काही दिवसांपासून सामाजिक माध्यमांवर वन्यप्राण्यांच्या अपघातांचे हृदय पिळवटून टाकणारे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्याबाबत… सामाजिक माध्यमांवर आणि वृत्तपत्रांतून वन्यप्राण्यांच्या अपघातातील बळींच्या बातम्या सतत येत आहेत. साहजिक असा प्रश्न निर्माण होतो की, वन्यप्राण्यांचा जीव वाचवण्यासाठी वनविभाग किंवा पोलीस काही पाऊल उचलत आहे की नाही. जर याबाबत काही कायदा असेल तर त्याचे पालन का केले जात नाही. जर योग्य पाऊल उचलले तर हृदयाचा थरकाप उडवणाऱ्या वन्यप्राण्यांच्या मृत्यूच्या घटना घडणारच नाहीत.
दहा वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी पर्यटनाच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या शिकारीबाबत निर्देश दिले होते. कारण पर्यटनाच्या नावाखाली वन्यप्राण्यांची शिकार केल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. त्या घटना लक्षात ठेवून सर्वोच्च न्यायालयाने अशा पर्यटनावर ताशेरे ओढले होते. तेव्हा असे वाटले होते की, आतातरी वन्यप्राण्यांना संरक्षण प्राप्त होईल. मात्र, तरीही बेकायदेशीरपणे शिकारीची मालिका सुरूच राहिली. मागच्या दहा वर्षांत वन्यप्राण्यांची झपाट्याने कमी होत जाणारी संख्या पाहता हा एक चिंतेचा विषय बनला आहे. सरकारच्या कडक कायद्यांमुळे आणि कठोर अंमलबजावणीमुळे वन्यप्राण्यांच्या शिकारीवर काही प्रमाणात आळा बसला असला तरी अपघातात वन्यप्राण्यांचा जाणारा बळी त्यांच्या संरक्षणावरच प्रश्नचिन्ह निर्माण करतो. केंद्र सरकारने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार 2012 ते 15 जुलै 2022 पर्यंत 1059 वाघांचा विविध अपघातात बळी गेला आहे. यात सर्वात जास्त म्हणजे 270 वाघ मध्य प्रदेशात तर 183 वाघांचा बळी महाराष्ट्रात गेला आहे. मध्य प्रदेशात मागील सहा महिन्यांत 27 वाघांचा बळी गेला आहे.
2019 ते 2021 च्या मध्यापर्यंत शिकार, विजेचा शॉक, विषारी पदार्थ खाल्ल्यामुळे आणि रेल्वेची धडक बसून अपघातात बळी गेलेल्या हत्तींची संख्या तब्बल 307 इतकी आहे. अशाच प्रकारे रेल्वेखाली सापडून ओडिशात 12, पश्चिम बंगालमध्ये 11 आणि इतर राज्यांमध्ये 22 हत्तींचा नाहक बळी गेला आहे. तर 29 हत्तींची शिकार केली गेली आहे. तसेच विषारी पदार्थ खाल्ल्यामुळे बळी गेलेल्या हत्तींची संख्या 11 होती. वाघ आणि हत्तींच्या शिकारी मागे तस्करी हे महत्त्वाचे कारण आहे. वाघांचे चामडे आणि हस्तीदंतांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे वाघ आणि हत्तींची शिकार करून बेकायदेशीररित्या तस्करी केली जाते. मागील पाच वर्षांत वाघांच्या शिकारीवर काही प्रमाणात नियंत्रण जरूर मिळविले आहे. मात्र, ज्याप्रकारे वाघांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे, ती रोखणे खूप मोठे आव्हान आहे. वाघांच्या संरक्षणासाठी दरवर्षी प्रयत्न केले जातात, मात्र, इतके प्रयत्न करूनही देशात दरवर्षी सरासरी 98 वाघांचा बळी जातोच. विशेष म्हणजे 2018च्या वाघ जनगणना अहवालानुसार, देशात 2,967 वाघ होते. मात्र, विविध अपघातात आणि शिकारीमुळे मागील साडेचार वर्षांत 404 वाघांचा बळी गेला आहे. खरे तर यात वाघांच्या नैसर्गिक मृत्यूच्या संख्येचाही समावेश आहे. मात्र, तरीही वस्तुस्थिती अशी आहे की, बेसुमार वृक्षतोड, ढासळते पर्यावरण संतुलन, शिकार आणि जंगलातील वाढता मानवी हस्तक्षेप यामुळेच वन्यप्राण्यांवर संकट ओढवले आहे.
