-माधव विद्वांस
गीतकार अनेक, संगीतकारही अनेक; पण आवाज आशाताईंचाच. मग गाणे कसलेही असो बालगीत, नाट्यगीत, प्रेमगीत, भावगीत, भक्तिगीत, आयटम सॉंग, रॉक, डिस्को, लावणी, भूपाळी, कव्वाली, गझल अशा सर्व प्रकारांना आवाज आशाताई यांचाच. माई व दीनानाथ मंगेशकर यांच्या पंचरत्नांपैकी आशाताई हे एक चमकते पाचूचे रत्नच म्हणावे लागेल. आज आशाताईंचे अभीष्टचिंतन.
आशाताईंचा जन्म सांगली येथे 8 सप्टेंबर 1933 रोजी झाला. त्या 9 वर्षांच्या असतानाच त्यांचे वडील मास्टर दीनानाथ यांचे निधन झाले. घरच्या आर्थिक अडचणीमुळे शालेय शिक्षण झाले नाही, पण वडिलांनी आशा व लता यांना घरीच शिक्षण दिले. तसेच संगीताचे संस्कारही केले. दीनानाथ मंगेशकर हे गायक, अभिनेते, निर्माते होते.
किर्लोस्कर नाट्यकंपनीत दाखल झाल्यावर पुणे येथे राहण्यास आले. पुणे येथे वर्ष 1942 मध्ये त्यांचे निधन झाल्यावर लतादीदींना गायनाची व अभिनयाची संधी मिळाल्याने माई मंगेशकर कोल्हापूरला आपल्या मुलांसह राहण्यास गेल्या. वर्ष 1945 मध्ये मंगेशकर कुटुंब मुंबई येथे स्थलांतरित झाले.
आशाजींनी जेव्हा गायनात आपले आयुष्य घडविण्याचे ठरविले त्यावेळी या क्षेत्रात गीता दत्त, शमशाद बेगम आणि त्यांच्या भगिनी लता मंगेशकर यांचाच बोलबाला होता. आशाताईंना सुरुवातीला दुय्यम दर्जाची गीते वाट्याला आली, पण त्यांच्या खुमासदार गायकीने त्या गीतांना अव्वल दर्जा मिळाला. आशाताईंचा आवाज हा सर्वच प्रकारच्या गीतांना न्याय देऊ लागला. त्यामुळे साहजिकच संगीतकारांना त्यांच्यातील अष्टपैलू गायनाची जाणीव झाली व त्यांच्याकडे कामाचा ओघ सुरू झाला.
आशाताईंनाही वर्ष 1943 मध्ये “माझा बाळ’ या चित्रपटाकरता गाण्याची संधी मिळाली. वर्ष 1948 मध्ये “चुनरिया’ या चित्रपटाकरता त्यांनी “सावन आया’ हे पहिले हिंदी गाणे कोरसमध्ये गायले होते. आशाजींनी मराठीबरोबर असामी, हिंदी, उर्दू, तेलगू, बंगाली, गुजराथी, पंजाबी, भोजपुरी, तमिळ, मल्याळम, इंग्रजी, रशियन, नेपाळी या भाषांमध्ये गायन केले आहे. त्यांनी चित्रपट, नाटक तसेच इतर अल्बम मिळून सुमारे 16 हजारांच्या आसपास गाणी गायली आहेत. त्यात एक हजारहून अधिक मराठी गाणी गायली.
“युवती मना दारुण रण’, “विलोपले मधुमिलनात या’, “शूरा मी वंदिले’, “रवी मी’ अशी नाट्यगीते त्यांनी गायली व रंगमंचावरही आपल्या गायनाचा ठसा उमटविला. “बैल तुझे हरिणावाणी’ हे बांधावरचे गीत, “अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया’ हे लावणी प्रकारातील कवी संजीव यांचे हे गीत “भाऊबीज’ या चित्रपटासाठी गायले. “ऋतू हिरवा’सारखे अनेक अल्बम त्यांच्या गाण्यांनी भरलेले आहेत. “नाच रे मोरा नाच’ हे त्यांचे “देवबाप्पा’ या चित्रपटातील गीत व “जिव्हाळा’मधील “चंदाराणी’, तर “चांदोबा चांदोबा’ ही गाणी बालचमूंसाठी आहेत. “प्रभाती सूर नभी रंगती’, “उठा उठा सकळ जन’, “पांडुरंग कांती’, “दिव्य तेज झळकती’ अशी भक्तिगीते आकाशवाणीवरून प्रभात वंदनेमध्ये ऐकण्यास मिळाली की दिवस नक्कीच चांगला जाणार.
“बचके तू रहना’ हे संदीप चौटा यांनी संगीतबद्ध केलेले गीत त्यांनी वयाच्या 69 व्या वर्षी गायले. तरुणाईला काय हवे याचे भान ठेवून आशाताईंनी आपल्या गळ्याचा काळानुरूप वापर केला हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या जादुई आवाजाने गीतामधील तसेच चित्रपटांतील प्रसंगानुरूप विरह, आनंद, लडिवाळपणा, आयटम सॉंगमधील बिनधास्तपणा उत्कटतेने प्रकट होतो. त्यांच्या गोड गळ्याबरोबर त्यांच्या हातालाही चव आहे. त्या उत्तम स्वयंपाक करतात.
आशाजींना आतापर्यंत सुमारे 40 पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत. त्यापैकी भारत सरकारचा पद्मविभूषण हा किताबही त्यांनी मिळविला आहे. अमरावती व जळगाव विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट उपाधी देऊन सन्मानित केले आहे. आशाताईंना दीर्घायुरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.