-उत्तम पिंगळे
गुरुजी एका पिशवीत फुले व पूजेचं साहित्य घेऊन शाळेकडे निघाले. गणा शिपायाने आधीच शाळा उघडून स्वच्छता केली होती. दहा-पंधरा विद्यार्थीही आले होते. जिल्हा परिषदेची सातवीपर्यंतची शाळा. करोनामुळे सर्वच बंद असल्यामुळे तसे कोणाला बोलावलेही नव्हते.
इतर शिक्षकही आपापल्या गावीच अडकले होते. गुरुजी वर्गात आल्यावर त्यांनी सरस्वतीच्या तसबिरीला हार घातला. नंतर थोडक्यात पूजा केली व सर्वांनी प्रार्थना म्हटली. नंतर गुरुजींनी “गुरूपौर्णिमेचे महत्त्व’ या विषयावर थोडक्यात एक भाषण केले. सर्व विद्यार्थ्यांनी नंतर गुरुजींना नमस्कार करून आपापल्या घरी निघून गेले. गणा व गुरुजी थांबले. कारण समयी चालू असते व नंतर गुरुजींना ती घेऊन जायचे असते. शाळा परत लगेच उघडणे शक्य नव्हते.
इतक्यात गुरुजींचा मोबाइल वाजला. तो फोन अमेरिकेहून विकास या विद्यार्थ्याने केला. गुरुजींना तो प्रथम नमस्कार करतो. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो. गुरुजी त्यास विचारतात, “कसा आहेस?’
त्यावर तो बोलू लागतो, “गुरुजी, मी आज जो अमेरिकेत आहे तो केवळ आपल्यामुळेच’. गुरुजींना एका क्षणात आठवले की एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा जो हुशार होता. गुरुजींनी त्याला मदत करावयाचे ठरवले होते. चौथी व सातवीला त्याला स्कॉलरशिप मिळाली. तालुक्याला ओळखीच्या शिक्षकांकडे राहण्याची सोय करून उत्तम मार्काने तो दहावी पास झाला. योगायोगाने त्यांच्या परिसरात साखर कारखाना सुरू झाल्यामुळे त्याच्या वडिलांनीही ऊस लावला. त्यामुळे रोखीने चार पैसे मिळू लागले. बारावी उत्तम मार्काने पास होऊन पुढे इंजिनिअर झाला. आता गेले वर्षभरात तो अमेरिकेत स्थिरस्थावर होत आहे.
इतक्यात पलीकडून विकासचा आवाज आला, “गुरुजी ऐकताय ना आपण?’ गुरुजी “हो हो’ बोलतात, अरे बोल बोल’. मग तो गुरुजींनी आपल्यासाठी घेतलेल्या कष्टांचा पाढा पुन्हा एकदा वाचतो. गुरुजी म्हणतात, “अरे ते राहू दे. तुझे तिथे कसे काय आहे ते सांग’. विकास म्हणाला, “मी आता ज्युनिअर सायंटिस्ट आहे. खूप नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत’.
गुरुजी त्यावर म्हणतात, “खूप मोठा हो. तू हुशार आहेसच’. मग पलीकडून विकास म्हणतो, “बाकी गावात काय सुरू आहे? करोनाचे काय?’ गुरुजी म्हणतात की, “गावात सर्वांनी काळजी घेतलेली आहे त्यामुळे एकही रुग्ण नाही. खूप चांगले आहे’.
विकास म्हणतो, “गुरुजी आज मी मुद्दाम फोन केला. कारण मला माहिती आहे तुम्ही कधीही आमच्याकडून जादा शिकवण्याची फी वगैरे घेतली नाहीत. उलट वेळोवेळी पदरमोड करूनच माझ्यासाठी कष्ट घेतलेत आणि म्हणूनच मी आपणास आज गुरूदक्षिणा देणार आहे. मला चांगले माहीत आहे की, तुम्ही असे पैसे स्वीकारणार नाहीत. परंतु आपल्या शाळेकरता ही गुरूदक्षिणा माझ्याकडून आपण स्वीकारावी, ही नम्र विनंती आहे. मी दोन लाख रुपये आपल्या अकाउंटवर पाठवित आहे. आपण आपल्या प्राथमिक शाळेमध्ये संगणक तसेच एलईडी लाइट व इतर जे योग्य वाटेल ते करून घ्यावे’.
गुरुजी काही बोलणार तेवढ्यात विकास म्हणतो, “आता आपण काहीही म्हणू नका. पुन्हा एकदा मी आपल्याला नमस्कार करतो व आपल्या अकाउंटवर पैसे पाठवून देत आहे’.
गुरुजी फोन ठेवतात. त्यांचे डोळे पाणावतात. त्यांना दोन गोष्टींचा अत्यंत अभिमान वाटतो की, आपल्या हातून खूप हुशार विद्यार्थी घडला व दुसरे म्हणजे एवढ्या मोठ्या ठिकाणी जाऊनही तो आपल्या शाळेला विसरला नाही.
इतक्यात बॅंकेचा दोन लाख रुपये जमा झाल्याचा मेसेज येतो.