नवी दिल्ली – केंद्र सरकारने आज ईडी आणि सीबीआय या संस्थांच्या संबंधात मोठा निर्णय घेतला आहे. एका अध्यादेशाद्वारे त्यांनी या दोन्ही संस्थांच्या प्रमुखांना पाच वर्षांची मुदतवाढ जारी केली आहे.
आत्तापर्यंत या दोन्ही यंत्रणांच्या प्रमुखांची मुदत दोन वर्षांसाठीच असे पण आता त्यांना पाच वर्षांसाठी या पदावर राहता येणार आहे. या संबंधातील दोन्ही अध्यादेश राष्ट्रपतींच्या संमतीने जारी झाले आहेत.
या निर्णयानुसार ईडी किंवा सीबीआयच्या प्रमुखांना त्यांची दोन वर्षांची मुदत संपल्यानंतर पुढील तीन वर्षांपर्यंत दरवर्षी मुदतवाढ जारी केली जाऊ शकणार आहे. ईडीचे प्रमुख एस.एम मिश्रा यांच्या मुदतवाढीच्या संबंधातील निर्णयावर सुप्रिम कोर्टाने अलिकडेच एक निरीक्षण नोंदवले होते की अगदी अपवादात्मक स्थितीत या संस्थांच्या प्रमुखांना मुदत वाढ देता येईल.
मिश्रा यांच्या पदाची मुदत पुढील आठवड्यातच संपत आहे. या नवीन अध्यादेशानुसार त्यांना आता आणखी तीन वर्षांसाठी या पदावर राहता येणार आहे. सध्या ईडी आणि सीबीआयकडे देशातील अनेक महत्वाच्या प्रकरणांचा तपास सुरू असून या दोन्ही संस्थांचा राजकीय कारणासाठी वापर केला जात असल्याची टीका सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्या या निर्णयाला महत्व आहे.