-डॉ. नीलम ताटके
“सांगा कसं जगायचं, रडत रडत का गाणं म्हणत’ ही मंगेश पाडगावकरांची कविता प्रत्यक्षात उतरवून गाणं म्हणत जगणारी, स्वतःचं आयुष्य स्वतः घडवणारी माणसं आपल्या आसपास फार कमी असतात. त्या व्यक्तींपैकी एक डॉ. सुधीर राशिंगकर आहेत, असं म्हणावं लागेल. त्यांचंच हे आत्मचरित्र “माझे जीवन गाणे’.
ग्रामीण भागात गेलेलं बालपण त्यामुळे अर्थातच सोयीसुविधा कमी. परंतु, तशाही परिस्थितीत शिक्षणासाठी अनेक ठिकाणी केलेलं स्थलांतर, लहान वयात कुटुंबापासून लांब राहणं हे सगळं स्वीकारून इंजिनिअरिंगची पदवी घेऊन, पुण्यातल्या टेल्को, कुपर यांसारख्या नामवंत कंपन्यांमध्ये नोकरी करून किंबहुना तिथले सुरक्षित उत्पन्न, नोकरी सोडून व्यवसायात उडी घेतली. व्यवसाय करणं अर्थातच सोपं नव्हतं.
बाजारपेठेचा अभ्यास, व्यवसाय मिळविण्यासाठी करावी लागणारी धडपड, पैशाची गणितं जमवणं, परदेशवाऱ्यांसाठी त्याकाळी करावी लागणारी किचकट कामे, मिळवाव्या लागणाऱ्या परवानग्या आणि एवढं सगळं करून लगेच ऑर्डर मिळेल असं नाही परंतु “भावी ग्राहक’ म्हणून चांगले संबंध जोपासणं हे व्यवसायात करावंच लागतं ते त्यांनी केलं. त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि अनेक देशातून त्यांना ऑर्डर मिळायला लागल्या.
व्यवसायाच्या बरोबरीने रोटरी क्लबच्या कामात त्यांनी रुची घेऊन अनेक पदे भूषविली. रोटरी क्लबच्या माध्यमातून अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या, मोठा जनसंपर्क प्रस्थापित केला. कार्यक्रमांचं संयोजन केलं. देश विदेशात भरपूर प्रवास केला. परदेशी पाहुण्याचा आपल्या देशातही पाहुणचार केला. त्यांना अनेक प्रकारची मदत केली. रोटरीच्या कामात त्यांची पत्नी सौ. आशा याही सक्रिय सहभागी होत्या. त्यांच्या पत्नीचे त्यांना प्रत्येक कामात मिळालेले सहकार्य फार मोलाचे वाटते. पूर्ण कुटुंबच उच्च शिक्षित आहे, महत्त्वाकांक्षी आहे.
डॉ. राशिंगकर यांनी व्यवसायाच्या निमित्ताने अनेक प्रसंग अनुभवले, अनेक व्यक्ती त्यांना भेटल्या. आपल्या अनुभवाचा इतरांना उपयोग व्हावा या हेतूने त्यांनी ग्रंथनिर्मिती केली. त्यांच्या शीर्षकावरूनच विषयाची कल्पना येते. उदा. तुमचे भवितव्य तुमच्या हाती, स्वयंविकासाची वाटचाल, बदलेल तो जिंकेल, उद्योजक व्हा. शिक्षणाला वयाचे कोणतेही बंधन नसते या न्यायाने त्यांनी जेव्हा संधी मिळाली तेव्हा पीएच.डी. पदवी संपादन केली. या सगळ्यातून त्यांचं व्यक्तिमत्त्व प्रगल्भ झालं. त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीत प्रथम पत्नीच निधन, द्वितीय पत्नीचे आजारपण, निधन हे मनाला क्लेशदायी नक्कीच होतं. पण त्यातही “शो मस्ट गो ऑन’ या तत्त्वाने ते सतत कामात राहिले.
असं हे जीवनगाणं व्यथा असो किंवा आनंद असो अशा दोन्हीही प्रसंगी गायलेलं, निश्चितपणे प्रेरणादायी!
हे सगळं कथन निवेदन स्वरूपात आलेलं आहे. यात आई, वडील, कुटुंबीय यांचं व्यक्तिचित्रण घटना, प्रसंग यातून ठळकपणे यायला हवं होतं. केलेल्या परदेश प्रवासातील प्रेक्षणीय स्थळं (वेगळी), एखादा लक्षात राहिलेला संवाद रूपातील प्रसंग हेही यायला हवं होतं असं वाटलं. माझे जीवन गाणे हे पुस्तक उत्कर्ष प्रकाशननाने प्रकाशित केले आहे.