मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर राज्यभरात पडसाद उमटत असताताना न्यायालयात हा गुन्हा दाखल करणारे माजी आमदार माणिकराव जाधव मात्र या कारवाईवर ठाम आहेत.
जाधव म्हणले की, आम्ही गेल्या 20 वर्षांपासून कायदेशीर लढा लढत आहोत. राज्य सरकारने दखल न घेतल्यामुळे आम्ही कायदेशीर लढाई लढत होतो. आता त्या लढाईला यश आले आहे. याबाबतीत उच्च न्यायालयाने सर्व कागदपत्रांची तपासणी करुन २२ ऑगस्ट २०१९ रोजी ८४ पानाचे निकालपत्र दिले आहे या निकालपत्रात पान ६८ व ७९ वर शरद पवार यांच्या नावाचा ४ ठिकाणी उल्लेख आहे. त्यामुळे कलम १०९, १२० ब नुसार शरद पवार यांना दोषी ठरविण्यात आले आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने योग्य निर्णय दिलेला आहे. न्यायालय योग्य कारवाई करत आहे त्यामुळे या प्रकरणात कुणीही ढवळाढवळ करण्याची गरज वाटत नाही. असे जाधव यांनी स्पष्ठ केलं आहे.
माणिकराव जाधव हे लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्याचे रहिवासी असून, १९९५ मध्ये त्यांनी जनता दलाच्या पक्षावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी माजी मुख्यमंत्री शिवाजी पाटील निलंगेकर यांचा 40 हजारा मतांनी पराभव करून ते विजयी झाले होते. तसेच माणिकराव हे अनेक वर्षांपासून राज्यातील साखर कारखान्यातील कामगार आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्यासाठी लढा लढत आहेत.