- गृहिणींचे बजेट कोलमडले
- “लॉकडाऊन’मध्ये नागरिकांची लूट
पिंपरी – करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशभरात सध्या लॉकडाऊन चालू आहे. “लॉकडाऊन’मध्ये जीवनावश्यक वस्तूशिवाय इतर सर्व दुकाने बंद आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्याची आणि पुरवठा करण्याची परवानगी असताना देखील खाद्यतेल, डाळी यांच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करत व्यापारी वर्गाकडून नागरिकांची लूट केली जात आहे. किराणा साहित्याच्या मागणीच्या तुलनेत कमी पडणारा पुरवठा, वाहतूक खर्चात झालेली वाढ आणि परराज्यातून माल आणण्यात जाणवणाऱ्या अडचणी यामुळे आपोआपच किराणा मालाच्या दरात वाढ झाली असल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात येत आहे. सध्या खाद्यतेल आणि डाळींचे दर वाढले आहे. पर्यायाने गृहिणींचे बजेट कोलमडत आहे.
व्यापारी वर्गाने दिलेल्या माहितीनुसार कर्नाटक, आंध्रप्रदेश येथून माल येण्यात अडचणी येत आहेत. त्याशिवाय संसर्गाच्या धास्तीने वाहतूक खर्चातही वाढ झाली आहे. लॉकडाऊनचा अवधी वाढल्यास किराणा साहित्य मिळण्यासाठी अडचण निर्माण झाल्यास काय करायचे, या चिंतेने नागरिक जादा किराणा सामान घरी भरून ठेवत आहेत. पर्यायाने, अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होत आहे. सध्या डाळी, पोहे आणि कमी दरातील धान्याची काही प्रमाणात टंचाई जाणवत आहे. त्याशिवाय 5 किलो गव्हाचे पीठ उपलब्ध होण्यात अडचणी जाणवत आहेत.
“लॉकडाऊन’च्या एक दिवस आधीपासून आणि “लॉकडाऊन’ची घोषणा केल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. यावेळी किराणा मालाची दुकाने आता उघडणार नाहीत. या गैरसमजातून नागरिकांनी मिळेल त्या भावात खरेदी केली. त्यावेळी व्यापारी वर्गाने मोठ्या प्रमाणात दर वाढविले होते. ते अद्याप कमी करण्यात आलेले नाहीत आणि आता व्यापारी याच दरात विक्री करत आहेत. वेगवेगळी कारणे पुढे करत दर चढेच ठेवण्याचा किंबहुना अजून वाढविण्याचा प्रयत्न सुरु आहे.
किराणा दुकानदारांसमोर विविध अडचणी
जीवनावश्यक वस्तुंच्या वाहतुकीलाही किराणा दुकानदारांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यांना पोलिसांकडून पास मिळण्यात अडचणी येत आहेत. रिक्षामध्ये मालवाहतूक करण्यास परवानगी दिली जात नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीचे पास ग्राह्य धरले जात नाही, अशा विविध अडचणी जाणवत असल्याचे पिंपरी किराणा असोसिएशनचे अध्यक्ष श्याम मेघराज यांनी सांगितले.
घाऊक विक्रेत्यांकडून वेळ निश्चित
पिंपरी बाजारपेठेतील घाऊक किराणा विक्रेत्यांकडून सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत किराणा मालाची विक्री केली जात आहे. तर, दुपारी 2 ते सायंकाळी 6 या वेळेत किरकोळ किराणा दुकानदारांना माल पोहोचविण्यात येत आहे. मालाची विक्री करताना आणि ने-आण करताना सोशल डिस्टन्सिंग पाळण्यावर विशेष भर दिला जात आहे.