– माधव विद्वांस
ज्येष्ठ भारतीय साम्यवादी नेते, लेखक, पत्रकार व कामगार नेते कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील करंजगाव येथे 10 ऑक्टोबर 1899 रोजी सामान्य कुटुंबात झाला. त्यांचे शालेय शिक्षण नाशिक येथे तर उच्च शिक्षण मुंबई येथील विल्सन महाविद्यालयात झाले. विद्यार्थिदशेपासूनच त्यांची लढाऊवृत्ती दिसून आली. बीए ला असताना महात्मा गांधींच्या असहकाराच्या चळवळीत सहभागी होण्याकरिता त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणास कायमचा रामराम ठोकला. पुढे ते साम्यवादाकडे वळले.
वर्ष 1921 मध्ये त्यांनी “गांधी व्हर्सेस लेनिन’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाने मानवेंद्रनाथ रॉय यांचे त्यांच्याकडे लक्ष वेधले. वर्ष 1922 मध्ये त्यांनी साम्यवादी विचारांच्या प्रसारार्थ “सोशॅलिस्ट’ हे पहिले साम्यवादी वृत्तपत्र सुरू केले. या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी इंडियन सोशॅलिस्ट लेबर पक्ष स्थापन केल्याचे जाहीर केले. कानपूर-बोल्शेव्हिक कटात भाग घेतल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक होईपर्यंत हे वृत्तपत्र चालू होते. या वृत्तपत्राने प्रभावित होऊन मानवेंद्रनाथ रॉय यांनी चौथ्या कम्युनिस्ट इंटरनॅशनल कॉंग्रेसच्या अधिवेशनास कॉ. डांगे यांना निमंत्रित केले होते पण ते त्यावेळी जाऊ शकले नाहीत.
कॉ. डांगे मुंबईत कामगारांमध्ये काम करीत असताना आर. बी. लाटवाला या गिरणीमालकाशी त्यांचा परिचय झाला. लाटवाला यांना कॉ. डांगेंनी त्यांचेकडे नोकरी करावी, असे वाटत होते. त्यासाठी त्यांनी विठ्ठलभाई पटेलांमार्फत प्रयत्न केले. परंतु कामगार चळवळीपासून लांब जाण्याचा धोका त्यांनी पत्करला नाही. 1926-27 या कालावधीत कामगार चळवळींना मुंबईमध्ये जोर चढला. कॉ. डांगे यांनी गिरणी कामगारांची संघटना उभी करण्यास प्रारंभ केला. कॉ. डांगे अखिल भारतीय ट्रेंड युनियन कॉंग्रेसचे (आयटकचे) सहसचिव झाले. चळवळीच्या प्रसाराकरिता त्यांनी “क्रांति’ हे मराठी साप्ताहिक काढले.
थोड्याच अवधीत ते गिरणी कामगारांचे पुढारी झाले. अखिल भारतीय कामगार व कृषीपक्षाच्या कलकत्ता येथे वर्ष 1928 मध्ये झालेल्या अधिवेशनास ते हजर राहिले. 1929 मध्ये त्यांना मीरत कटात सामील झाल्याबदल पुन्हा अटक झाली आणि सात वर्षांच्या शिक्षेनंतर 1935 मध्ये ते सुटले. या वेळी ब्रिटिश सरकारने कम्युनिस्ट पक्षावर बंदी घातली होती. तथापि कॉ. डांगे यांनी त्या पक्षाचा प्रसार व प्रचार गुप्तपणे चालूच ठेवला होता. 1939 मध्ये त्यांनी महागाई भत्त्याच्या प्रश्नावर गिरणी कामगारांचा संप प्रदीर्घ काळ चालविला व त्याबद्दल त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. कॉ. डांगे हे व्यवहारी राजकारणपटू होते. त्यांचा साहित्य, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र यांचा सखोल अभ्यास होता. त्यांनी भरपूर स्फूटलेखन केले. “इंडिया फ्रॉम प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी’ व “व्हेन कम्युनिस्ट डिफर’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
त्यांनी आपल्या विचारांशी सहमत असलेल्या विधवा उषाताईंशी 1928 मध्ये विवाह केला. कन्या रोझा देशपांडे आणि जावई बानी देशपांडे या दोघांनी मिळून आपल्या वडिलांवर “श्रीपाद अमृत डांगे विविध विचार संग्रह’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. रोझा देशपांडे ह्या सन 1980 ते 1987 च्या दरम्यान कम्युनिस्ट पार्टीमध्ये सक्रिय होत्या. कॉ. डांगे यांचा अमृतमहोत्सव 1974 मध्ये साजरा झाला. या प्रसंगी सोव्हिएत रशियाने आपले सर्वोच्च “लेनिन पदक’ देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला. 22 मे 1991 रोजी मुबई येथे त्यांचे निधन झाले.