-नारायण ढेबे
कवी रामनाथ जव्हाड एक साहित्यिक, पत्रकार, कार्यकुशल नेता आहेत; पण या सगळ्यापेक्षा ते एक माणूस म्हणून दुर्लभ व्यक्तिमत्त्व आहे.
रामनाथ जव्हाड आणि माझा परिचय अलीकडेच महाराष्ट्र राज्य पत्रकार सेवा संघामुळे आला. त्यांचे बोलणे, त्यांची विचार करण्याची पद्धत या गोष्टी मला हळूहळू कळू लागल्या. आमची फोनवरच मैत्री जमली आणि ते मला वेगवेगळ्या पद्धतीचे मार्गदर्शन करू लागले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आयुष्य उजळून निघते असा वेगळा अनुभव मला येत होता.
त्यांच्यामुळेच मला पत्रकारसंघात पुणे जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. मला पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून काम कराल का? अशी विचारणा झाली. मी जव्हाडांना म्हणालो, “हे मला जमेल का? त्यावर त्यांनी सांगितले, का जमणार नाही? आम्ही आहोतच ना?’ तुम्हाला जिथे अडचण येईल तेथे मला सांगा मी तुमच्याबरोबर आहे. तो त्यांचा शब्द आजपर्यंत त्यांनी पाळला आहे. वयाने आणि अनुभवाने ते वडीलधारे आहेत.
पुण्यात एक कार्यक्रम घ्यावा असा आमचा सर्व पत्रकारसंघाच्या सभासदांचा आग्रह होता. तेव्हा साहेब म्हणाले, तुम्ही कार्यक्रम घ्या. फार कमी वेळामध्ये कार्यक्रम करण्याचे ठरवले. त्यात प्रत्येक जिल्ह्यातून एक नाव निवडायचे आणि त्याला राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार द्यायचा अशा थीमवर काम करू लागलो. जव्हाडांनी कमिटी बनवली. पत्रकार निवड करण्याची सर्व जबाबदारी स्वतःवर घेतली. ते त्या कमिटीचे अध्यक्ष होते. संपूर्ण महाराष्ट्रातून निवड करायची तीही पत्रकारांची हे अवघड काम त्यांनी सोपे केले.
10 फेब्रुवारी 2019 रोजी पुण्यातील एस. पी. कॉलेजमध्ये कार्यक्रम घेतला. तेथे 28 आदर्श पत्रकार पुरस्कार, एक जीवनगौरव पुरस्कार आणि एक समाजगौरव पुरस्कार दिला. त्याला अनेक मान्यवर आले होते. आमचे उपाध्यक्ष राजेंद्र बनकर देखील तळागाळातून वर आलेत. त्यांचीही काम करण्याची पद्धत आणि हरहुन्नरी असे व्यक्तिमत्त्व आहे.
जव्हाड साहेबांचा आणखी एक गुण म्हणजे पत्रकार संघाची बांधणी करताना अनेकांची मने राखावी लागतात. हे संघटन कौशल्य त्यांच्याकडे आहे. अनेक पत्रकार हे प्रखर आणि सडेतोड बोलणारे असे असतात. पण त्यांच्याकडे असणारा संयम, शांतपणा, वाक्चातुर्य, मृदु स्वभाव तसेच सर्वांना बांधून ठेवण्याची जबरदस्त शक्ती यामुळे त्यांनी हे काम चोख पार पाडले. पत्रकारांच्या समस्या, त्यांच्यावर होणारे अन्याय, त्यांच्या हक्कांची जपणूक करण्याची मनाशी इच्छाशक्ती बाळगणारा असा हा माणूस.
वंचित पत्रकारांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहिले पाहिजे त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार दिला पाहिजे. अडीअडचणीत मदत झाली पाहिजे. मग ती वैयक्तिक स्वरूपात असो किंवा सामाजिक, शासकीय स्वरूपात असो; पण मदत होणे फार मोलाचे असते. ते काम जव्हाड करत आहेत याचा मला फार अभिमान आहे.