सांगली – ‘माझ्यामागे ईडी लागणार नाही, कारण मी भाजपचा खासदार आहे’, असे वक्तव्य भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी केले. ते सांगली जिल्ह्यातील विटा येथे एका कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय यंत्रणांनी कारवाईचा फास आवळला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्ये ईडी, सीबीआयच्या रडारवर आहेत. त्यावरुन भाजप नेते सातत्याने आघाडी सरकारवर टीका करत असतात. तर, केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर राजकीय फायद्यासाठी केला जात असल्याचा आरोप वेळोवेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत असतो. त्यातच भाजप नेत्यांच्या अशा वक्तव्यांमुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
नेमकं काय म्हणाले संजय पाटील?
मी भाजपचा खासदार आहे. त्यामुळे माझ्या मागे ईडी लागणार नाही. आमची कर्ज पहिली की ईडी म्हणेल, ही माणसं आहेत का काय? असे वक्तव्य संजय पाटील यांनी केले. तसेच त्यांनी ईडीबाबत बोलताना माजीमंत्री हर्षवर्धन पाटलांच्या वक्तव्याचीही आठवण करुन दिली. आम्हालाही भाजपमध्ये जावं लागलं. तो निर्णय मी का घेतला तेवढं मला विचारू नका. ते काँग्रेसच्या नेत्यांना विचारा, असं ते म्हणाले. ‘पण आता भाजपमध्ये मी निवांत आहे. शांत झोप लागते. चौकशी नाही, फिवकशी नाही, काही नाही,’ अशी मिश्किल टिप्पणी पाटील यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये जोरदार हंशा पिकला.
दरम्यान, माजीमंत्री हर्षवर्धन पाटील आणि आता खासदार संजय पाटील यांच्या वक्तव्यावरून भाजमध्ये असलेल्या आमदार, खासदार, मंत्र्यांवर ईडीची कारवाई होत नाही, असे स्पष्ट होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.