हिंसाचार करणार्यांना त्यांचे मनसुबे साध्य करायचे असतात. सततच्या ब्रेन वॉशमुळे ते एवढे हिंसक झालेले असतात, की त्यांना शांतता मानवत नाही. जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये जे झाले त्याचे हे ठळक उदाहरण. हल्ल्यामागे कोण आहे याची भारताला आणि जगाला कल्पना आहे. ज्यांनी हे हल्लेखोर पोसले ते डोळे मिटून दूध पिण्याचा लाख आव आणत असले, तरी हिंसाचाराची त्यांनी लावलेली आग त्यांच्या स्वत:च्या मागच्या दारापर्यंत पोहोचली आहे याचेही त्यांना भान राहिलेले नाही. जेव्हा एखादा रोगी पछाडतो तेव्हा त्याला त्याच्या स्वत:च्या भल्याबुर्याचीही खबर राहिलेली नसते व अखेर तो आत्मघात करून घेतो.
भारताबद्दल गंड असणार्यांचा अंतही असाच होणार आहे. शत्रू तुमच्याबद्दल काय विचार करतात ते त्याच्यावर सोडावे. तथापि, भारतातील लोकांनी व या विशिष्ट हल्ला प्रकरणात काश्मिरींनी काय विचार करावा हे त्यांनी ठरवले पाहिजे. पहलगामचा हल्ला हा केवळ भारताच्या श्रद्धेवर आणि आत्मविश्वासावर हल्ला नाही, तर तो काश्मीरवर आणि त्यांच्या अभिमानाने गौरवल्या जाणार्या काश्मिरीयतवरही आहे. हा हल्ला काश्मीरला पुन्हा एकदा जुन्या अंधकाराच्या युगात घेऊन जाण्याची शक्यता आहे. त्याला रोखणे आणि आवर घालणे हे त्यांच्याच हाती आहे.
हे सांगायचे कारण म्हणजे पर्यटकांवर हल्ला झाला तेव्हा त्यांना धीर देणारे, त्यांना वाचवण्यासाठी पुढे सरसावणारे काश्मिरी होते हे बातम्यांमधून समोर आले आहेच. मात्र, त्याचवेळी सीमेपलीकडून आलेल्या हल्लेखोरांना मदत करणारेही स्थानिकच होते हेही समोर येत आहे. दहशतवाद्यांनी धर्म अथवा मृत्यू पश्चातच्या कथित सुंदर जगाचे आमिष दाखवून जी मोजकी टाळकी भडकावली त्यांनी हा हल्ला करणार्यांना मदत केली. हे करताना त्यांना याची किंचितही जाणीव झाली नाही, की असे करून ते आपल्याच लोकांच्या आणि आपल्या स्वत:च्या पोटावर लाथ मारून घेत आहेत.
मंगळवारच्या हल्ल्यानंतर देशभरातून काश्मीरला जाऊ इच्छिणार्यांकडून बुकिंग रद्द करण्यात आले आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत कुटुंबासमवेत जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश जाण्याचे अनेकांचे नियोजन होते. या लोकांनी तेथील हॉटेल्स, गाड्या आणि विमानांचे बुकिंग अगोदरच केले होते. ते आता रद्द केले आहे. रद्द करण्याचे हे प्रमाण पहिल्या 24 तासांतच 30 टक्के होते. पर्यटन हाच पृथ्वीवरील नंदनवन म्हणवल्या जाणार्या काश्मीरचा आर्थिक कणा आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, काश्मीरला या पर्यटन उद्योगातून वर्षाकाठी 12 हजार कोटी रुपये मिळतात. पुढील पाच वर्षांत हे उत्पन्न 25 ते 30 हजार कोटी रुपयांपर्यंत जाण्याचे अनुमान आहे.
