गुजरात, हिमाचल प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुका आणि दिल्ली महापालिकेची निवडणूक या तिन्ही ठिकाणी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यातील एक्झिट पोलचे निष्कर्ष आज जाहीर झाले आहेत. एक्झिट पोलचे निकाल अचूक असू शकत नाहीत, हे गेल्या काही निवडणुकांतून दिसून आले तरी या मतदानोत्तर जनमत चाचण्यांतून प्रत्यक्ष मतमोजणीचा निकाल काय लागेल याचे बऱ्यापैकी संकेत मिळतात, असे मात्र निश्चित म्हणता येईल.
आजच्या एक्झिट पोलबाबत सर्वाधिक आकर्षण होते ते गुजरातचे. तेथे 27 वर्षे सत्तेवर असलेल्या भाजपचे काय होणार याची देशातल्या प्रत्येकाला उत्सुकता होती. या निकालावर सन 2024 साली होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचेही दिशादर्शन अवलंबून आहे. त्यानुसार आज जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये गुजरातमध्ये पुन्हा भाजपच बाजी मारणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. विशेष म्हणजे सन 2017 च्या निवडणुकीपेक्षाही भाजपला यावेळी गुजरातमध्ये अधिक जागा मिळणार आहेत.
भाजपसाठी हे चांगले संकेत आहेत. या राज्यात आम आदमी पक्षाच्या कामगिरीकडेही विशेष लक्ष लागून राहिले होते. कारण गुजरात आम्हीच जिंकणार असे केजरीवाल यांनी लिहून दिले होते. त्यांचा अंदाज सहसा फेल जात नाही, पण गुजरातमधील मतदारांनी त्यांना चांगलाच चकवा दिला आहे. कॉंग्रेसला पाचपेक्षा एकही जादा जागा मिळणार नाही, असेही केजरीवालांनी लिहून दिले होते. तेथेच त्यांचे गणित चुकणार हे स्पष्ट झाले होते. कॉंग्रेसच्या बाबतीत त्यांनी जरा फाजिलपणाच केला होता. त्यामुळे त्यांनी स्वत:च्या पक्षाविषयी केलेला अंदाजही चुकणार असे अनुमान अनेक विश्लेषकांनी काढले होते. निदान गुजरातमध्ये आम आदमी पक्ष दुसऱ्या स्थानावर जरी आला तरी हा पक्ष भाजपला राष्ट्रीय पातळीवर पर्याय म्हणून पुढे येऊ शकतो, असे भाकित काही राजकीय निरीक्षक करताना दिसले होते.
दुर्दैवाने आम आदमी पक्षाचे गुजरातचे गणित आज तरी फसलेले दिसते आहे. गुजरातमध्ये न्यूज एक्सच्या पोलनुसार भाजपला 117 ते 140 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर कॉंग्रेसला 34 ते 51 आणि आम आदमी पक्षाला 6 ते 13 जागांचा अंदाज या वाहिनीने वर्तवला आहे. टीव्ही 9 गुजराथी या वाहिनीच्या सर्व्हेनुसार भाजपला गुजरातमध्ये 125 ते 130 जागा मिळतील असा अनुमान काढण्यात आला आहे. कॉंग्रेसला 40 ते 50 आणि आम आदमी पक्षाला या वाहिनीने 3 ते 5 जागांचा अंदाज वर्तवला आहे. बाकी तपशिलात न जाता गुजरात पुन्हा मोदींकडेच राहील, असा ढोबळ निष्कर्ष यातून सहज काढता येतो.
सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मोदींचे आव्हान कायम राहण्यासाठी गुजरातचा हा निकाल उपयोगी ठरणार आहे. गुजरातच्या सद्यस्थितीच्या अनेक भीषण कहाण्या लोकांना या प्रचाराच्या काळात ऐकायला मिळाल्या असल्या तरी गुजराथी जनता मात्र बिनदिक्कतपणे पुन्हा भाजपच्याच बाजूने उभी राहणार असल्याचे दिसते आहे. हिमाचलात दर पाच वर्षांनी सत्ता बदलाचा निर्णय तेथील मतदार देत असतात. त्यामुळे यंदा तेथे भारतीय जनता पक्षाचे सरकार जाऊन कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर येईल असा ढोबळ अंदाज वर्तवण्यात आला होता. पण आजच्या एक्झिट पोलच्या निकालात दोन्ही पक्षांची तेथे कांटे की टक्कर पहायला मिळणार आहे. तरीही या राज्यात भाजपची स्थिती कॉंग्रेसपेक्षा किंचित वरचढच राहील, असे संकेत वाहिन्यांनी दिले आहेत. तेथील विधानसभेत एकूण 68 जागा असून बहुमतासाठी 34 चा आकडा गाठणे महत्त्वाचे आहे. बहुतेक वाहिन्यांनी भाजप हा आकडा गाठेल असे नमूद केले आहे. कॉंग्रेस 25 ते 30 जागा मिळवू शकते असे अनुमान आहे.
हिमाचलने कॉंग्रेसची साफ निराशा केली आहे, असेही आपण म्हणू शकतो. कारण आलटून पालटून सत्ता देण्याची प्रथा तेथील जनतेने बाजूला ठेवून पुन्हा भाजपच्या पारड्यात वजन टाकण्याचा निर्णय घेतलेला दिसतो आहे. दिल्ली महापालिकेच्या निवडणुकांनाही खूप महत्त्व होते. दिल्लीत तिन्ही महापालिकांचे एकत्रीकरण करून तेथे एकच महापालिका स्थापन करण्यात आली होती. यामागेही भाजपची राजकीय खेळी होती हे लपून राहिलेले नाही. कारण पंजाबच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर दिल्लीत महापालिकेच्या निवडणुका होणार होत्या. त्यासाठी प्रत्यक्ष निवडणुकांचा कार्यक्रम तेथील निवडणूक यंत्रणेने जाहीरही केला होता. पण तो रद्द करून तिन्ही महापालिकांच्या एकत्रीकरणाचा घाट घातला गेला आणि ते कारण दाखवून या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
आम आदमी पक्षाची पंजाब निकालावरून जी हवा निर्माण झाली होती ती हवा मावळेपर्यंत उसंत घेण्यासाठी भाजपने या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. दिल्लीतील तिन्ही महापालिकांवर भारतीय जनता पक्षाचे सलग 15 वर्षांचे वर्चस्व होते. ते वर्चस्व नाहीसे होणार असा संकेत या आधीच मिळाल्याने भाजपने ही राजकीय खेळी करून आम आदमी पक्षाला रोखण्याचा डाव रचला होता. पण आजच्या एक्झिट पोलच्या निकालात भाजपचा हा डावही पूर्ण अपयशी झाल्याचे दिसले आहे.
भाजपला हा मोठा धक्का आहे. दिल्ली ही देशाची राजधानी आहे. संपूर्ण देशात भाजपचे वर्चस्व असताना देशाच्या राजधानीत मात्र या पक्षाला आम आदमी पक्षाकडून सातत्याने मोठे धक्के बसले आहेत. दिल्लीची जी दुर्दशा गेल्या पंधरा वर्षांत झाली आहे, ती दूर करून दिल्लीला चमकवण्याचे काम आम्ही करू या केजरीवालांच्या आश्वासनावर दिल्लीकर भाळले असल्याचे संकेत यातून मिळाले आहेत आणि भाजपला दिल्लीत पुन्हा एकदा नामुष्कीजनक स्थितीला सामोरे जावे लागणार असल्याचेही एक्झिट पोलच्या निष्कर्षावरून स्पष्ट दिसते आहे.
आज तकच्या सर्व्हेनुसार दिल्ली महापालिकेत आम आदमी पक्षाला 250 पैकी 149 ते 171 जागा मिळण्याचे संकेत असून भाजपला 69 ते 91 जागा मिळण्याची शक्यता आहे. दिल्ली महापालिका निकाल वगळता अन्य दोन महत्त्वाच्या राज्यात भाजपला पुन्हा सत्ता मिळण्याचे संकेत मिळाल्याने विरोधकांना लोकसभेसाठी मोठीच कंबर कसावी लागणार आहे, असा सारा रागरंग आहे.