मुंबई – 100 कोटी वसुली प्रकरणी अडचणीत सापडलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे लागलेला सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीचा ससेमिरा अजूनही कायम आहे. ईडीने आज पुन्हा एकदा अनिल देशमुख यांना समन्स बजावला आहे. तसेच त्यांचा मुलगा ऋृषीकेश आणि पत्नीला देखील समन्स बजाविण्यात आले आहे. यामुळे अनिल देशमुख यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
पुढील आठवड्यात सोमवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच चौकशीला हजर न राहिल्यास ईडी कठोर कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, अनिल देशमुखांविरोधात असलेल्या वसुली आणि भ्रष्टाचार प्रकरणात ही कारवाई सीबीआयकडून करण्यात आली आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी राज्यात 12 ठिकाणी छापेमारी केली. त्यासोबतच सीबीआयनेही अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या घरासह काही जागांवर छापे टाकले होते.
“सर्वोच्च’ दिलासाही नाही
ईडी प्रकरणात अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाकडून तत्काळ दिलासा मिळालेला नाही. आता प्रोटेक्शन याचिकेवर 3 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मनी लॉंडरिंग प्रकरणात खटल्याची चौकशी करणाऱ्या अंमलबाजवणी संचालनालयाच्या (ईडी) समन्सविरोधात अनिल देशमुख यांना आव्हान दिले होते. देशमुख यांनी आपल्यासंदर्भातील कार्यवाही दुर्दैवी असल्याचा दावा केला होता.