-हिमांशू
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो, असं म्हटलं जातं. बऱ्याच वेळा ही स्त्री त्याची पत्नीच असते आणि बहुतांश पती आपल्याला यश मिळाल्यानंतर त्यातला तिचा वाटा मोठा असल्याचं बोलूनही दाखवतात. अर्थात, सर्वच पुरुष यशस्वी होतात असं नाही आणि यशस्वी न होणाऱ्यांच्या अपयशामागे त्यांच्या पत्नीचा हात असतोच असं नाही. काहीजण (स्त्री-पुरुष दोघेही) केवळ आपल्या मेहनतीच्या जोरावर यशस्वी होतात आणि काहीजणांचे प्रयत्न (स्त्री-पुरुष दोघेही) केवळ आपल्या जोडीदारामुळे अयशस्वीही होतात.
एक मात्र खरं की, यशस्वी पुरुषांचे पुतळे उभे राहतात, तसे सावलीसारखी सोबत करणाऱ्या पत्नीचे पुतळे कुणी उभारत नाही. अनेक वेळा, अनेक बाबतीत “इन्व्हेन्शन’ करणाऱ्या पत्नीला कोणत्याही बाबतीत कधीच “पेटेन्ट’ मिळत नसतात. परंतु कर्नाटकातल्या एका यशस्वी उद्योजकानं जेव्हा आपल्या पत्नीचं स्वप्न पूर्ण करणारं घर बांधलं, तेव्हा गृहप्रवेशाच्या वेळी त्याची पत्नी सोफ्यावर बसलेली पाहून अनेकांना हादरा बसला.
कारण तीनच वर्षांपूर्वी तिरुपतीला गेलेली असताना तिचा अपघाती मृत्यू झाला होता. मग सोफ्यावर बसली आहे ती कोण? असाच प्रश्न प्रत्येकाला पडला होता. घाबरेघुबरे होऊन काहीजण सोफ्याजवळ गेले तेव्हा त्या माउलीच्या दोन्ही मुली आईची केशरचना करण्यात, साडी ठीकठाक करण्यात गुंतल्याचं दिसून आलं. बऱ्याच वेळानंतर सर्वांना समजलं की, उद्योजकाच्या पत्नीचा तो सिलिकॉनचा पुतळा होता.
कर्नाटकच्या कोप्पलचे रहिवासी असलेल्या श्रीनिवास गुप्ता या उद्योजकाची ही कहाणी. त्यांच्या पत्नी माधवी यांच्या मनात घराची संकल्पना निश्चित होती. त्या संकल्पनेच्या आधारेच श्रीनिवास यांनी पत्नीसाठी “ड्रीम हाउस’ बांधलं; पण गृहप्रवेशाच्या वेळी माधवी हयात नव्हत्या. पत्नीचा हुबेहूब सिलिकॉन, मेणाचा पुतळा श्रीनिवास यांनी नव्या घराच्या सोफ्यावर ठेवून तिला आदरांजली वाहिली. श्रीधर मूर्ती या बंगळुरूच्या कलावंतानं वर्षभरात हा पुतळा तयार केला. एकीकडे हयात नसलेल्या पत्नीला अशा रूपात नवीन घरात घेऊन जाणारा उद्योजक दिसत असतानाच दुसरीकडे पत्नीपासून स्वतः दूर राहणारा आणि आपल्या मुलीला पत्नीच्या तावडीतून सोडवण्यासाठी “हेल्पलाइन’वर मदत मागणारा पती गुजरातेत दिसला.
तापी जिल्ह्यातील एका गावातून हेल्पलाइनवर फोन करणारा हा गृहस्थ हिरे कारागीर आहे. तो सूरतमध्ये राहतो आणि दर आठवड्याला घरी येतो. प्रत्येक वेळी आपल्या मुलीला पत्नीने मारहाण केल्याचं त्याला दिसून येत होतं. त्यानं पत्नीला बऱ्याच वेळा समजून सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु मारकुट्या पत्नीनं काहीही न ऐकता मुलीला मारहाण सुरूच ठेवली. हेल्पलाइनवर फोन आल्यावर समुपदेशक जेव्हा त्या गावात पोहोचले, तेव्हा मुलीच्या अंगावर जखमा आणि त्यातून होणारा रक्तस्राव दिसून आला.
एकीकडे पत्नीला मृत्यूनंतरही मानाचं स्थान देणारा पती आणि दुसरीकडे मुलीसाठी पत्नीविरुद्ध तक्रार करणारा पती अशी दोन उदाहरणे एकाच वेळी डोळ्यासमोर असताना पती-पत्नीच्या नात्यातल्या टोकाच्या विरोधाभासाचं दर्शन घडतं. सामान्यतः पत्नीविषयी कुणाचं कितीही वाईट मत असलं, तरी पडत्या काळात साथ देणारी ती एकमेव व्यक्ती असते. म्हणूनच पत्नीविषयीचा आदर सुप्तपणे पतीच्या मनात असतो. लग्नानंतरचं आयुष्य पत्नीने पतीच्याच अटी-शर्तींवर जगायचं, या नियमाला श्रीनिवास यांच्यासारखे अपवाद दिसले की बरं वाटतं.