निवडणुकीच्या काळात हिंसाचार होणारच असे मानले जायचे. अर्थहीन आरोप आणि परस्परांवर चिखलफेकही होणार हे गृहीत धरले गेले. नंतर निवडणूक आयोगाने वेसण घातली आणि बऱ्याच गोष्टी आटोक्यात आल्या. नक्षल प्रभावित राज्यांतील किरकोळ घटना वगळता शांततेत निवडणुका पार पडण्याची सवय झाली. मात्र असे हे शांततेचे वातावरण आताशी कुठे स्थिरस्थावर होऊ पाहात असताना चिंता वाढवणाऱ्या घटना घडल्या आहेत.
हिंसाचार हद्दपार झाला असे वाटत असतानाच त्याने आपला भेसूर चेहरा दाखवला आहे. हा चेहरा किती उग्र आणि ओंगळ असू शकतो ते मंगळवारी प. बंगालमध्ये पाहायला मिळाले. तद्वतच मध्य प्रदेशातही वेगळ्या प्रकारचा वैचारिक हिंसाचार पाहायला मिळाला. महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्याला देशभक्त म्हणण्याचे व त्याचे समर्थन करण्याच्या ओंगळ प्रकाराचे दर्शन झाले. तत्पूर्वी एका शहीद पोलीस अधिकाऱ्याचाही अवमान केला गेला. बंगालमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोच्या वेळी भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांत हाणामारी झाली. दगडफेक व जाळपोळही झाली. दोन राजकीय पक्षांतील संघर्ष यापुरता हा विषय असता तर एकवेळ ते क्षम्य होते. मात्र, त्याची झळ जे हयात आहेत त्यांना आणि जे हयात नाहीत, अशा राष्ट्रपुरुषांनाही बसली.
थोर समाजसेवक ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड झाली. आता दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि त्यांचे नेते परस्परांना गुंड संबोधत असून परस्परांकडे बोट दाखवत आहेत. एक पक्ष केंद्रातील सत्ताधारी आहे, तर दुसरा राज्यातील. त्यातही सर्वसामान्यांच्या दुर्दैवाने म्हणूया, माघार घेणे अथवा विनम्रता दाखवणे, झालेली चूक मान्य करत प्रायश्चित्त घेणे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना माहीत नाही. ते कायम आक्रमण करण्याच्या “मूड आणि मोड’मध्ये असतात. आपला हा आक्रस्ताळेपणा हा त्यांना गुणविशेष वाटतो व त्याचे भांडवल करण्यातच धन्यता वाटते. अशा नेत्यांच्या कळपात राहणाऱ्यांचे विचारही त्यापलीकडे झेप घेत नाही. अशा वेळी उद्धट आणि उद्दामपणाला उधाण येते आणि त्यात त्यांची जी काही मर्यादित कुवत असते त्यानुसार ते कृती करतात. त्यात विटंबना होते विद्यासागर यांची आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची.
वास्तविक बंगालचा भूतकाळ मोठा गौरवशाली. त्यांची सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा समृद्ध आहे. गेल्या दोन अडीचशे वर्षांच्या ज्ञात इतिहासात या राज्याने भारताला दिशा दर्शवण्याचे काम केले. ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्याची ज्योत येथल्या मातीतच प्रज्वलित झाली. आपले आचार आणि विचारस्वातंत्र्य याला त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले. परकीय राजवटीत त्यावर वरवंटा फिरवला जात असल्याचे जाणवल्यावर या राज्यातील युवक पेटून उठला. त्यांनी देशभर या राजवटी विरुद्ध रान पेटवले. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील प्रत्येक पानावर बंगाल आणि तेथील देशप्रेमींचा अमिट ठसा उमटला आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर या राष्ट्रवादाला, चैतन्याला योग्य दिशा देण्याचे कार्य काही काळ बऱ्यापैकी चालले. नंतर निवडणुका आल्या, राजकीय पक्ष आले, पक्षांतील मतभेद आले, त्यातून हिंसाचार आला, जाळपोळ सुरू झाली आणि बॉम्बहल्लेही होऊ लागले. ज्या विचार स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला आणि बलिदान दिले त्याचेच या सगळ्यात विस्मरण झाले.