केंद्रशासित प्रदेश केल्यापासून येथे येणार्यांच्या संख्येत वाढच होत गेली. 2020 मध्ये केवळ 36 लाख पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली होती, मात्र पुढच्याच वर्षांत हा आकडा सव्वाकोटीपर्यंत पोहोचला. 2024 च्या आकडेवारीनुसार या वर्षात 2 कोटी 36 लाख पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली व यात विदेशी पर्यटकांची संख्या 65 हजार होती. याच पर्यटकांच्या भेटीतून तब्बल अडीच लाख स्थानिकांना रोजगार मिळतो. पहलगामच्या घटनेनंतर या सगळ्यांचा रोजगार धोक्यात आला आहे. त्यांच्यापुढे उदरनिर्वाह कसा करायचा याचे संकट उभे राहणार आहे.
जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीर कात टाकत असल्याचे आणि खरेच हे नंदनवन पुन्हा फुलते आहे असे संकेत देणार्या अनेक घटना घडत होत्या. लक्ष्यीत हिंसाचाराच्या काही घटना घडल्या; मात्र एकुणात हॉटेल्सपासून नव्या वाहनांच्या खरेदीपर्यंत प्रत्येक क्षेत्रातील आकडेवारी काश्मीरच्या चांगल्या भवितव्याची ग्वाही देत होती. काश्मीरमध्ये 2017 मध्ये 14.88 लाख नव्या वाहनांची नोंदणी केली गेली होती. 2024 मध्ये हीच संख्या दुप्पट म्हणजे 27.29 लाखांपर्यंत गेली. दहशतवादाचा काळा कालखंड सुरू झाल्यापासून सामान्य पर्यटकांपासून चित्रपट निर्मात्यांकडून काश्मीरकडे पाठ फिरवली गेली होती.
ते चित्रही गेल्या काही महिन्यांत बदलत चालले होते. येथील पर्यटन उद्योग असाच वाढत जावा यासाठी केंद्र सरकारनेही 1 हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज दिले होते. राज्य सरकारच्या एकूण उत्पन्नात या उद्योगातून मिळणारा वाटाच सगळ्यांत मोठा होता. या सगळ्याला एका हल्ल्याने गालबोट लावले आहे. काश्मीर ही आमच्या गळ्याची नस आहे आणि राहील अशी दर्पोक्ती पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी चार-पाच दिवसांपूर्वीच केली होती. त्यानंतर भारतात हल्ला झाला आहे. त्यांच्या बलुचिस्तान प्रांतात तेथील बंडखोरांनी चक्क रेल्वेचे अपहरण करून कथित सक्षम पाकिस्तानी लष्कराच्या अब्रूचे धिंडवडे उडवल्यानंतर लष्करप्रमुखांना ही फुशारकी मारण्याची वेळ आली.
भारताशी कायम शत्रुत्व भाव जोपासणार्या शेजार्यांकडून आपण प्रेमाची आणि बंधुभावाची अपेक्षाही करू शकत नाही. वैषम्य एकाच गोष्टीचे आहे की त्यांच्या या नापाक इराद्यात त्यांना आतल्याच काही गद्दारांनी रसद पुरवली आहे. घरातील घाण बाहेर टाकण्यासाठी प्रत्येक घरात व्यवस्था केली जातेच. मात्र, त्याच व्यवस्थेचा लाभ घेत बाहेरची घाण आत येऊ लागली की ते धोकादायक असते. सर्वच काश्मिरी वाईट नाहीत आणि नव्हतेही. फक्त त्यांच्यातील काही भ्रमिष्ट आणि अपरिपक्व मडकी तापदायक आहेत.
सरकार आणि लष्कर त्यांना हुडकून काढेल आणि न्याय करेलच. तथापि, पर्यटकांच्या हल्ल्याच्या वेळी जे काश्मिरी मदतीसाठी पुढे सरसावले त्यांनी एरव्हीही दक्ष राहून वेळोवेळी पुढाकार घेणे गरजेचे आहे. ज्यांना शांततेच्या विचारानेही भय वाटते ते काश्मीरमधील शांतता भंग करण्याचाच प्रयत्न करतील. मात्र, यात परवड सर्वसामान्य काश्मिरींचीच होईल हे सगळ्यांत प्रथम काश्मिरींनी लक्षात ठेवावे.