मुंबई : कोहिनूर गैरव्यवहारप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. तसेच त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार राज हे आता ईडीच्या कार्यालयात पोहोचले आहेत. तसेच बंद दरवाज्याआड त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. ईडीचे अधिकारी राज ठाकरे यांची चौकशी करत आहेत. राज ठाकरे यांचे कुटुंबीय हे नजीकच्या एका हॉटेलमध्ये थांबले आहेत.
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कार्यालयाबाहेर आणि मुंबईत मोठ्या प्रमाणात पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेला दादरचा कृष्णकुंज परिसर, दक्षिण मुंबई तसेच संभाव्य आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच मुंबईतील काही ठिकाणी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, या अगोदर सकाळी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.