाराजी दक्षिणेत काही प्रमाणात कमी झाली आहे. परंतु भाजपला अनेक दशकांपासून जम बसविलेली द्रविड विचारसरणी तोडणे सोपे नाही. उत्तर भारतीय हे एखाद्या मोठ्या भावाप्रमाणे वागणूक देतात ही दक्षिण भारतीय नागरिकांत पसरलेली नकारात्मक भावना दूर करणे कठीण आहे. अशा स्थितीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दक्षिण राज्यात बस्तान बसवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत.