पुण्याच्या नागरिकांच्या प्रचंड सभेत महाराष्ट्र जनता आघाडीची स्थापना
आचार्य अत्रे, बापट, कोठारी, ठाकरे प्रभूतींची जनतेस हाक
पुणे, ता. 30 – “समितीच्या तलवारीला पोलादी पाणी देण्यासाठी महाराष्ट्र जनता आघाडीची स्थापना करण्यात येत आहे. समितीमधील दोष दूर करण्याचा प्रयत्न विचारपूर्वक झाला पाहिजे. या ऐतिहासिक गरजेमधून या आघाडीचा जन्म झालेला आहे,’ असे उद्गार आज आचार्य प्र. के. अत्रे यांनी शनिवारवाड्यासमोर भरलेल्या प्रचंड सभेत काढले.
संयुक्त महाराष्ट्र समितीमधील पक्षीयता नष्ट करून तिचे संघटित राजकीय पक्षात रूपांतर करण्यासाठी महाराष्ट्र जनता आघाडीची स्थापना 25 हजार नागरिकांच्या जाहीर सभेत आज करण्यात आली. “प्रभात’कार श्री. वा. रा. कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या या सभेत आघाडीला सेनापती बापट यांनी आशीर्वाद दिला. प्रबोधनकार ठाकरे यांनी आघाडीचे उद्घाटन केले, आचार्य अत्रे यांनी उद्दिष्टे विशद करून सांगितली व रघुनाथ खाडीलकर यांनी या उपक्रमाचे स्वागत केले.
आपल्या प्रास्ताविक भाषणात श्री. कोठारी म्हणाले, “मोर्चे, सत्याग्रह या गोष्टींचा राज्यकर्त्यांवर काही परिणाम होऊन, संयुक्त महाराष्ट्राचा आणि सीमेचा प्रश्न सुटेल, अशा भ्रमात कुणी राहू नये. समितीने सत्ता हाती घेतली तरच द्विभाषिक मोडता येईल व सीमेचा प्रश्न सोडवता येईल. समितीमध्ये फूट पडेल, समिती मंत्रिमंडळ बनवू शकणार नाही या आशेवर सत्ताधारी लोक निर्धास्त आहेत. हा धोका टाळावयाचा असेल तर समितीचा एक पक्ष झाला पाहिजे. जनता वाटेल तो त्याग करावयास तयार आहे ही गोष्ट उघड झालेली आहे. पक्ष सोडल्याशिवाय आम्ही समितीच्या उमेदवारांना मते देणार नाही असा निर्धार जनतेने केला पाहिजे. महाराष्ट्राची अस्मिता पणास लागलेली असताना कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षनिष्ठेचा बडेजाव मांडण्याचे कारण नाही. लोकांचे कल्याण हे जर राजकीय पक्षाचे मुख्य उद्दिष्ट असेल तर समितीमार्फत साधता येईल. त्याला पक्षाच्या अस्तित्वाची मुळीच गरज नाही.’
शासनविरहीत समाज जयप्रकाश यांची कल्पना
मुंबई – राजकीय पक्ष आणि शासनसंस्थाविरहित समाजाची कल्पना जयप्रकाश नारायण यांनी येथील एका भाषणात मांडली. शासनसंस्थेचे दडपण नसलेल्या समाजाचे स्वप्न कार्ल मार्क्स प्रभूतींनी डोळ्यापुढे ठेवले होते. समाजाची आर्थिक क्षेत्रे ग्रामपंचायतींनी हाती घ्यावी. सामाजिक विकासाचे कार्य त्यांनीच करावे अशीच त्यांची कल्पना होती.