पुणे -खाद्यतेलाच्या दरवाढीमुळे उत्तरेकडील पाच राज्ये वगळून देशभरात 1 फेब्रुवारीपासून खाद्यतेल तसेच तेलबियांच्या साठ्यावर मर्यादा घातली होती. उत्तरेकडील पाच राज्येही आता 1 एप्रिलपासून साठा मर्यादेच्या कक्षेत आणण्यात आली आहेत. मात्र, त्यामुळेही दरवाढीवर लगाम लागण्याची चिन्हे नाहीत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील आणि विशेषत: युक्रेनमधील घडमोडींचा परिणाम तेल दरवाढीवर कायम राहिला आहे. त्याचप्रमाणे साठा मर्यादेमुळे तेल विक्रीबाबत हात आखडता घेतला जात आहे. त्यामुळे मार्चमध्ये स्थिरावलेले तेलाचे भाव येत्या काही दिवसांत पुन्हा वाढणार असल्याचे संकेत व्यापाऱ्यांनी दिले आहेत. दरम्यान, महानगरांपासून ग्रामीणपर्यंत एका व्यापाऱ्याला 50 टन तेलाची मर्यादा करता येणार आहे.
पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान या पाच राज्यांत तेलबिया तसेच तेलसाठ्यावर मर्यादा नव्हती. एक एप्रिलपासून केंद्रशासनाने उत्तरेकडील पाच राज्येही साठा मर्यादेच्या कक्षेत आणली आहेत. देशभरातील सर्व राज्यात तेलबिया, तेलसाठ्यावरील मर्यादा डिसेंबर 2022 पर्यंत लागू राहणार आहेत. साठा मर्यादेत तेलबिया, तेल आणल्यानंतर भाव कमी होण्याची शक्यता अजिबात नाही. कारण आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम तेलाच्या आवकेवर झाला आहे. भारतात दरवर्षी 150 ते 160 लाख टन तेल आयात केले जात असल्याचे मार्केट यार्डातील तेल व्यापारी कन्हैयालाल गुजराथी यांनी सांगितले.
दरवर्षी 70 ते 80 लाख टन पामतेल आयात केले जाते. साधारणपणे 70 टक्के पामतेल इंडोनेशियातून आयात केले जाते. मलेशियातून 20 टक्के तेल आयात केले जाते. रशिया-युक्रेन युद्धामुळे सूर्यफूल तेलाची आयात कमी झाली आहे. दरवर्षी भारत 30 लाख टन सूर्यफूल तेल आयात करतो. त्यापैकी 70 टक्के सूर्यफूल तेलाची आयात एकट्या युक्रेनमधून होते. उर्वरित आयात रशिया, अर्जेंटिनातून होते. सोयाबीन तेलाची आयात अर्जेंटिना, ब्राझील तसेच अमेरिकेतून होते. तेथील हवामानातील बदलामुळे यंदा सोयाबीनची लागवड कमी झाली असून सोयाबीन तेलाची आवक अपुरी पडत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर घडामोडींचा विचार करून यापुढील काळात टप्प्यप्प्प्याने तेलाचे भाव वाढणार आहेत, याकडे गुजराथी यांनी लक्ष वेधले.