-डॉ. शां. ब. मुजुमदार
महाराष्ट्राच्या मातीत मराठी मनाचे नाते रूजवणारे आणि फुलवणारे असे राजकारणी तेवढेच समाजकारणी शरद पवार यांचा ( Sharad Pawar birthday ) आज जन्मदिवस. त्यांच्या वाढदिनी डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी व्यक्त केलेली भावना…
आपल्या पाहण्यात, वाचण्यात अनेक माणसं येतात. त्यांच्यातील फारच थोडी माणसं आपल्याला भावतात. आपल्या लक्षात राहतात. आपल्या मनावर एक कायमचा ठसा उमटवून जातात. त्यानंतर आपल्याला कळतं की, या माणसानं आपल्याच मनावर नाही तर आपल्यासारख्या असणाऱ्या आणि नसणाऱ्या हजारो, लाखो लोकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवला आहे.
हा माणूस अनेक ठिकाणी फिरतो. खेड्यात, शहरात, परेदशात. कधी हा मोटारीने, हेलिकॉप्टरने तर कधी विमानाने भन्नाट प्रवास करतो. शेतकऱ्यात शेतकरी, प्राध्यापकात प्राध्यापक, शास्त्रज्ञात शास्त्रज्ञ, विद्यार्थ्यात विद्यार्थी, राजकारण्यांमध्ये राजकारणी अशा कितीतरी रूपात आणि स्वरूपात आपण त्यांना पाहत असतो आणि ते सुद्धा एक-दोन वर्षे नव्हे तर अनेक दशकं! हा माणूस कधी थकत नाही, मावळत नाही, कोमेजत नाही, नाउमेद होत नाही. यांच्या कामात झपाट्याचा वेग सतत वाढत जातो. म्हणजे विचारांच्या वेगाने याचं कर्म करणं सुरू असतं.
या माणसाचं वक्तृत्व, या माणसाचा अनेक विषयांतील सखोल अभ्यास आणि प्रयोगशाळेत संशोधन न करतासुद्धा या माणसानं केलेले निरनिराळ्या क्षेत्रातील अचूक अंदाज यानं भलेभले अवाक् होतात. या माणसाची मैत्री खेड्यातील अशिक्षित शेतकऱ्यापासून ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांपर्यंत पोहोचलेली असते. या माणसाची स्मरणशक्ती पाहून नव्हे तर अनुभवून आपण आश्चर्यचकित होतो. तुम्ही त्याला भेटता. तुम्ही तुमची ओळख करून देण्यापूर्वीच हा माणूस तुमचं नाव घेऊन “कसं चाललंय’ म्हणतो. तुमच्या अंगावर मूठभर मास चढतं. क्षणभर तुम्ही भारावून जाता.
महाराष्ट्रात एकही खेडे असे नसेल जिथे हा माणूस गेलेला नाही. तिथल्या दोघा-तिघांना तरी हा माणूस पहिल्या नावाने हाक मारतो, मारू शकतो हे अनेकदा दिसून येतं. सर्व राजकीय पक्षांमध्ये त्यांचे मित्र आहेत. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत त्यांचे नाव हटकून येते. काय म्हणालात? मी हे सर्व कुणाबद्दल लिहिलंय? पुन्हा नीट वाचा आणि तुम्हीच अंदाज करा मी कुणाबद्दल लिहिलंय? बरोबर ओळखलंत. शरद पवार, बरोबर आहे.
काही वर्षांपूर्वी एका दैनिकातर्फे पुण्यात पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सन्मानार्थ स्नेहभोजन आयोजित केले होते. शेतीविषयक वृत्तपत्राचे प्रकाशन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी केलेल्या भाषणातील एक वाक्य ऐकून मी थक्क झालो.
आपल्या भाषणात डॉ. मनमोहन सिंग म्हणाले, “भारतात आलेल्या जागतिकीकरणाचं श्रेय अनेकजण जेव्हा मला देतात तेव्हा मी संकोचतो. कारण ते श्रेय खरे तर पवारांना दिले पाहिजे. 1991 च्या आधीच काही वर्षे पवारांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत जागतिकीकरणाची आवश्यकता आहे यावर केवळ भाष्य केले नव्हते तर त्याची प्रक्रिया त्यांनी आपल्या मंत्रालयामध्ये सुरू केली होती.’ त्यावेळी पवार मंचावर उपस्थित होते. त्यांच्या चेहऱ्यावर पंतप्रधानांचे हे वाक्य ऐकून कोणते भाव उमटतात हे मी मुद्दाम न्याहाळत होतो. पवारांनी आपली मान थोडी खाली केली आणि त्यातून त्यांनी आपली नम्रता दाखवून दिली.
आज सर्वच क्षेत्रात जागतिकीकरणाची संकल्पना अनेक विद्वान आपल्या भाषणांतून आणि लेखनांतून लोकांना पटवून देत असतात. काही विद्वान व राजकारणी जागतिकीकरणाला विरोधही करताना दिसतात. पण या “जागतिकीकरणा’च्या संकल्पनेचा खरा वारस शरद पवार आहेत याची मात्र त्यांना माहिती नसते. खुद्द डॉ. मनमोहन सिंग यांनीच तो उल्लेख आपल्या भाषणात केला, त्यामुळे पवारांच्या विचारवेधाचा पल्ला किती दूरचा आहे याची आपल्याला कल्पना येते.
क्षणभर विचार करा की, शदर पवार- एका वाक्यात असे जर कोणी सांगितले आणि मी त्या स्पर्धेत भाग घेतला. तर माझे वाक्य असेल शरद पवार- नियतीला पडलेलं एक पहाटेचं स्वप्नं…