वाघांची संख्या केवळ भारतातच घटत चालली आहे असे नव्हे, तर जागतिक स्तरावरही वाघांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे. त्यामुळे वाघांची संख्या सध्या केवळ 3900 इतकी कमी आहे. वाघांची घटती संख्या पाहता आंतरराष्ट्रीय नैसर्गिक संरक्षण संघ(आययूसीएन) ने आपल्या लाल सूची (रेड लिस्ट) मध्ये वर्ष 1969 मध्येच वाघाला नामशेष होणाऱ्या वर्गात समावेश केला होता. त्यानुसार वाघांचे संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघाचे लक्ष वेधले होते. त्याचा परिणाम असा झाला की, वाघांच्या संरक्षणासाठी 2010 मध्ये सेंट पीटर्सबर्ग येथे आंतराष्ट्रीय वाघ संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी वाघांच्या घटत्या संख्येवर विस्तृत चर्चा करण्यात आली होती. तेव्हापासून जगभर वाघांच्या संरक्षणासाठी खबरदारी घेतली जाऊ लागली. विशेषतः भारत, बांगलादेश, नेपाळ, भूतान, चीन, म्यानमारसह तेरा देशांनी 2022च्या शेवटी आपल्या देशाच्या सीमांतर्गत भागात वाघांची संख्या दुप्पट करण्याचा संकल्प केला होता. विशेष म्हणजे 2018 पर्यंत भारत या लक्ष्याच्या जवळपास 74 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. 2010 मध्ये भारतात 1706 वाघ होते, 2014 मध्ये ही संख्या वाढून 2226 आणि 2018 मध्ये आणखी वाढून 2967 एवढी झाली होती.
वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असल्यामुळे त्यांचे संरक्षण होणे गरजेचे आहे. जंगल सुरक्षा, जैवसाखळीचे संतुलन आणि वन्यप्राणी संरक्षणाच्या दृष्टीनेही वाघांचे संरक्षण गरजेचे आहे. केंद्र सरकारद्वारे वाघांच्या संरक्षणासाठी कायद्याशिवाय अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. मात्र अजूनही यासाठी भरीव कामगिरी करण्याची आवश्यकता आहे. मागील दहा वर्षांमध्ये वाघांच्या हल्ल्यात बळी जाणाऱ्यांची संख्या 125 इतकी आहे. यामागचे कारण म्हणजे स्वसंरक्षणाकरता वाघांना मारून टाकण्याची लोकांची प्रवृत्ती असते. लोकांचा हाच दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. याच दृष्टिकोनातून हत्तींना वाचवण्याचेही आव्हान आहे. मागील दहा वर्षांत हत्तींचीही संख्या झपाट्याने कमी झालेली आहे. सरकारला वाघांसोबतच हत्तींनाही शिकार, रेल्वे अपघात यापासून संरक्षण देण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील. मागील चाळीस वर्षांमध्ये हजारोंच्या संख्येने हत्ती, सिंह, बिबट्या, वाघ, हरीण आणि अस्वलांचा अपघात आणि शिकारीत बळी गेला आहे.
खरेतर वन्यप्राण्यांविषयी लोकांच्या मनात भीतीदायक भावना असते. विशेषतः शहर किंवा गाव जर जंगलाशेजारीच असेल तर तेथील रहिवाशांच्या मनात दहशत असते. त्यामुळे शिकाऱ्यांना पकडून देण्यात स्थानिक लोक पोलिसांची मदत करीत नाहीत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे वन्यप्राणी सर्वसामान्य लोकांच्या जीवनाचा भाग नसतात. त्यामुळे पाळीव प्राण्यांसारखी मैत्री वन्यप्राण्यांशी नसते. साहजिकच वन्यप्राणी वस्तीत दिसताच घबराट निर्माण झाल्याने त्याला मारण्याचाच प्रयत्न आधी केला जातो. त्यामुळे अनेक वन्यप्राण्यांच्या हत्येची माहिती ना वन्यविभागाला असते ना पोलिसांना. वन्यप्राण्याविषयी वाटत असलेली भीती, घृणा मनातून काढून टाकली पाहिजे. केंद्र आणि राज्य सरकारनेसुद्धा वन्यप्राण्यांविषयी जनजागृती केली पाहिजे.