लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांची निवडणूक रणनीती भाजपला पुन्हा एकदा सत्तेकडे घेऊन गेली असली तरी विरोधकांच्या चुकलेल्या रणनीतीनेही या विजयाला हातभार लावला होता. आतापर्यंतची सर्वात चुरशीची मानली गेलेली ही निवडणूक भाजप आघाडीने जेवढी एकत्रपणे आणि गांभीर्याने लढली तेवढी एकी आणि गांभीर्य कॉंग्रेस आघाडीला दाखवता आले नव्हते हे वास्तव आहे; पण आता विरोधक जागे झाले आहेत, असे संकेत मिळत आहेत.
महाराष्ट्रात लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत असाच फटका बसू नये म्हणून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी आतापासूनच हालचाली सुरू केल्या आहेत. गेल्या काही दिवसांत या दोन्ही पक्षांच्या पातळीवर झालेल्या घडामोडी पहिल्या तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी राजकीय मैत्री उदयाला आली तर नवल वाटायला नको. नवे मित्र शोधावे लागत असल्यामागील कारणेही तशीच आहेत. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला दारुण पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर आता दोन्ही पक्षांनी चिंतन बैठका घेत पराभवाची कारणे शोधायला सुरुवात केली आहे. शिवाय, आगामी विधानसभा निवडणुकीकरिता देखील तयारी सुरू केली आहे. पण, कॉंग्रेसने नुकत्याच घेतलेल्या बैठकीमध्ये मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसविरोधात सूर निघाला. आघाडी झाली तरी राष्ट्रवादी पक्ष कॉंग्रेसला मदत करणार नाही.
राष्ट्रवादी पक्ष अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करतो. त्यामुळे राष्ट्रवादीबरोबर आघाडी नको असा सूर देखील या बैठकीमध्ये निघाला. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आघाडी करण्यापेक्षा वंचित बहुजन आघाडीबरोबर आघाडी करावी अशी मागणी यावेळी बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी केली. दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मनसेचे राज ठाकरे यांची भेट घेतल्याने नवीन राजकीय समीकरणांची नांदी मिळत आहे. गेली विधानसभा निवडणूक कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना या सर्वांनीच स्वबळावर लढवली होती. नंतर शिवसेना पुन्हा भाजपबरोबर आली आणि यावेळी मात्र शिवसेना-भाजपने विधानसभेसाठी देखील युतीची घोषणा केली आहे. पण, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीबाबत मात्र अद्याप तरी कोणतीही ठोस अशी घोषणा झालेली नाही. उलट नवीन मित्रांचा शोध घेतला जात आहे. राजकारणातील नैसर्गिक भागीदार असलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांना अद्यापही एकमेकांविषयी भरवसा वाटत नाही. त्यातूनच नवनवीन पर्याय शोधले जात आहेत.
लोकसभा निवडणुकीत कोणतीही अपेक्षा न ठेवता कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांचा प्रचार करणारे राज ठाकरे यांना आघाडीत घ्यावे असा सूर पूर्वीपासूनच निघत होता; पण काही कारणाने अशी आघाडी झाली नाही तर राष्टवादी कॉंग्रेस राज ठाकरे यांच्या मनसेबरोबर आघाडी करू शकेल, असे संकेत मिळत आहेत. कॉंग्रेसच्या बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आघाडी करण्यापेक्षा वंचित बहुजन आघाडीबरोबर आघाडी करावी अशी जी मागणी करण्यात आली आहे त्यालाही म्हणूनच महत्त्व आहे. एकतर मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आक्रमक असल्याने कॉंग्रेसला तो मुद्दा मान्य होण्याची शक्यता नाही. त्यामुळेच त्यांना प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर आघाडी हवी आहे. आंबेडकर यांनीही लोकसभा निवडणुकीत आपली ताकत दाखवून दिली आहे. म्हणूनच कॉंग्रेसने मैत्रीचा हात पुढे केला असला तरी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर विधानसभेसाठी आघाडी करण्यापेक्षा स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी प्रकाश आंबेडकर यांनी सुरू केली आहे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दहा आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा करून त्यांनी खळबळ उडवून दिली आहे.
लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी निर्णायक ठरली होती. महाराष्ट्रातील सुमारे 10 लोकसभा मतदारसंघांत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाराष्ट्रातील पराभवास ऍड. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी कारणीभूत ठरल्याचे चित्र मतदानाच्या आकडेवारीवरून समोर आले होते. नांदेड, परभणी, हातकणंगले, सांगली, अकोला, सोलापूर यांसह सुमारे 10 मतदारसंघांत “वंचित’च्या उमेदवारांनी लाखाच्या आसपास मते घेतल्यामुळे येथील कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागल्याचा निष्कर्ष काढावा लागत आहे. दहा लोकसभा मतदारसंघ म्हणजे 50 विधानसभा मतदार संघ मानले तर ही ताकद मोठी आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत या प्रकारच्या पराभवाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कॉंग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीला हातमिळवणीचा प्रस्ताव देऊन चर्चेसाठी पुढे येण्याचे आवाहनही केले होते. आता कॉंग्रेसच्या बैठकीतही तोच सूर निघत आहे; पण कॉंग्रेसला ज्याप्रमाणे राज ठाकरे यांचे वावडे आहे त्याचप्रमाणे राष्ट्रवादीला वंचित बहुजन आघाडीशी आघाडी करण्यात फारसा रस नाही.
शरद पवार यांनी कधीही याबाबत पुढाकार घेतला नाही ही परिस्थिती पाहता एकीकडे कॉंग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि मनसे असे नवीन राजकीय भिडू तयार होतात का, अशी शंका येत आहे. अर्थात, प्रकाश आंबेडकर आणि राज ठाकरे हे दोघेही नेते आघाडीत जाण्यापेक्षा स्वबळ अजमावणे पसंत करतील ही शक्यताही नाकारता येत नाही. यावेळच्या लोकसभा निवडणुकीचे महत्त्व लक्षात घेऊन भाजपने आपल्या मित्रांना जवळ आणण्याचा जो यशस्वी प्रयोग केला तो कॉंग्रेस आघाडीला जमला नाही. शिवसेनेने मोदी आणि भाजप यांच्यावर प्रचंड टीका करूनही भाजपने शिवसेनेचा विश्वास पुन्हा मिळवला आणि त्यांच्या एकीमुळेच त्यांना यश मिळाले.
राज्यात भाजपचे रामदास आठवले यांच्यासारखे आणखी मित्र पक्ष आहेत; पण त्यांच्यापैकी कोणालाही लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली नव्हती तरीही ते पक्ष भाजपसोबत राहिले अशी रणनीती कॉंग्रेस आघाडीला आखता न आल्यानेच मित्र दुरावले आणि मतांमध्ये फूट पडली. विरोधकांमधील दुही आणि दुराग्रह हेच अशा प्रकारे विरोधकांच्या दारुण पराभवाचे कारण असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सावध भूमिका घेऊन पावले टाकली जात आहेत. एक मात्र निश्चित झाले आहे की, आगामी विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि राज ठाकरे यांचा मनसे या दोन पक्षांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.