चार विरोधी पक्ष एकत्रित लोकसभा निवडणूक लढवणार
नवी दिल्ली, दि. 20 – संघटना कॉंग्रेस, समाजवादी, भारतीय लोकदल व जनसंघ हे चार पक्ष “जनता पार्टी’ या नावाखाली लोकसभा निवडणुका लढवतील; परंतु त्यांचे प्रत्यक्ष विलिनीकरण निवडणुकांनंतर होईल, असे सं. कॉंग्रेस नेते मोरारजी देसाई यांनी घोषित केले.
वेळ इतका थोडा आहे की, एकत्रिकरणासाठी जरूर असलेल्या काही तांत्रिक व कायदेशीर गोष्टी या वेळात पुऱ्या करता येणे शक्य नाही. निवडणुका झाल्या, की लगेच आम्ही 4 पक्षांचे एका पक्षात प्रत्यक्ष विलिनीकरण करू. तथापि निवडणुकांसाठीही आम्ही एक पक्ष म्हणूनच काम करू. निवडणूक आयोग जनता पक्षाला सहकार्य देऊन समान निवडणूक चिन्ह देईल अशी आशा आहे.
मोकळ्या जमिनी ताब्यात घेण्याबाबत पुण्यात कायदा?
पुणे – झोपडवासीयांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक त्या मोकळ्या जमिनी ताब्यात घेण्याची तरतूद असलेला कायदा पुणे शहरालाही लवकरच लागू करण्यात येण्याची शक्यता विभागीय आयुक्त श्यामकांत मोहनी यांनी बोलताना व्यक्त केली. अशा तऱ्हेची एक योजना तयार होऊन शासनाकडे मंजुरीसाठी आली असून आगामी अधिवेशनात त्यास मंजुरी मिळेल अशी आशा आहे.
हा कायदा मुंबईला नुकताच लागू करण्यात आला आहे. या कायद्याने, ज्या खासगी जागांवर झोपडपट्ट्या आहेत, त्या जागांचा विकास करण्यासाठी शासनाला संमती मिळते. तसेच या कायद्यानुसार खासगी मालकांना भाडेही घेता येणार नाही. तसेच सरकारी जागेवर नवीन झोपड्याही येऊ शकणार नाहीत.