चला, तयारीला लागा. पावसाळी पर्यटनासाठी एक मस्त डेस्टिनेशन नव्यानं खुलं झालंय. तसं पाहिलं तर पावसाळ्यात फारसे लोक जात नाहीत तिथं; पण हाच तर बेनिफिट आहे ना! हॉटेलं ओस पडलेली असतात, डिस्टर्ब करायला कुणी नसतं, ऑफसीझन डिस्काउंट वगैरे मिळतो. अर्थात, ज्यांच्याकडे “लक्ष्मी’ जास्त झालीये, त्यांना डिस्काउंटचं काय कौतुक असणार म्हणा! पण पर्यटनासाठी आपल्याला जिथं जायचंय तिथल्या लोकांना मात्र “लक्ष्मी’ हवीच्चंय. ठिकाणाचं नाव सांगण्यापूर्वी तिथल्या प्रेक्षणीय स्थळांचा एक “प्रोमो’ पाहणं इष्ट ठरेल. आजकाल तिथं “आयकॅचिंग’ नजारा आहे.
भूस्खलन वगैरे गोष्टी एरवी बघायला मिळतात का आपल्याला? पण तिथे मात्र भूस्खलन इतक्या प्रचंड प्रमाणावर झालंय की, रेल्वेचे रूळ उखडून पडलेत. महाकाय रेल्वेगाड्या उभ्याउभ्याच “आडव्या’ कशा होतात, हे बघण्याची दुर्मिळ संधी आहे. रस्ताच तुटल्यामुळे घाटात अडकून पडलेले शेकडो ट्रक आणि गाड्यांचा “बर्ड आय व्ह्यू’ पाहूया वाटलं तर! नदीकाठीच नव्हे तर नदीपासून खूप अंतरावर असलेली घरंसुद्धा नदी कशी खेचून घेते हेही बघायला मिळणारंय. एरवी आपण टोल भरून मोठमोठ्या पुलांवरून प्रवास करतो. पण साकव किंवा लाकडा-बांबूचे तात्पुरते पूल आपल्याला फारसे पाहायला मिळत नाहीत, त्यातल्या त्यात असे पूल वाहून जाताना पाहण्यातली मौज काही औरच! इकडचे इकडं आणि तिकडचे तिकडं अडकलेले पाहणं..! व्वा!
गोठ्यातली जनावरं पाहण्यात फारशी मजा नसते; पण तीच पाण्याच्या प्रवाहाबरोबर वेगानं वाहून जाताना दिसली तर जाम मजा येईल ना..! दीड हजार जनावरं प्रवाहाबरोबर वाहताहेत तिथं! लवकर आवरा, नाहीतर आपण जाण्यापूर्वी ती जनावरं समुद्रात पोहोचतील. आणखी एक आकर्षण म्हणजे, रेल्वेच्या तिकिटात हवाई सफर… अन्यत्र कुठे मिळेल असं? पण तिकडे मात्र रेल्वे जहाजासारखी पाण्यातून चाललीये आणि रेल्वे प्रवाशांना “एअरलिफ्ट’ करताहेत… आपल्याला तरी ही संधी कधी मिळणार? पाऊस नाही, दुष्काळ पडला, पिकं कोमेजून गेली असं रडगाणं गाणारे शेतकरी आपल्याला पुष्कळ पाहायला मिळतात. पण तिकडे दहा हजार हेक्टर क्षेत्रावरची पिकं पाण्यात पूर्णपणे बुडालेली पाहायला मिळतायत…
अर्थात, तिकडचा शेतकरीही रडतोच आहे; पण आपल्याला फक्त बुडलेली पिकं पाहायचीत. धुवॉंधार कोसळणाऱ्या पावसात बाहेर पडायची हिंमत आपल्याकडे किती लोकांमध्ये असते? तिकडे अशा पावसातसुद्धा हजारो माणसं बाहेर फिरताना दिसतायेत… कारण त्यांचं घरच राहिलेलं नाहीये. 57 हजार लोकांना पावसानं घराबाहेर काढलंय. बरेचजण छोट्या-छोट्या नावांमधून तरंगताना दिसतायेत. आपण ओला-उबरमधून फिरतो ना, तसे..! अर्थात, काहीजण मरतायतसुद्धा; पण ते पाहणं ऐच्छिक आहे. पाहिलंच तर न पाहिल्यासारखं करणं मात्र सक्तीचं आहे!
एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा विभागातल्या कर्मचाऱ्यांची धावपळ तरी आपल्याला कधी पाहायला मिळणार! बेघरांसाठीचे तात्पुरते सरकारी निवारे कधी पाहायला मिळणार! तेव्हा त्वरा करा, आपल्याकडचे चाळीसेक लोक पुढं गेलेत. तिथल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय… “”पूर आला म्हणूून काय झालं? महापूर येऊ दे; पण येणाऱ्या “लक्ष्मी’कडे पाठ करणार नाही. “पाणपर्यटना’साठी त्यांचं खुलं आमंत्रण आहे आपल्याला. काय म्हणालात..? ठिकाणाचं नाव..? एवढं सांगूनसुद्धा ओळखता नाही आलं? अहो, गुवाहाटी..! आसाम..!