वर्धा – शिष्यवृत्ती घोटाळ्यातील एक असलेल्या ज्ञानमंडळ संस्थेवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) धडक कारवाई केली. हिंदी भाषा प्रसाराची जबाबदारी असलेले व महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीत ज्ञानमंडळाचे कार्यालय आहे. ही कारवाई ईडीच्या चौदा अधिकाऱ्यांच्या चमूने केली. प्रचार समितीचे अध्यक्ष प्रा. अनंतराम त्रिपाठी यांच्याकडे त्यांनी ज्ञानमंडळच्या कार्यालयाची चावी मागितली. पण ती नसल्याने तपास अधिकाऱ्यांनी थेट कुलूप तोडून कार्यालयातील बनावट कागदपत्रे जप्त केली.
ज्ञानमंडळ ही संस्था प्रचार समितीच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांच्या संमतीने उमेश बोडखे यांनी स्थापन केली होती. संचालक मंडळातील काहीजण व पुणे येथील एका खासगी संस्थेच्या संयुक्त पुढाकारातून ज्ञानमंडळ संस्था अस्तित्वात आली. त्यानंतर या संस्थेने राज्यात व देशातील काही शहरांत अडीचशेवर अभ्यास केंद्रे सुरू केली. या संस्थेला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाची परवानगी असल्याचे सांगितले जात होते. मात्र प्रत्यक्षात तशी परवानगी नव्हती.
असे असूनही स्थापन केलेल्या अभ्यास केंद्रात अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. त्यांच्या नावावर शिष्यवृत्ती उकळण्यात आली. दोन हजार कोटी रुपयाचा हा घोटाळा असल्याचे म्हटले जाते. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाची परवानगी दाखवून अन्य काही केंद्रे स्थापन करण्यात आली होती. त्या माध्यमातूनही शिष्यवृत्तीची मोठी रक्कम ज्ञानमंडळच्या पदाधिकाऱ्यांनी उचलल्याचा आरोप आहे. या प्रकरणाच्या तपासाची सुत्रे आता ईडीने हाती घेतली आहेत. ईडीचा छापा पडल्याचे मान्य करणारे प्रचार समितीचे प्रा. त्रिपाठी हे म्हणाले की, या प्रकरणाशी राष्ट्रभाषा प्रचार समितीचा सूतराम संबंध नाही. केवळ आमच्या परिसरात ज्ञानमंडळाचे कार्यालय असल्याने ही कारवाई झाली, असे त्यांनी सांगितले.