-दत्तात्रय आंबुलकर
आठ वर्षांपूर्वी अजिंक्य व सत्यजित हांगे हे दोन भाऊ बॅंकेत काम करीत होते. बॅंकेच्या कामकाजाशिवाय त्यांना शेती व त्यातही सेंद्रिय शेतीमध्ये रुची होती. आपल्या याच आवडीला त्यांनी रोजगार-व्यवसायाचे स्वरूप देण्याचे ठरविले, त्यासाठी जिद्दीने त्यात यश संपादन केले त्यांचीच ही यशोगाथा.
अजिंक्य व सत्यजित या दोघांचे शिक्षण एमबीएपर्यंत झालेले. बॅंकेची आपली नोकरी सोडून घरची परंपरागत ऊस शेती करण्यास त्यांनी सुरुवात केली. शैक्षणिकदृष्ट्या एमबीए व त्याला बॅंकेतील आर्थिक-व्यावसायिक कामाच्या अनुभवाची जोड मिळाल्याने या दोघांनी आपल्या ऊस शेतीचा अभ्यास करण्यास सुरुवात केली.
त्यावेळी त्यांच्या असे लक्षात आले की परंपरागतरित्या उसाची लागवड केल्यास त्यांना उसाचे दरएकरी जास्तीत जास्त 90 टन ऊस उत्पादन मिळू शकते. यामागचे कारण त्यांच्या लक्षात आले की आजवर त्यांच्या घरी शेती करताना केवळ उसाची लागवड-उत्पादन यावरच लक्ष देण्यात आले होते व शेतजमीन आणि तिचा दर्जा आणि कस हे मुद्दे पूर्णपणे दुर्लक्षितच राहिले होते.
हांगे बंधूंना हे कळून चुकले की शेतीला उत्पादक व उपयुक्त करायचे असेल तर जमीन कसदार असणे आवश्यक आहे. यासाठी त्यांनी अभ्यासांती सेंद्रिय शेतीचा अवलंब केला. आपल्या प्रयत्नांच्या पहिल्या टप्प्यात 4 गायींसह सुरुवात केली. त्यांनी त्याचवेळी आपल्या शेतीत गायींचे शेणखत व गोमुत्राचाच वापर करण्याचे ठरविले. आठ वर्षांनंतर आज त्यांच्याकडे 80 गायी असून त्यांच्या साऱ्या शेतीत आता शेणखत व सेंद्रिय खतांचाच उपयोग केला जात आहे.
अजिंक्य व सत्यजीतच्या या प्रयत्नांमुळे त्यांच्या शेताला आता सेंद्रिय शेती म्हणून शास्त्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. सेंद्रिय शेतीमुळे आज त्यांच्या शेतीत धान्य, ऊस, भाजीपाला मिळून सुमारे 15 प्रकारच्या धान्यांची लागवड केली जात असून उत्पादकतेसह अव्वल दर्जा त्यांनी साध्य केला.
कीटकनाशक म्हणून ते देशी पदार्थ आणि उपाय-उपचारांचाच प्रयोग करतात. यामध्ये प्रामुख्याने दशपर्णीचा उपयोग केला जातो. यात मुख्यतः कडुनिंब, पपई, सीताफळ यांसारख्या झाडांच्या पानांच्या रसाचा उपयोग केला जातो व त्याचा उपयोग परिणामकारक व पिकाला उपयुक्त दिसून आला आहे. ही पाने आणि त्यांच्या दशपर्णी प्रयोगासाठी फारसा खर्च पण येत नाही.
सुरुवातीची चार वर्षे वेगळेपणे व सातत्याने सेंद्रिय शेतीचा प्रयोग केल्यानंतर हांगे बंधूंनी त्यानंतर आपल्या शेती उत्पादनांची व्यावसायिक विक्री करण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी आपली उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यास सुरुवात केली. त्यातून मध्यस्थाचे कमिशन घटल्याने ग्राहक पण माफक दरात सेंद्रिय उत्पादने मिळू लागल्याने विशेष समाधानी झाले.