-अशोक सुतार
वेळ अशी की, दु:ख पांघरून पाखरे निःस्तब्ध व प्राण कंठावर अन् उरात पेटलेली उन्हाची काहिली! पाखरांनी आता जगण्याची आशा सोडलीय. सर्व काही ठीक होईल, हा झाला आशावाद. तो असतो मृगजळासारखा…
पूर्वी पाखरांचे एक सुंदर जग होते. बागेत जेव्हा पाखरे आनंदाने शिळ घालत रानोमाळ भटकत तेव्हा फुले मोहरायची, काही मस्त मजेत डोलायची. तलावातील पाण्यात बदक पोहायचे. काही पाखरे चिमणचोचीने पाणी प्यायची. झाडांमध्ये सळसळता उत्साह जाणवायचा आणि झरे खळखळून वाहायचे, प्रीतिची गाणी गायचे. ऐन वसंतात रविराजाने आपली वक्रदृष्टी साऱ्या जगतावर फिरवावी! लालभडक डोळे, रागावलेली मुद्रा आणि त्याच्या डोळ्यांतून शंकराच्या तिसऱ्या नेत्रातील ज्वाळा बाहेर पाडाव्यात, हे अजबच आहे. त्यामुळे पाखरे अस्वस्थ झाली आहेत.
पाखरांनी घरटी तयार करून झाडावर राहावे तर पाखरांवर मानवाने झडप घातलेली! त्यांना हुसकावून लावत त्यांच्या घरट्यांवर आक्रमण करत मानवाने झाडांची कत्तल केली. नंदनवनाचे वाळवंट झाले, आता पाखरांनी जावे तरी कुठे? कवी ग्रेस यांनी म्हटले आहे की, असे कसे सुने सुने, मला उदास वाटते, जशी उडून चालली पाखरे उन्हात चालली कुठे? तशीच नेमकी परिस्थिती पाखरांची झाली आहे. पुन्हा पाखरे नवनिर्मिती लढतील काय? हो, त्यांना लढावेच लागेल. कारण संघर्ष हेच कदाचित आयुष्य असावे. पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल.
नंदनवनाचे वाळवंट झाले आणि पाण्यानेही पाखरांची साथ सोडली. पाणी म्हणजे जीवन, जीवन एक संघर्ष ! आता करा संघर्ष पाण्यासाठी. वृक्षही गेले आहेत. पाने, फुले यांचा मागमूसही उरला नाही. मानवाने आता नवी वस्ती वसवली आहे, वनेही तयार केली आहेत, पण ती सिमेंटची. जिकडे पाहावे तिकडे सिमेंटची जंगले. त्यात मानवतेला हद्दपार केलेल्या श्वापदांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. सिमेंटच्या जंगलातून विष ओकत जाणाऱ्या काळ्या नागिणी, पिसाटलेला वारा, रासायनिक ढगांनी भरलेले काळेभिन्न आकाश आणि कडाडणाऱ्या विजा यांनी वातावरण पेटले आहे.
बड्या महालांत “चिअर्स अप’चा जल्लोष ऐकू येत आहे. तर वादळात विस्कटलेल्या घरट्यांत कुठेतरी एखादी पणती तग धरून कशीबशी फडफडत आहे. त्या पणतीच्या उजेडात काही मृतप्राय पाखरे तर कुणाचे पंखच छाटलेले दिसत आहेत. मानवाने आपल्या चंगळवादासाठी बागा, वृक्षलता, जंगले उजाड केले. त्यासोबत जलाच्याही समाध्या बांधल्या. मानवता तर हद्दपार झाली आणि लांडग्यांचे कळप फिरू लागले. वातावरण दूषित झाल्यावर पाखरांनी मान टाकली ती पुन्हा वर केलेली नाही.
पाखरे अखेरचा श्वास मोजत असताना कुणीतरी चारपाच जण दिवा घेऊन अंधारातून येताना दिसत आहे. त्यांचे पंख थोडेफार छाटले आहेत, जखमाही वाहत आहेत. तरीही ते आंतरिक ऊर्जेने पुढे चालत आहेत. कोण बरे हे देवदूत की…? प्रत्येक पाखराच्या मनात शंका-कुशंका! ते चारपाच जण आले आणि त्यांनी त्या दु:खी पाखरांना उराशी धरून कवटाळले, प्रेमाने थोपटले आणि प्रत्येक पाखराच्या हातात काही बिया ठेवल्या आणि म्हणाले, आम्ही तुम्हाला शोधत आलो. अंधारात बुडायचे की प्रकाशात उडायचे हे आता तुम्ही ठरवा. ते देवदूत निघून गेले. पाखरांना जगण्याची नवी उमेद मिळाली. त्यांनी पंख झटकले आणि उजेडात उंच भरारी घेतली.