– विलास पंढरी
यंदाची आषाढी एकादशी आज म्हणजे मंगळवारी 20 जुलै रोजी आहे. या निमित्ताने राज्यातील लाखो वारकरी पंढरपूरची चालत वारी करतात. मात्र, गेल्या वर्षीप्रमाणेच हा मोठा सोहळा यंदाही कोविड-19 संकटामुळे प्रतीकात्मक करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात “आषाढी एकादशी’ला विशेष महत्त्व आहे. या निमित्ताने निघणाऱ्या “पंढरपूर वारी’ला मोठी परंपरा आहे. आषाढी एकादशीला “महाएकादशी’ असेही म्हणतात. आषाढी एकादशी हे विष्णू देवतेचे व्रत आहे. या दिवशी विष्णुरूपी विठ्ठलाची पूजा-प्रार्थना केली जाते. आज महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या पांडुरंगाला भेटण्याचा वर्षातील सर्वात महत्त्वाचा दिवस. लाखो भक्त आषाढी वारीची वाट पाहात असतात. यंदाही करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकामुळे विठ्ठलाला प्रत्यक्ष भेटता येणार नसल्याने वारकऱ्यांमध्ये काहीशी नाराजी असली, तरी यात कुणाचीच चूक नसल्याने व वारकरी संप्रदाय मुळातच सहिष्णू असल्याने तुकोबा रायांच्याच पुढील अभंगानुसार-
हेचि थोर भक्ति आवडते देवा ।
संकल्पावी माया संसाराची ।।
ठेविले अनंते तैसेचि रहावे ।
चित्ती असो द्यावे समाधान ।।
असे मनाचे समाधान करीत वारकऱ्यांनी यंदाही पायीवारी रद्द करून देशापुढे समंजसपणाचा एक आदर्श ठेवला आहे.
पाऊले चालती पंढरीची वाट
सुखी संसाराची तोडूनिया गाठ
गांजुनिया भारी दुःख दारिद्य्राने
पडता रिकामे भाकरीचे ताट
पाऊले चालती…
आप्त इष्ट सारे सगेसोयरे ते
पाहुनिया सारे फिरविती पाठ
पाऊले चालती…
घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा
अशा दारिद्य्राचा व्हावा नायनाट
पाऊले चालती…
मन शांत होता पुन्हा लागे ओढ
तस्सा मांडी गोड संसाराचा थाट
पाऊले चालती…
समस्त वारकरी समाजाच्या मनातील भावनांचे वर्णन करणाऱ्या या अभंगातील भावनांना करोना महामारीच्या निर्बंधांमुळे मात्र यंदा मुरड घालावी लागली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान (आळंदी), संत तुकाराम महाराज संस्थान (देहू), संत मुक्ताबाई संस्थान (मुक्ताईनगर, जि. जळगाव), संत सोपानदेव महाराज संस्थान (सासवड, जि. पुणे), संत एकनाथ महाराज संस्थान (पैठण, जि. औरंगाबाद), संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान (त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक), संत नामदेव महाराज संस्थान (पंढरपूर), विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान (कवंड्यापूर, जि. अमरावती), संत चांगावटेश्वर महाराज देवस्थान (सासवड, जि. पुणे) या मानाच्या पालख्या पंढरपुरात पोहोचल्या आहेत. तशातच प्रशासनाने पंढरपूरमध्ये 19 जुलै ते 25 जुलैपर्यंत संचारबंदी लागू करण्याचे जाहीर केले आहे.
वारकरी संप्रदायात लहान-मोठा असा भेद नाही व अठरापगड जातींच्या संतांना मानणारे भक्त आहेत. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. “पंढरीचा वास, चंद्रभागेस्नान, आणिक दर्शन विठोबाचे’ या मनीषाने वारकरी वारी चुकवत नाहीत. ज्ञानेश्वर महाराजांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातींच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले. पुढे एकनाथ महाराज, तुकाराम महाराज यांसारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली.
आपले कर्तव्यकर्म निष्ठेने करीत असताना वारकरी भगवंताचे विस्मरण होऊ देऊ नये यासाठी गळ्यात तुळशीची माळ घालतात. स्नान करून कपाळी गोपीचंदनाचा टिळा लावावा. नित्यनेमाने हरिपाठ म्हणावा. संतांचे ग्रंथ वाचावेत. विठ्ठलाच्या मूर्तीचे दर्शन घ्यावे. भजन-कीर्तनात सहभाग घ्यावा. पंढरपूरवारी करावी तसेच एकादशी व्रत करावे. सात्त्विक आहार, सत्त्वाचरण करावे. परोपकार आणि परमार्थही करावा. जीवनातील बंधनातून, मोहातून हळूहळू बाजूस होऊन पांडुरंगाशी एकरूप व्हावे, नामस्मरण करावे, असा साधा आणि सरळ परमार्थ वारकरी संप्रदायाने सांगितला आहे.
संत साहित्याचे गाढे अभ्यासक सदानंद मोरे म्हणतात, पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचारधर्म होय. वारी ही ज्ञानदेव पूर्वकालीन प्रथा आहे, किंबहुना वारकरी हे नावच वारीमुळे पडले आहे. वारीतून या संप्रदायाची सामाजिकता आणि समाजाभिमुखता स्पष्ट होते. वारीची परंपरा सर्व संतांनी जतन केली.
यंदा आपण पंढरपूरला करोनाच्या प्रकोपामुळे जाऊ शकत नसलो तरी आता दूर दर्शनाच्या कृपेने आपल्या लाडक्या विठुरायाला घरात बसूनही पाहू शकता. विठ्ठलाची शासकीय महापूजाही पाहू शकता. मनात भाव असेल तर विठ्ठल घरी बसूनही नकीच पावू शकतो. मंदिरे बंद असली तरी आपल्या मनातील मंदिराचे गाभारे उघडे ठेवून विठोबाचे स्मरण करूया.