-जयेश राणे
विवाह हा एक संस्कार आहे म्हणून त्यास विवाह संस्कार असे म्हटले जाते. प्रेमविवाह (लव्ह मॅरेज) आणि जुळवून विवाह करणे (अरेंज मॅरेज) असे 2 प्रकार रूढ झालेले आहेत. सध्या बहुतांशपणे प्रेमविवाहच करण्यात येत आहेत. जुळवून विवाह करणे हा भाग अल्प होत चालला आहे. प्रेमविवाह केला तरी पैशांपेक्षा ती व्यक्ती कशी आहे, याकडे लक्ष असायला हवे. प्रेमात आंधळे न होता डोळसपणे राहायला शिकले पाहिजे.
प्रेमविवाह करणाऱ्या मंडळींचे सूत कधीपासून जुळलेले असेल हे नक्की सांगता येत नाही. काहीजण प्रेम म्हणजे काय हे माहीत होण्याआधीपासूनच म्हणजे अगदी इयत्ता 5वीत असल्यापासूनही एकमेकांकडे आकर्षिले जात असतात. ते आकर्षण का आहे? हे त्यांचे त्यांनाही कळत नसते. हे आताच नाही, तर गेल्या अनेक वर्षांपासून असेच चालत आले आहे. पण यातील फार अल्प मंडळी विवाह या सूत्रापर्यंत पोहोचतात. कारण आपण जसे पुढच्या इयत्तेत जात असतो, तसे आपले विचारही बदलत असतात. अनेक नवीन मित्रमैत्रिणी भेटत असतात. त्यासह नवीन विचारांचीही देवाणघेवाण होत असते.
बऱ्यापैकी समज येण्यास आरंभ झालेला असतो. त्यामुळे अपेक्षा वाढलेल्या असतात. पूर्ण समज आलेली असते, असे म्हणता येणार नाही. विचारांच्या स्तरावर प्रेम असेल तर त्या नात्यात कधीच खोट येत नाही. अलीकडे मात्र विचार बाजूला राहिले आहेत. अविचारी मार्ग पत्करला जाऊन सामाजिक व्यवस्थाच नेस्तनाबूत करण्यासाठी कंबर कसली जात आहे का? असा प्रश्न पडावा तशी विदारक स्थिती अवतीभवती दिसत आहे.
शाळा-महाविद्यालय, नोकरी-व्यवसाय येथील आडोशाच्या ठिकाणी प्रेमीयुगुल हमखासपणे पाहाण्यास मिळतात. मॉल झाल्यापासून ते एक नवीन ठिकाण त्यांना मिळाले आहे. बर, ही मंडळी अश्लील कृत्ये करत असल्याने इतरांसाठी ते अवघडल्यासारखे असते. मात्र “निर्लज्ज मंडळी सदा सुखी’ असतात. हे काही विवाह या विषयापर्यंत पोहोचणारे प्रेम नाही. नेमक्या याच गोष्टीने देशाच्या युवा पिढीला विचारांच्या स्तरावर पांगळे केले आहे. त्यामुळे त्यांना विवाह या सूत्रापर्यंत जाण्यात काडीमात्रही रस नसतो. त्यांच्या आवडी केवळ शारीरिक सुखाशी संबंधित असतात. या सूत्राशी निगडित मुद्दा म्हणजे गर्भपात. विवाहपूर्व शारीरिक संबंध म्हणजे अनैतिक कृत्यामुळे झालेली गर्भधारणा होय. तो गर्भ पाडण्यासाठी म्हणजे आपले दुष्कृत्य लपवण्यासाठी गर्भपात केला जातो.
विवाहपूर्व शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या युगुलांमुळे विवाह या पवित्र बंधनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन संकुचित झाला आहे. अशी मंडळी कामवासनेच्या जाळ्यातून बाहेर येणे अशक्यच असते. अशा लोकांचा विवाह होणे म्हणजे समोरील मुलगा, मुलगी यांची घोर फसवणूक होय. विवाह या सूत्रांकडे आयुष्याची नवीन सुरुवात म्हणून पाहिले जात असते. कारण त्या व्यक्तीसह आयुष्य काढायचे असते. ज्याच्यासह हा प्रवास करायचा असतो तो विश्वासार्ह असणे अत्यावश्यक असते. त्याच्या भूत काळाविषयी नंतर कळल्यावर त्या व्यक्तीविषयी पूर्वीप्रमाणे प्रेम, आदर, आपुलकी राहत नाही. यातूनच त्याच्यापासून वेगळे होण्याची भावना मनात रुजू लागते. त्याचे रूपांतर वादात होऊ लागले तर घटस्फोट अटळ असतो.
विवाह जुळवण्यात काही अडचणी येतात. त्यातील मुख्य अडचण म्हणजे मुलाची आर्थिक परिस्थिती. ती पाहूनच विवाह करण्यास होकार येतो. अन्यथा नाहीच. त्यापेक्षा मुलीने जर स्वतःहून चांगला मुलगा पाहिला तर बरे अशी काही मुलींच्या पालकांची अव्यक्त इच्छा असते. आम्ही जुळवून दिलेल्या मुलाशी पटले नाही, तर उद्या त्याचा दोष आम्हाला लागू नये, हा एक प्रमुख विचार त्यामागे असतो. अशा प्रकारे विवाहाचे वर्तमान स्वरूप झाले आहे.
मुलाकडे स्वतंत्र फ्लॅट, उत्तम वेतनाची नोकरी असेल तरच त्याने विवाह करावा अशी जुळवून करण्यात येत असलेल्या विवाहाची बैठक पक्की झाली आहे. विवाह करून घरी येण्यापूर्वीच मुलगी म्हणते की, मला वेगळे घर पाहिजे. असे झाले म्हणजे मुलाच्या पालकांनी कुठे जावे? हा समाजात चर्चिला जात असलेला सत्य प्रश्न आहे. तुमच्या संसारात आमचा अडथळा नको म्हणून मुलाचे पालक नाराज मनानेच यासाठी राजी होतात. एकत्र राहणे नकोसे झाले आहे. जे काही असेल ते स्वतंत्र असावे, अशी स्थिती आहे. त्यामुळे आपण भारतात जरी राहत असलो तरी प्रत्यक्ष जीवन जगताना मात्र विदेशी चाली रितींप्रमाणे ते जगत आहोत. हे आपल्यासाठी घातक आहे. तुमच्या घरामध्ये “डसबिन’ किती आहेत? असे विचारणाऱ्या उच्चशिक्षित मुलीही आहेत.
“डसबिन’ म्हणजे वयस्कर मंडळी. अर्थातच असे सर्वच विचारत नाहीत. या बदलत्या विवाहाच्या स्वरूपात बाह्य गोष्टींना पुष्कळ महत्त्व असल्याचे अधोरेखित होते. भारताची समाजव्यवस्था भक्कम करायची असेल तर एकत्र कुटुंब पद्धतीला प्राधान्य मिळणे अनिवार्य आहे. “एकीचे बळ मिळते फळ’, असे म्हटले जाते ते उगाचच नाही. या वाक्यात गहन आणि महत्त्वपूर्ण अर्थ दडलेला आहे. त्याप्रमाणे वाटचाल करूया.