-हिमांशू
गर्दी हा जीवनाचा अविभाज्य भाग बनल्यानंतर गर्दीची ऍलर्जी देणारा करोना आला. मुंबईसारख्या ठिकाणी “जीवनरेखा’ म्हणून ओळखली जाणारी लोकलगाडी हेच तुंबळ गर्दीचं प्रमुख ठिकाण आहे. जीवन सुरू ठेवायचं असेल तर ही जीवनरेखा फार काळ बंद ठेवता येत नाही आणि झपाट्यानं पसरणाऱ्या जीवघेण्या करोनापासून जीव वाचवायचा असेल तर “जीवन’च पणाला लावावं लागतं. ही कसली परीक्षा घेतोय निसर्ग? तीही वर्ष उलटून गेलं तरी सुरूच आहे. काही तासांसाठी… नव्हे काही मिनिटांसाठी जग थांबलं तरी कोट्यवधींचं नुकसान होणार याची खात्री असण्याच्या काळात आपण आलो आणि या न दिसणाऱ्या अतिसूक्ष्म शत्रूने नेमका तिथेच प्रहार केलाय.
“नियम पाळा; नाहीतर लॉकडाऊनशिवाय पर्याय राहणार नाही,’ असं सतत सांगण्यावाचून शासनाकडे पर्याय नाही. नियमांची अंमलबजावणी करताना लोकांना जागोजागी हटकण्यावाचून प्रशासनाकडे पर्याय नाही. ही कसली वेळ आलीये? किती दिवस चालायचं हे असं? ही कसली भलतीच लढाई? कधी संपणार आणि कधी आपण जिंकणार? याच विवंचनेत आज संपूर्ण जग आहे. जीवनशैलीत अचानक झालेला थोडासा बदलसुद्धा आपल्याला झेपत नाही. अखेरीस “व्हायचं ते होऊ दे एकदाचं,’ म्हणून आपण बाहेर पडतो आणि आपल्यासारखीच विवंचना असणाऱ्या शेकडो-हजारोंच्या गर्दीत मिसळतो… तेवढ्यात आवाज येतो, “जिंदगी प्यारी है तो मूँह ढको, दूरी बनाओ!’
जीवन तर सुरूच ठेवायचंय आणि जीवही वाचवायचाय, हे सांगणारा एक “जागला’ भरगर्दीत जोरजोरात सूचना करीत असतो. “अरे भाई, लॉकडाऊन नही चाहिये तो मास्क लगाओ,’ असं खणखणीत आवाजात सांगत असतो. पेट्रोल पंपापासून, भाजी मंडईपर्यंत चौकाचौकात या गर्जना ऐकू येतात आणि ज्यांचा मास्क हनुवटीवर लोंबकळत असतो, अशी माणसं सावध होतात. औरंगाबादमध्ये मोटारसायकलवरून अशा प्रकारे प्रबोधन करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे सय्यद फतेमोहंमद ऊर्फ फतेमामू. रोज किमान दीडशे ते दोनशे जणांना मास्क लावायला भाग पाडणारे हे चाचा साठ वर्षांचे असून, लोणचं-पापडाचे ते फिरते विक्रेते आहेत.
आवाज असा भारदस्त, की ऐकल्याबरोबर आपोआप लोकांच्या नाकातोंडावर मास्क चढतो आणि लगट करून उभे असलेले लोक एकमेकांपासून लांब उभे राहून बोलू लागतात. पापड-लोणची विकण्यासाठी जो आवाज वापरायचा, तोच जनजागृतीसाठी! सकाळी सहा ते संध्याकाळी आठपर्यंत! साताऱ्यातसुद्धा करोनाच्या पहिल्या लाटेवेळी “सवयभान’ नावाची संस्था स्थापन करून असेच प्रयत्न झाले. रेडिओ-टीव्हीवर आणि सोशल मीडियावरून अनेकांकडून अनेकदा ऐकलेल्या या गोष्टी आपण गर्दीत शिरताच विसरून जातो. एखादे फतेमामू भेटले की दवंडीसारखी आपली मूळ जाहिरातसाधनं किती प्रभावी होती, याचा अंदाज येतो.
एकंदरीत करोनाने आपल्याला आपलं मूळ बऱ्याच ठिकाणी दाखवून दिलंय. काढे-वाफारे नित्याचे झालेत. पण डिजिटल विश्वात राहूनसुद्धा आपण दवंडीला अधिक प्रतिसाद देऊ, असं वाटलं नव्हतं. ठिकठिकाणी दिसणारे हे “जागले’सुद्धा या लढाईतले महत्त्वाचे योद्धे आहेत. एकतर ही लढाई न मानता, कुणालाही हरवायच्या राणा भीमदेवी गर्जना न करता आपण केवळ “बचावा’च्या गोष्टी कराव्यात, असं अनुभव आपल्याला सांगतोय. मानलीच लढाई तर योद्ध्यांमध्ये असे “जागले’ही महत्त्वाचे आहेत, हे विसरता कामा नये.