पुणे – महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतील घोटाळा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना उघड झाला आहे. या प्रकरणी एका व्यक्तीने न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर “ईडी’ने या प्रकरणाची स्वत:हूनच चौकशी सुरू केली. बॅंकेच्या तत्कालिन संचालक मंडळावर शरद पवारांना विचारून कार्य करणारे तसेच त्यांचा अंतिम शब्द मानणारे संचालक होते. म्हणून “ईडी’ने पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याचा राज्य सरकारशी काहीही संबंध नाही, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
केवळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे लोक जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी आंदोलनाचा इव्हेंट करत आहे. शरद पवार यांच्यावर राज्य सरकारच्या दबावाने कारवाई झाली हा आरोप खोटा आहे. न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाला आहे, असेही पाटील यांनी सांगितले.
“शिवसेनेशी युतीचा निर्णय कधीही जाहीर होईल’
शिवसेनेसोबत युतीची काळजी करू नका. लवकरच संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करू, असे स्पष्ट करत पाटील यांनी भाजप-शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब केले. राज्यातील निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारी निश्चिती, युतीतील जागावाटप आदी गोष्टींवर भाजपची गुरुवारी दिल्लीमध्ये बैठक झाली. वरिष्ठ नेत्यांसोबत 8 तासांहून अधिककाळ चाललेल्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील उपस्थित होते. त्या बैठकीविषयी त्यांनी माहिती दिली. युतीबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. कोणत्याही क्षणी भाजप-सेना नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद घेऊन घोषणा करण्यात येईल, असे पाटील यांनी नमूद केले.