-माधव विद्वांस
“भोली सूरत दिल के खोटे, नाम बडे और दर्शन खोटे’ या गाण्यावर ठेका धरायला लावणाऱ्या “मास्टर भगवान’ यांची आज जयंती. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1913 रोजी एका गिरणी कामगाराचे पोटी झाला. त्यांचे पूर्ण नाव भगवान आबाजी पालव असे होते.
चौथीपर्यंत कसेबसे शिकून शाळा सोडली व वडिलांप्रमाणे कापड गिरणीत मजूर म्हणून जाऊ लागले. सिनेमाची आवड होतीच आणि चंदेरी दुनियेचे आकर्षण यामुळे जेथे चित्रीकरण चालू असे तेथे ते जात असत. हळूहळू सेटवर पडेल ती कामे करू लागले. तेथेच अधेमधे साईड रोल मिळू लागला. स्टुडिओचे व्यवस्थापन करता करता ते सहाय्यक दिग्दर्शक बनले.
वर्ष 1938 मध्ये ते सहदिग्दर्शक झाले.त्यानंतर ते कमी खर्चाच्या सिनेमामध्ये काम करू लागले. सुरुवातीला त्यांनी स्टंटमॅन म्हणून भूमिका केल्या. त्याच वेळी काही तमिळ चित्रपटातही काम केले. दादांनी सुमारे 300 चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम केले. “भेंडी बझार’ या हॉरर शोमधील त्यांचे काम पाहून व्ही. शांताराम खूप प्रभावीत झाले. दादांनी एकदा चित्रीकरणादरम्यान अभिनयामध्ये ललिता पवारला मारलेली थप्पड एवढी जोरात बसली की त्या बेशुद्ध झाल्या व त्यांचा एक डोळा निकामी झाला. या वारंवार मिटणाऱ्या डोळ्याचा ललिता पवार यांनी चांगला उपयोग करून घेतला आणि त्या सर्वश्रेष्ठ खलनायिका बनल्या.
वर्ष 1942 मध्ये जागृती फिल्मस्मध्ये ते निर्माते झाले. त्यांनी स्टुडिओसाठी चेंबूर येथे जागाही खरेदी केली. राज कपूर यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी चित्रपटनिर्मिती सुरू केली आणि “अलबेला’ या चित्रपटाची, गीताबाली यांच्याबरोबर नायक म्हणून अभिनयासह निर्मिती केली. त्यांचे मंदगती परंतु ठसकेबाज नृत्य ही भगवान नृत्यशैली म्हणून आजही प्रसिद्ध आहे.
आनंद बक्षी यांना दादांनीच पहिल्यांदा संगीत दिग्दर्शनाचे काम दिले. गणपतीची मिरवणूक त्यांच्या दादरमधील चाळीपुढे येऊन थांबत असे व दादांचा त्यांच्या शैलीतील पदन्यास झाल्याशिवाय मिरवणूक पुढे जात नसे. चित्रपट व्यवसायात चढउतार सगळ्यांनाच पाहावे लागतात. पण दादांना दुर्दैवाने वैभवाच्या शिखरावरून खाली उतरावे लागले ते कायमचे. “एक अलबेला’ हा त्यांचा जीवनपट दाखविणारा सिनेमा वर्ष 2016 मध्ये प्रदर्शित झाला. दादांनी ऋषी कपूरला नृत्याचे धडे दिले होते.
जुहू समुद्रकिनाऱ्यासमोर त्यांचा 25 खोल्यांचा बंगला व त्यासमोर सात गाड्या असायच्या. रोज एक गाडी ते वापरायचे. चेंबूरमध्ये “आशा स्टुडिओ’ हा स्वतःचा स्टुडिओ होता. भगवानदादांच्या बहुतेक मित्रांनी त्यांची गरजेच्या काळात दखल घेतली नाही. मात्र, सी. रामचंद्र, ओमप्रकाश आणि गीतकार राजिंदरकृष्ण हे त्यांना त्यांच्या पडत्या काळात भेटत असत. 4 फेब्रुवारी 2002 रोजी दादर पूर्वेला असलेल्या शिंदेवाडीतील लल्लुभाई मॅन्शनमध्ये हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला.