-ब्रिगे. हेमंत महाजन (निवृत्त)
आर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये झालेल्या लढाईमध्ये घडलेल्या घटनांचे विश्लेषण करून भारताने स्वतःचे ड्रोन वापराचे धोरण, संशोधन धोरण तयार केले पाहिजे. ड्रोनच्या लढाईमध्ये चीन आणि पाकिस्तानच्या विरोधात ड्रोनचा वापर आक्रमक कारवाई करण्याकरता कसा करता येईल हे निश्चित केले पाहिजे.
ड्रोनच्या मदतीने युद्ध जिंकले
आर्मेनिया-अझरबैजान युद्ध अझरबैजाननी जिंकलं. अझरबैजानकडून झालेल्या ड्रोन हल्ल्यात आर्मेनियाचे खंदकात दबा धरून बसलेले सैनिक, रणगाडे, तोफखाना आणि रडार सहजपणे टिपले गेले. हा हल्ला एवढा तीव्र होता की, आर्मेनियाला शरणागती पत्करण्याशिवाय गत्यंतर नव्हते.आर्मेनियाने लढाईमध्ये रणगाडे, तोफखाना आणि विमान प्रणालीचा वापर केला. ड्रोन अशा सगळ्या शास्त्र प्रणालीवर हल्ला करू शकतात ज्यामधून इलेक्ट्रॉनिक्स रेडिएशन बाहेर येतात. आर्मेनियाने 185 रणगाडे, 45 चिलखती गाड्या, 46 इन्फंट्री फायटिंग गाड्या, 147 तोफा या युद्धामध्ये गमावल्या, मात्र अझरबैजानचे नुकसान फारच कमी झाले.
ड्रोनच्या हल्ल्यांना जास्त यश मिळाले कारण त्यांचा अचानक जास्त प्रमाणात वापर करण्यात आला. आर्मेनियाला तर असे वाटायला लागले की त्यांचे रणगाडे आणि अतिशय महागडी फायटर विमाने यांचा सध्याच्या लढाईमध्ये काहीच उपयोग नाही.
युद्धाचे विश्लेषण- भारताच्या दृष्टीकोनातून
ड्रोन तंत्रज्ञान हे तुलनेने कमी खर्चिक आणि अधिक अचूक असल्याने दहशतवादी संघटना आणि पाकिस्तानसारखी राष्ट्रं ते वापरू शकतात.त्यातील काही पैलू किंवा धडे भारताकरता महत्त्वाचे आहे. परंतु आपण या सगळ्या युद्धाचे विश्लेषण भारताच्या दृष्टीकोनातून केले पाहिजे. अशा प्रकारची ड्रोन तुर्कस्तान पाकिस्तानला देऊ शकतो का? उत्तर आहे अर्थात, हो. एवढेच नव्हे तर चीननेसुद्धा ड्रोन प्रणाली अतिशय उत्तम पद्धतीने तयार केली आहेत, म्हणून तशी ड्रोन चीनकडूनसुद्धा पाकिस्तानला मिळू शकतात.
सध्याची परिस्थिती
सध्या 14 कोर लडाख सीमेवर चीनच्या विरुद्ध तैनात आहे. ती दहा ते पंधरा लांब पल्ल्याचे हेरोन ड्रोन आणि वीस ते पंचवीस मल्टी कोप्टर जवळ निरीक्षणाकरता विकत घेत आहे. भारताकडे चीनच्या तुलनेत टेहाळणी करणाऱ्या आणि आकाशात फिरत राहणाऱ्या लोइटरिंग ड्रोन कमी आहे. मागच्या वर्षी सैन्याने सहाशे मिनी ड्रोन हाय अटिट्यूडमध्ये टेहाळणी करण्याकरता विकत घेतलेले होते. नौदलाने समुद्रात टेहाळणी करण्यासाठी 2 ड्रोन्स मागच्या आठवड्यात भाड्याने घेतली आहेत.
युद्धात ड्रोनचा वापर
इस्रायलची आकाशात चकरा मारणारी ड्रोन्स एखाद्या शिकाऱ्याप्रमाणे आकाशात फिरत असतात आणि ज्या वेळेला एखादे लक्ष त्यांच्या पल्ल्यात येते त्यावर ती लगेच हल्ला करतात, त्यांना बरबाद करतात आणि पुन्हा गायब होतात. आर्मेनिया आणि अझरबैजानच्या लढाईमध्ये ड्रोनचा अचानक वापर करून लढायी तात्पुरती जिंकली गेली; मात्र आर्मेनियाने त्याचा बदला अझरबैजानच्या शहरांवर क्षेपणास्त्रांचा वापर करून घेतला. भारत-पाकिस्तान किंवा भारत-चीनमध्ये असे होणे जवळजवळ अशक्य आहे. कारण भारताची विमान विरुद्ध प्रणाली ही मजबूत आहे. याशिवाय ड्रोन पाडण्याचे प्रशिक्षणसुद्धा भारतीय सैनिकांना दिले जाते.
अचानक एका ड्रोनच्या टोळीने किंवा ड्रोनच्या टोळधाडीने जर आपल्या महत्त्वाच्या ठिकाणावर हल्ला केला तर त्याविरुद्ध आपण आपले रक्षण करू शकतो का? ड्रोन्सच्या विरुद्ध स्वतःची रक्षण करण्याची प्रणाली सध्या अतिशय महागडी आहे. परंतु अचानक ड्रोन हल्ल्याची भीती अनेक सैनिकांच्या मनामध्ये भरलेली असते. असे म्हटले जाते की भारतीय हवाई दलाने 27 फेब्रुवारी 2019 ला भारताचेच मी-8 हेलिकॉप्टर पाडले. कारण त्यांना वाटले पाकिस्तानचे ड्रोन त्यांच्या हवाई हद्दीमध्ये प्रवेश करत होते. म्हणूनच भारताने चीनप्रमाणे ड्रोन्स तर तयार करावीत परंतु ड्रोन्स विरुद्ध रक्षण करण्याच्या प्रणालीमध्येसुद्धा आपले संशोधन करण्यामध्ये लक्ष केंद्रित करावे. कारण ड्रोन्स विरुद्ध ड्रोन्स संरक्षण प्रणाली ही शर्यत अनेक वर्षे चालू राहणार आहे.
भारत-चीन सीमेवर चिनी घुसखोरीवरती लक्ष ठेवण्याकरता या प्रणालीचा वापर भारतीय सैन्य नक्कीच करत आहे. भारत-चीन सीमा साडेतीन हजार किलोमीटर लांब आहे. अतिउंच डोंगराच्या रांगा, बर्फ पडलेली शिखरे यामुळे येथे लक्ष ठेवणे सोपे नसते. म्हणूनच भारताने सीमेवरती ड्रोनचा वापर वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. चीनने असा दावा केला होता की, त्यांचे सैनिक लडाखमध्ये तैनात आहे व त्यांना गरम जेवण पाठवण्याकरता ड्रोनचा वापर करताहेत. अर्थातच हे अजून शक्य नाही. परंतु एवढे नक्की की जास्त उंचीवरती ड्रोनचा वापर करून लढायचे सामान तिथे पाठवता येईल का, यावर संशोधन सुरू आहे.
भारत-पाकिस्तान पारंपरिक युद्ध होणे हे अशक्य आहे. कारण तसे झाले तर भारत-पाकिस्तानचे अक्षरशः तुकडे करेल. म्हणूनच या ड्रोनचा वापर पारंपरिक युद्धामध्ये कसा केला जाऊ शकतो यावर विश्लेषण जास्त महत्त्वाचे नाही.
महत्त्वाचे आहे की अपारंपरिक आव्हानामध्ये पाकिस्तान याचा वापर भारताविरुद्ध कसा करू शकतो? लक्षात असावे इंटरनॅशनल बॉर्डरवरती आता फेन्स म्हणजे कुंपण लागल्यामुळे तिथून दहशतवाद्यांना स्फोटक पदार्थ, दारूगोळा किंवा हत्यारे पाठवणे कठीण झालेले आहे. ड्रोन पाठवून पाकिस्तान इंटरनॅशनल सीमेवरील भारतीय बीएसएफच्या तैनातीमधील फटी शोधून दहशतवादी घुसवण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तान ड्रोनचा वापर अफू, गांजा, चरस किंवा खोट्या नोटा पाठवण्यात करतो. स्मगलिंग करण्याकरता, जास्त किमतीचे सामान पाठवणे ड्रोनने जास्त सोयीचे आहे.
अजून काय करावे?
चीन जगाला ड्रोन्स विकणारा एक सर्वात मोठा देश आहे. त्यामुळे वेगवेगळ्या देशांना लागणाऱ्या आणि त्यांच्या गरजेची संशोधन करून त्यांना पाहिजे तसे ड्रोन्स ते पुरवत असतात. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेसुद्धा ड्रोन प्रणालीवरती आपले संशोधन सुरू केले पाहिजे. चिनी ड्रोन्सच्या एक पाऊल पुढे राहिले पाहिजे. भारत सध्या फ्रान्स, इस्रायल, अमेरिकेबरोबर ड्रोन्सविषयी संशोधन करण्याकरता कार्यक्रम तयार करत आहे. परंतु भारताच्या संशोधनाचा वेग हा अर्थातच चीनपेक्षा जास्त असायला पाहिजे.
आपण अमेरिकेकडूनसुद्धा अत्याधुनिक ड्रोन विकत घेण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु भारताने या सगळ्यांच्या मदतीने देशाच्या आत तंत्रज्ञान विकसित करायचा प्रयत्न सुरू केला पाहिजे. कारण ज्या वेळेला आपण अशी शस्त्रे परदेशाकडून घेतो त्या वेळेला त्यांची किंमत ही पुष्कळ जास्त असते.