देशात सध्या अन्नधान्यांच्या आणि भाजीपाल्याच्या, खाद्यतेलाच्या किमती वाढत असतानाच दुसरीकडे दुधाच्या दरांमध्ये गेल्या काही महिन्यांत 10 ते 15 टक्क्यांची वाढ झाली आहे. इतकी प्रचंड दरवाढ होणार असेल आणि ती अशीच सुरू राहणार असेल तर आर्थिक फटका बसल्याशिवाय राहणार नाही.
“पूर्णान्न’ मानल्या गेलेल्या दुधाचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. दुधातील पोषणद्रव्ये आणि त्याचे आरोग्यासाठीचे फायदे लक्षात आल्यानंतर धोरणात्मक निर्णय घेऊन आपल्या देशात श्वेतक्रांती घडवून आणण्यात आली. त्यानंतर भारतात दुधाचा महापूर वाहू लागला. अलीकडेच समोर आलेल्या माहितीनुसार, दूध उत्पादनामध्ये भारत देश जागतिक पातळीवर अव्वल क्रमांकाचा देश ठरला आहे. जगात दूध उत्पादन करण्यामध्ये भारताचा 24 टक्के वाटा आहे. देशात राजस्थान आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांकडे सर्वाधिक दूध उत्पादन करणारी राज्य म्हणून पाहिले जाते. वर्ष 2014-15 ते वर्ष 2021-22 या कालावधीत भारतातील दूध उत्पादनात 51 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आल्याचे सरकारी आकडेवारी सांगते.
असे असताना गेल्या काही महिन्यांमध्ये दुधाच्या दरात सातत्याने होत असलेली वाढ ही आश्चर्यकारक तर आहेच; पण सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी ठरत आहे. आश्चर्यकारक अशासाठी की, अर्थशास्त्रीय सिद्धांतानुसार कोणत्याही वस्तूचा पुरवठा वाढला की त्याच्या भावात घट होणे अपेक्षित असते. भारतात अन्य कृषिमालाबाबत आपण हे वेळोवेळी पहातही आलो आहोत. कांदा, टोमॅटो यांच्या दरांमधील घसरणीच्या चक्रात त्यांचा एकाच वेळी होणारा प्रचंड पुरवठा हाही घटक कारणीभूत असतो. त्या परिप्रेक्ष्यातून पाहता दुधाचे उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढल्यानंतर दरांमध्ये घट होणे अपेक्षित होते. त्याऐवजी दरांमध्ये लक्षणीय वाढच होत चालली आहे.
मुळात, शाकाहारी भारतीयांच्या खाण्यापिण्यात दुधाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दूध हे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी आवश्यक अन्न आहे. निरोगी ते आजारी लोकांचे जीवन दुधाशिवाय अपूर्ण आहे. अशा परिस्थितीत दुधाचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट बिघडते. दूध व्यवसायात मोठ्या आणि सहकारी कंपन्या सक्रिय आहेत, मात्र आता या क्षेत्रातील बड्या कंपन्या दरांच्या नियामक बनल्या आहेत. अशा स्थितीत अनेक भारतीयांसाठी दूध खरेदी करणे कठीण होत आहे. देशातील अनेक राज्यांत दूध पुरवठा करणाऱ्या मदर डेअरीने गेल्या डिसेंबरमध्ये दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपयांनी वाढ केली होती, जी गेल्या वर्षभरातील पाचवी वाढ असल्याचे सांगण्यात आले.
यानंतर काही आठवड्यांपूर्वी दुसरी मोठी सहकारी दूध कंपनी असणाऱ्या अमूलने प्रतिलिटर तीन रुपयांनी दरवाढ केली आहे. याआधी गुजरातच्या या कंपनीने नोव्हेंबरमध्येही दुधाच्या दरात वाढ केली होती. अमुलच्या दुहेरी किंमत धोरणाबाबतही ग्राहकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत की गुजरात आणि उर्वरित देशातील किमतीत तफावत का आहे? त्याचा राजकीय परिणाम होतो का? हे उत्पादनाच्या राष्ट्रीय स्वीकारार्हतेच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. महाराष्ट्रात सर्वच दूधसंघांनी गायी आणि म्हशीच्या दुधाच्या भावांमध्ये वाढ केली आहे. मागील आठवड्यात पुन्हा एकदा या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता म्हशीचे दूध 72 रुपये प्रतिलिटर झाले आहे. अर्थातच ही दरवाढ सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी आहे. याचाच अर्थ तिघा-चौघा जणांच्या कुटुंबाला दररोज एक लिटर दूध घेण्यासाठी महिन्याकाठी 2100 रुपये मोजावे लागताहेत.
