विक्रम नोंदवण्याचे दिवस आहेत. या मौखिक विक्रमांच्या ऐतिहासिक नोंदी घेण्यासाठी मागेपुढे कॅमेरे फिरत आहेत. टोला-प्रतिटोला, आगपाखड, दणका, शरसंधान, तडाखा, खोचक टीका, सडेतोड प्रत्युत्तर, मोठा आरोप, वादग्रस्त विधान, जीभ घसरली, जाहीर आव्हान, मोठा वाद होण्याची चिन्हं हे शब्द चोवीस तास अस्खलितपणे कानांना ऐकू आले पाहिजेत आणि डोळ्यांना दिसले पाहिजेत, अशी कडेकोट व्यवस्था करण्यात आलीये.
प्रत्येकाला संधी आहे पातळी सोडण्याची आणि प्रत्येक जण या संधीचा पुरेपूर वापर करतो आहे. कोण कोणत्या देवळात गेलं, कुणी ज्योतिषाला हात दाखवला, कुणी बोटचेपी भूमिका घेतली, कुणी गद्दारी केली, कुणी घरच सोडलं नाही, कुणी भूमिका बदलली, कुणी तत्त्वांना तिलांजली दिली… खरं तर कंटाळा आलाय ना या सगळ्याचा? शंभर टक्के आलाच असणार! एकाचा तोल सावरेपर्यंत दुसऱ्याचा तोल जातो, हा निव्वळ योगायोग बिलकूल नाही. आपल्याला देण्यासारखं कुणाकडेच काही शिल्लक नाही (विचारसुद्धा!), म्हणून सुरू झालेला फुकटच्या टीआरपीचा हा खेळ आहे.
जनसामान्यांना काहीही फुकट मिळालं तर त्याला “रेवडी’ म्हणणारे एकमेकांची “रेवडी’ उडवून निःशुल्क प्रसिद्धी मिळवत आहेत. त्यांचा जाहिरातखर्च वाचलाय. काल तर या खेळात खूप इन्व्हॉल्व्ह झाल्यामुळे आम्हाला असा साक्षात्कार झाला, की या सगळ्याचे क्लासेस सुरू करून पैसा कमवावा. वृत्तवाहिन्यांना नवे शब्द पुरवण्याचाही ऑप्शन होता; पण…
“मॅचफिक्सिंग’मध्ये सहभाग नको म्हणून चॅनेल बदललं, तर तिकडेही “रेकॉर्डब्रेक’ झालेलं..! न्यूझीलंडविरुद्ध चांगली चाललेली मॅच बंद पडलेली… पुन्हा एकदा पावसामुळं..! जास्तीत जास्त वनडे अपूर्ण राहण्याचा विक्रम टीम इंडियाच्या नावावर नोंदवला गेलेला. आतापर्यंत भारताच्या एकंदर 42 वनडे पावसानं खाल्ल्यात! अशा वेळी टीव्ही बघणारे आमच्यासारखे एवढे नाराज होतात, तर हातात झेंडे घेऊन, चेहरे रंगवून स्टेडियमवर जाणारे चाहते किती नाराज होत असतील..! त्यांचं तर आर्थिक नुकसानही झालेलं असतं. नियमानुसार, मॅच सुरू होण्याआधीच पाऊस आला तर तिकिटाचे पैसे परत मिळतात; पण एक चेंडू जरी टाकला गेला तरी संबंधित आयोजक तिकिटाचे पैसे परत देण्यासाठी बांधिल नसतात. काही आयोजक अशा वेळीही मन मोठं करून पैसे परत देतात म्हणे!
पूर्वी वाटायचं, हवामानशास्र विभागाकडून सल्ला घेऊनच मॅचच्या तारखा का निश्चित केल्या जात नाहीत? परंतु पुढे या विभागाचा “लौकिक’ समजल्यावर या प्रश्नाचं उत्तर आपोआपच मिळालं. आता तर कुणीच पावसाचं भाकित वर्तवू शकत नाही, अशा अवस्थेपर्यंत आपण पोहोचलोय. सांगली, साताऱ्यातसुद्धा ऐन नोव्हेंबरात पाऊस पडलाय. दुःख मॅच रद्द झाल्याचं नाही हो… आम्हाला पुन्हा चॅनेल बदलावं लागलं, त्याचं आहे!
कितीही चॅनेल बदलले तरी वास्तव बदलत नाही… क्लायमेट चेंज हेच आजचं वास्तव; मग क्षेत्र कोणतंही असो! श्वास घ्यायची चोरी व्हावी, एवढंच नव्हे तर आपल्याला श्वास घेता येत नाहीये, याकडेही कुणाचं लक्ष नसावं इतका हा बदल भयावह आहे. शेतात कधी पेरावं आणि कधी पीक कापावं, हे जसं शेतकऱ्याला कळेनासं झालंय आणि भरपाई देताना विमा कंपनी हात वर करतीये… थोड्याफार फरकानं सगळ्यांची तीच अवस्था..!