-हिमांशू
मावळतं वर्ष आणखी काय-काय पाहायला लावणार आहे, परमेश्वर जाणे! एकतर हे वर्षच आयुष्यातून “कंट्रोल-अल्टर-डिलीट’ करून टाकावं, या मूडमध्ये सगळेजण आहेत. पण पुढचं वर्ष तरी नेहमीसारखं असणार का, याची शाश्वती नसल्यामुळे अजून कुणी तसं केलेलं नाही.
करोनाची लस आली आणि ती टोचायला ब्रिटनमध्ये सुरुवातही झाली, तर नेमका ब्रिटनमध्येच करोनाचा नवा “स्ट्रेन’ कसा काय सापडला? असा प्रश्न जगाला पडलाय. पावणेदोनशे वर्षं ब्रिटिशांच्या गुलामगिरीत राहिलेल्या भारतीयांवर आता विमानतळावर जाऊन पुन्हा एकदा “सायमन परत जा’ म्हणण्याची वेळ आलीय. ब्रिटनमधून आलेले लोक देशात काही ठिकाणी पॉझिटिव्ह सापडलेत.
ही बातमी आम्ही एरवी पचवली असती. पण ब्रिटनमधून आलेल्या 109 जणांचा काही ठावठिकाणाच लागत नाही, हे ऐकून मात्र आम्ही गलितगात्र झालो आहोत. या मंडळींचे फोन बंद लागतायत आणि दिलेल्या पत्त्यावरही ते सापडत नाहीत, याला काय अर्थ आहे राव! आता त्यांना शोधायचं काम पोलिसांना दिलंय. नवा “करोना स्ट्रेन’ पहिल्यापेक्षा 70 टक्के अधिक शक्तिशाली आहे, असंही समजलंय. म्हणजे, इकडे शास्त्रज्ञ लस शोधत राहणार आणि तिकडे करोनाचा विषाणू बहुरूप्यासारखी रूपं बदलून, “मिस्टर इंडिया’सारखा अदृश्य होऊन आपल्यासमोर येणार. लशीचे परिणाम आणि दुष्परिणाम, दोन्ही बाबतीत अंधार असल्यामुळे सगळे हवालदिल. अशा मानसिकतेत कॅलेंडर तर बदलावंच लागणार!
ब्रिटनमधून येऊन अंतर्धान पावलेल्या प्रवाशांना शोधून काढण्यात पोलिसांना आणि इतर संबंधित यंत्रणांना यश येईल-न येईल; पण पोलिसांनी त्यांची नेहमीची कामं तरी व्यवस्थित करावीत, ही अपेक्षा गैरवाजवी नसावी. पोलिसांना पाहून सामान्यतः चोर पळून जातात, असा अनुभव आहे. परंतु आपल्याकडे पोलीस बऱ्याच वेळा चोर सोडून संन्याशाला ताब्यात घेत असल्यामुळे पोलिसांना बघून संन्याशी पळून जातात. एकवेळ हेही मान्य करता येईल. परंतु चोरांना पाहून पोलीस पळून जातात हे कसं पचवायचं? पुण्यातल्या एका सोसायटीत पहाटे तीनच्या सुमारास चोर शिरले असल्याची माहिती पोलिसांना त्याच सोसायटीतल्या रहिवाशांनी केलेल्या फोनवरून मिळाली.
पोलीस घटनास्थळी (वेळेत) पोहोचले आणि चोर बाहेर येण्याची वाट पाहू लागले. परंतु चोर जसे इमारतीतून बाहेर आले, तसे त्यांना पाहून पोलीसच पळून गेले, असं दृश्य सोसायटीच्या सीसीटीव्हीनं पुणेकरांना दाखवलं. सामान्यांना पोलिसांची भीती न वाटता त्यांचा आदरयुक्त धाक आणि आधार वाटला पाहिजे हे खरं; पण चोरांना मात्र पोलिसांची फक्त भीतीच वाटायला हवी. तीही वाटली नाही तरी चालेल एकवेळ; पण पोलिसांनाच चोरांची भीती वाटायला लागली तर सर्वसामान्य नागरिकांनी कुणाच्या भरवशावर नव्या वर्षात पदार्पण करायचं?
असो! याच पोलिसांच्या धाकात राहून नववर्षात पदार्पण करायला आम्ही तयार आहोत. 31 डिसेंबरच्या रात्री सोशल डिस्टन्सिंग वगैरे नवे नियम सोडाच; पण सर्वसाधारण नियमसुद्धा कुणाच्या लक्षात राहत नाहीत, इतकी नशा सर्वत्र भरलेली असते. हे ओळखून पर्यटनस्थळं आणि ठिकठिकाणची हॉटेलं, रिसॉर्ट अशा ठिकाणी रात्री दहा वाजताच सगळं सेलिब्रेशन उरकायचे आदेश आलेत. आदेश मोडल्यास पोलिसांचे फटके मिळतील आणि ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसलं तर अब्रूही जाईल, याचं भान अब्रूदारांना आहेच!