-मनस्विनी साखरदांडे
जगण्याच्या प्रवासात आपल्याला अनेक कर्तव्ये पार पाडायची असतात. कितीतरी जबाबदाऱ्या अंगावर घ्याव्या लागतात. (असं म्हणू हवं तर की, अंगावर येऊन पडतात!) उदरनिर्वाहासाठी दिवसातले कित्येक तास आपण काही काम करीत असतो. तिथले आपले सहकारी, शेजारी, दुकानदार… आपण कसे वागतो या सगळ्यांशी? मित्रत्वाने, आपुलकीने की अलिप्तपणे?
काही लोकांना असे वाटत असते की, भेटणारी प्रत्येक व्यक्ती आपल्याला फसवायलाच बसली आहे! आपण सांगितले की, डॉक्टरांनी चाचण्या करून घ्यायला सांगितल्यात. तर हे म्हणणार, “काही नाही रे, पैसे काढायचे धंदे!’ पेपर टाकून गेलेला मुलगा उशिरा आला की, ह्यांना वाटते, लवकर उठायला नको अलीकडच्या मुलांना! आपण समोरच्या विरुद्ध पार्टीतले आहोत, असेच ते समजतात.
पण त्यामुळे होते असे की, परस्परसंबंधातले वातावरण गढुळते. विश्वासाचे, आपुलकीचे राहात नाही. एखादी गोष्ट खेळीमेळीने साधली असती, त्याऐवजी ती करून घेण्यासाठी मग जास्त कष्ट घ्यावे लागतात. कारण तुमच्या वागण्याचा समोरच्यावरपण परिणाम होतोच ना! आपला दृष्टिकोन स्वच्छ, सौहार्दाचा असेल तर त्याची आपल्याला चांगलीच फळे मिळतात.
नव्याने कारखानदारी सुरू झाली, तेव्हा सर्वसाधारणपणे एक असा दृष्टिकोन असे की, कमीत कमी खर्चात उत्पादन बनवायचे आणि जास्तीत जास्त किमतीला ते विकायचे. यातच कंपनीचा फायदा आहे असे समजले जात असे. डब्ल्यू. एडवर्डस डेमिंग याने पहिल्यांदा “गुणवत्तेचा आग्रह एक धोरण’ हा सिद्धान्त मांडला. कोणत्याही कामाची गुणवत्ता राखणे आणि ती वाढवत नेणे याला त्याने जास्त महत्त्व दिले. त्यामुळे कितीतरी फायदे होतात. एकच काम
पुनःपुन्हा करण्याची गरज भासत नाही. पहिल्या फटक्याला उत्तम काम झाले म्हणजे विलंब टळतो व त्यातून होणारा मनस्ताप वाचतो. वेळेचा व इतर साधनसामग्रीचा अधिक चांगला उपयोग होतो. आपण उत्कृष्टतेसाठी बांधील आहोत या जाणिवेने कामगारांचे किंवा कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढते. आपण उत्तम दर्जाचे काम करतो आहोत याचा अभिमान मनामध्ये जागता राहतो आणि त्यामुळे आनंदात भर पडते.
फक्त कामच नव्हे तर आपले सगळे जगणेच गुणवत्तापूर्ण करता आले तर? रडतखडत, कसेबसे जगत राहिलो किंवा आपल्याच तोऱ्यात राहिलो तर त्यात मजा नाही. म्हणून सगळ्यांना बरोबर घेऊन मजेत जगता आले पाहिजे. अखेरीस, “जिंदगी एक सफर है सुहाना…’ एकमेकांसह विश्वासाने गुणवत्तापूर्ण जीवन जगू या. जीवनातला प्रत्येक क्षण, प्रत्येक कृती अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करू या. त्यातूनच खरेखुरे समाधान मिळवू या. इतरांशी सहिष्णुतेने वागले, त्यांची अडचण जाणून त्यासाठी काही तडजोड करता येते का ते पाहिले तर इतरांनाही आपल्याबद्दल नक्कीच आपुलकी वाटेल. माणसाला आयुष्यात अजून काय हवे?