नवी दिल्ली – विकास दर वाढविल्याशिवाय गरिबी कमी होणार नाही याची जाणीव सरकारला आहे. त्यामुळे विकास दर वाढविण्यासाठी अर्थमंत्रालय रिझर्व्ह बॅंकेच्या मदतीने आवश्यक ते प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी उद्योजकांना दिले.
भारतीय उद्योग महासंघाच्या बैठकीत बोलताना त्या म्हणाल्या की विकास दर वाढविण्यात येणार असला तरी त्यासाठी महागाई वाढू दिली जाणार नाही. सात वर्षात महागाई नियंत्रणात आहे आणि आगामी काळातही ती नियंत्रणात राहील याची काळजी घेण्यात येईल. त्या म्हणाल्या की भारत सरकारने गेल्या सात वर्षात केलेल्या सुधारणांमुळे भारतातील परकीय गुंतवणूक वाढली आहे.
गेल्या वर्षी झालेली गुंतवणूक 37 टक्क्यांनी वाढली आहे. भारताकडे 620 अब्ज डॉलरचा परकीय चलन साठा आहे. जनतेची बचत वाढत आहे आणि शेअर बाजाराकडे वळत आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये अर्थव्यवस्था वेगाने वाढणार असल्याचे सर्व संकेत मिळत असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.
केंद्र सरकारने टीका होऊनही शेतीक्षेत्रात आणि कामगार क्षेत्रात सुधारणा केल्या आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम आगामी काळात दिसून येतील. सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे असे त्या म्हणाल्या.