मुंबई – गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स पाठवले आहेत. दरम्यान, संजय राऊत हे देखील ईडी कोठडीत आहेत. दोघा पती पत्नींची समोरासमोर चौकशी केली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संजय राऊतांना पत्राचाळ प्रकरणी 31 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर पीएमएलए कोर्टात हजर केले असता त्यांना 4 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली होती. आज त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले. त्यांच्या कोठडीत 8 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ईडीकडून 10 ऑगस्टपर्यंत कोठडी वाढवून मागण्यात आली. मात्र राऊत यांचे वकील अॅड मनोज जिरह यांनी ईडीच्या मागणीला विरोध केला. परंतू कोर्टाने त्यांची 8 ऑगस्टपर्यंत कोठडी वाढवली.
संजय राऊतांवर ईडीने केलेले आरोप –
पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांचा थेट हात आहे. त्यांचे संबंधी प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलपमेंट पाहत होते. त्यांना एचडीआयएल ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झालाय. या प्रकरणात ज्यांचे नाव सुरुवातीला समोर आले होते आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती ते प्रविण राऊत हे नावालाच होते, या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊत असल्याचा दावा ईडीने केला.
संजय राऊत हेच प्रविण राऊत यांना समोर करून सर्व व्यवहार करत होते असं ईडीने न्यायालयात सांगितले. मग पत्राचाळ गैरव्यवहारातील पैसे असो की दादर येथील घर आणि अलिबाग येथील जमीन सर्व व्यवहार संजय राऊत यांच्या सांगण्यावरूनच करण्यात आले. येस बँक घोटाळा प्रकरणी वाधवान बंधू यांच्यासोबत प्रविण राऊत यांचे नाव आले असून या प्रकरणीही संजय राऊत यांची भविष्यात ईडीकडून चौकशी केली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.