-उत्तम पिंगळे
कालच प्रा. विसरभोळ्यांकडे गेलो. आगाऊच स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या, तर मला म्हणाले, आज तर पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन आहे. तुम्ही मला उद्या शुभेच्छा द्या. त्यावर मी त्यांना म्हणालो की, मी उद्या फोन करतो. आपल्या राज्यासह इतर अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे या महिन्यातील सणवार साधेपणाने साजरे करावे, असे सगळे आवाहन करीत आहेत.
मग सध्याचा कळीचा काश्मीर विषय निघाला. त्याच्यावर प्राध्यापकांनी खूपच वाचन केले होते. मला म्हणाले की, यावेळचा स्वातंत्र्यदिन पूर्णपणे वेगळा असणार आहे. कारण काश्मीर पूर्णपणे भारतात विलीन झालेला असून जम्मू-काश्मीर व लडाख दोन केंद्रशासित प्रदेश बनले आहेत.
प्राध्यापक म्हणाले की, काश्मीरचा लडाख भाग पूर्णपणे वेगळा असून बौद्धधर्माचे लोक जास्त आहेत. खूप प्रदेश असला तरी लोकसंख्या खूपच कमी आहे. सुरुवातीपासूनच त्यांना लडाख हा वेगळा प्रदेश हवा होता. कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये काश्मीरचाच विकास झालेला नसल्याने लडाखचा काय होणार? सरकारने संसदेत केलेल्या आकडेवारीतून काश्मीरवर केलेला प्रचंड खर्च नेमका कुठे गेला हाच प्रश्न आहे. आता लडाखमध्ये खऱ्या अर्थाने विकासाची सुरुवात होईल. आजच्या स्वातंत्र्यदिनाची तर लडाखी लोकांनी पूर्णपणे जय्यत तयारी केलेली आहे. तसेच प्रतिनिधीगृह नसलेल्या केंद्रशासित प्रदेश असल्याने विकास जलद होईल.
आता जम्मू-काश्मीर भागात संमिश्र वस्ती आहे तसेच जम्मूमध्येही 370 कलम रद्द केल्याचे जोरदार स्वागत केले गेले. आता वेगाने कामाला सुरुवात होऊन नवे विकासपर्व सुरू होईल असेच सर्वांना वाटत आहे. आता पुढील महत्त्वाचा भाग म्हणजे काश्मीर खोरे, जेथे मूळ काश्मिरी लोक जास्त आहेत. सध्या संचारबंदी असल्यामुळे खोऱ्यामध्ये शांतता असली तरी सरकारची खरी कसोटी संचारबंदी उठवल्यानंतर आहे. मुळात काश्मिरी नेते, तसेच पीडीपी नॅशनल कॉन्फरन्स व हुर्रियत कॉन्फरन्स इतर अनेक फुटीर संघटना यांचा 370 कलम हटवण्यास विरोध आहे. ते लोकांना भडकावू शकतात म्हणून तेथे सरकारची कसोटी आहे.
आता अनेक चर्चांमधून समजून आलेले आहे की, मोठमोठ्या काश्मिरी नेत्यांची मुलंबाळे, नातेवाईक हे सर्व काश्मीरबाहेर मोठमोठ्या शहरांत किंवा परदेशांत अत्यंत चांगल्या वातावरणात राहतात. “पत्थरबाजी’मध्ये यांचे कुणीच नाहीत. पण हेच नेते चिथावणीखोर भाषणे करून तरुणांना बिघडवत आहेत. सरकारला या सामान्य लोकांचा विश्वास संपादन करावा लागेल. केवळ नेत्यांना दुषणे देऊन लोक समजतील असे नाही.तर कलम 370मुळे या सामान्य लोकांचा विकास कसा झाला नाही हे अधोरेखित करून दाखवावे लागेल. लोकांनाही वर्षानुवर्षे हेच पाहायची सवय होती. जनतेला काही योजना प्रत्यक्षात ताबडतोब अमलात आणून दाखवून कसा फायदा होतो ते दाखवणे आवश्यक आहे. काही हिंसक आंदोलने होऊ शकतात. त्यांचा कठोरपणे बीमोड करणे आवश्यक ठरेल. सामान्य जनतेच्या स्थानिक नेत्यांना विश्वासात घेणे आवश्यक ठरेल. यामुळे लोकांपर्यंत संदेश पोहोचवणे सोपे जाईल. विरोधी पक्षानेही चिथावणीखोर वक्तव्य करून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. काश्मीरचे कलम तर रद्द केलेले आहे; पण काश्मीरला पूर्णपणे देशात मिसळण्याचे शिवधनुष्य अजून पेलायचे आहे. त्यासाठी आजचे स्वातंत्र्यदिनी जय हो!