हिंसाचार हाच येथील राजकारणाचा स्थायीभाव झाला. आपली विचारधारा योग्यच आहे म्हणण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. मात्र, त्याचवेळी दुसऱ्याच्या मतांचा आदर करण्याची ऋजुताही असायला हवी. पण तसे करण्याचा मोठेपणा नाही. तीन दशके या राज्यावर डाव्या पक्षांचा एकछत्री अंमल होता. ममता बॅनर्जी यांनी त्या सत्तेला एकहाती यशस्वी आव्हान दिले. या काळात त्यांना बऱ्याच अपमानांना सामोरे जावे लागले. प्रचंड संघर्षही करावा लागला. एकदा तर त्यांच्या केसांना धरून त्यांना राज्य सचिवालयातून घालवून देण्यात आले होते, असे किस्से सांगितले जातात. अशा संघर्षातून जे राजकीय यश ममता यांनी प्राप्त केले ते खरेच अद्भुत आहे. त्यामुळे त्या सत्तेवर आल्यानंतर राज्याच्या राजकीय संस्कृतीत काही गुणात्मक बदल होईल अशी अपेक्षा धरणे सर्वथा योग्यच. कारण ज्याने अत्यंत वाईट पाहिले आणि सोसले असते, त्यालाच चांगल्याची किंमत कळते. तथापि, ममतांच्या राजवटीतही कोणताही गुणात्मक बदल होऊ शकला नाही.
विरोधकांना नेस्तनाबूतच करायचे हाच त्यांचाही खाक्या आहे. मंगळवारी झालेली जाळपोळ आणि विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड हे त्याचेच द्योतक. लोकशाहीत मतभेद असले तरी लोकशाहीने जी चौकट आखून दिली आहे, त्यातच काम करावे लागते. तिचे संकेत पाळावे लागतात. हा भाग ममतांकडून क्वचितच पाहायला मिळाला. केंद्र सरकार मग ते कोणाचेही असो, त्यांच्या प्रत्येक निर्णयाला आणि कृतीला विरोध करणे आणि आपल्या अधिकारांवर अतिक्रमण असल्याचा समज करून दंड थोपटण्याने राज्याचे भले होत नाही. ते ममतांनी ध्यानात घेतले नाही. तद्वतच आपल्याशी सुसंगत अशी जर कोणत्या नेत्याची वर्तणूक नसेल तर तो नेता तुमचा प्रतिस्पर्धी असतो, शत्रू नसतो. शिवाय त्याचे राज्य तुमचे शत्रूराष्ट्र नसते, याचे सर्व दिल्लीश्वरांनाही भान असायला हवे. मात्र, आपले विचार थोपवण्याच्या आणि अहंकार कुरवाळण्याच्या नादात त्यांच्याकडूनही सातत्याने मर्यादाभंग होत गेला. बंगालमध्ये त्यांना जशास तसे उत्तर दिले गेले एवढेच.
अहिंसा, सदाचार आणि पराकोटीचा संयम ही महात्मा गांधी यांची आयुधे होती. कोणतीही हिंसा अथवा तिचे समर्थन न करता त्यांनी ब्रिटिशांना या देशातून बाहेर घालवले. त्यांचे वर्तन आणि कृतीच अशी असायची की विरोधक निरूत्तर होत असायचा. अशा या राष्ट्रपुरुषाची हत्या झाली. तो कधीच न मिटणारा डाग आहे. सतत बोचत राहणारी वेदना आहे. ती विसरण्याचा प्रयत्न व्हायला हवा. किंबहुना या अध्यायाची सावलीही आपल्या वर्तमानावर पडणार नाही याची सतत दक्षता घ्यायला हवी. मात्र, निवडणुकीची कावीळ झालेल्यांना याचे वैषम्य नाही. गांधीजींच्या मारेकऱ्यालाही प्रशस्तीपत्रक देऊन जखम कुरतडण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सातत्याने केला जातो.
निवडणुका संपल्या की त्यात सहभागी असलेल्या पात्रांचे आयुष्य पुन्हा सुरळीत सुरू होते. मात्र, निवडणुकीच्या काळात त्यांच्याकडून समाजमनावर जे घाव घातले जातात, ज्या जखमा उघड्या केल्या जातात त्या तशाच ठसठसत राहतात. त्याचे त्यांना सोयरसूतक नसते. हे चित्र बदलणे आवश्यक आहे. राजकीय पक्षांनी थोडीतरी जबाबदारीची जाणीव ठेवावी. ते दाखवतात तेवढी जर त्यांना देशाची आणि जनतेच्या भवितव्याची खरेच चिंता असेल तर सर्वप्रथम त्यांनी त्यांचे आचरण बदलावे.