तसे पाहता मागणी आणि पुरवठ्यातील असमतोल हेच देशभरातील दुधाचे भाव वाढण्याचे मूळ कारण असल्याचे सांगितले जात आहे. गाई-म्हशींच्या चाऱ्याच्या दरात वाढ झाल्याने दूध उत्पादकांचा नफाही कमी झाला आहे. एकीकडे महागाईचा फटका चारा पिकाला बसला असतानाच दुसरीकडे शेतीचा कल बदलल्याने आजवर सहज उपलब्ध होणारा चाऱ्याची टंचाईही निर्माण होऊ लागली आहे. पूर्वी जनावरांसाठी सहज उपलब्ध असणारा चारा शेतकरी शेतात जाळू लागल्यामुळे त्याची टंचाई उद्भवत आहे.
तसे पाहता, दुधाचे दर वाढण्यामागे जिथे कंपन्या खर्चात वाढ झाल्याचे सांगत आहेत, तिथे मागणी आणि पुरवठ्यातील असमतोल हाही दरवाढीचा प्रमुख घटक आहे. नवीन पिढीचा शेती आणि पशुपालनाकडे कमी होत चाललेला कल आणि शेतीयोग्य जमिनीचा व्यावसायिक कारणांसाठी, इमारतींचे बांधकाम आणि इतर कामांसाठी मोठ्या प्रमाणात वापर यामुळे शेतजमीन आकुंचन पावत आहे. याचा परिणाम पशुसंवर्धनावरही झाला आहे. असे म्हटले जाते की सर्वसामान्य भारतीयांच्या आहारावरील मासिक खर्चाच्या 20 टक्के खर्च हा दूध आणि त्यापासून बनवलेल्या उत्पादनांवर होतो. गेल्या दशकभरात समाजातील प्रत्येक घटकामध्ये दूध आणि त्यापासून बनवलेल्या उत्पादनांचा वापर वाढला असला तरी त्या प्रमाणात पुरवठा वाढलेला नाही.
तशातच गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक राज्यांमध्ये लम्पी रोगामुळे लाखो गायींचा मृत्यू झाल्यामुळे दूध पुरवठ्यावरही मोठा परिणाम झाला आहे. दुसरीकडे म्हशींवरही काही रोगांचा परिणाम दिसून येत आहे. मात्र, उत्पादनात घट असूनही बाजारात दूध, त्यापासून बनवलेले पदार्थ आणि मिठाईची कमतरता नाही. मग यासाठी लागणारे दूध कोठून येते? मागे लम्पीचा प्रादुर्भाव वाढला होता तरी आज भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश कसा बनला आहे? यात केमिकल आणि भेसळयुक्त दुधाचा मोठा हात आहे का? अशा प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत. दुधाची तपासणी जबाबदार विभागाकडून व्हायला हवी ती होत नाही, ही बाब सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे. दुग्धोत्पादन वाढवणे आणि त्या दिशेने संशोधन करणे याकडे सरकारी पातळीवर गांभीर्याने पाहिले जात नाही. अशा स्थितीत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनणाऱ्या भारतात दुधाचा पुरवठा सुरळीत होईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दूध उत्पादकांना योग्य किंमत आणि ग्राहकांना किफायतशीर दरात दर्जेदार दूध मिळावे यासाठी सरकारला लवकरात लवकर पावले उचलावी लागतील.
आतापासूनच उन्हाच्या झळांची तीव्रता वाढत आहे. अशा काळात दुग्धोत्पादनात आणखी घट होत असते. तसेच यंदाच्या वर्षी अल् निनोचा प्रभाव राहून मान्सूनचा पाऊस कमी पडण्याची शक्यता हवामान अभ्यासकांकडून वर्तवली जात आहे. तसे झाल्यास दुग्धोत्पादनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यावेळी दुधाचे दर काय असतील याची कल्पनाच केलेली बरी!