शेअर बाजार निर्देशांकात नफेखोरीमुळे झाली घट
मुंबई, दि. 24 – अमेरिका- चीन व्यापार युद्ध निवळत चालले आहे. त्याचबरोबर भारत -अमेरिकेदरम्यान व्यापार करार बोलणी सुरू झाली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात शेअर बाजाराचे निर्देशांक बर्याच प्रमाणात वाढले आहेत. अशातच काही गुंतवणूकदारांनी नफेखोरी करून नफा काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सात दिवसानंतर शेअर बाजाराच्या निर्देशांकात घट झाली.
हिंदुस्तान युनिलिव्हर या ग्राहक वस्तू निर्माण करणार्या कंपनीचा ताळेबंद फारसा चमकदार निघाला नाही. जागतिक बाजारातही कमी -अधिक प्रमाणात नफेखोरीचेे वातावरण होते. यामुळे गुंतवणूकदारांनी आयसीआयसीआय बँक, एअरटेल या ब्लूचिप कंपन्यांच्या शेअरची बर्याच प्रमाणात विक्री करून नफा काढून घेतला.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 315 अंकांनी कमी होऊन 79,801 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 82 अंकांनी म्हणजे 0.34 टक्क्यांनी कमी होऊन 24,246 अंकावर बंद झाला. गेल्या सात दिवसात सेन्सेक्स 6,269 अंकांनी म्हणजे 8.48 टक्क्यांनी तर निफ्टी 1,929 अंकांनी म्हणजे 8.61 टक्क्यांनी वाढला होता.
इटरनल, महिंद्रा, एचसीएल टेक्नॉलॉजी, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक, टीसीएस, बजाज फायनान्स या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. तर इंडसइंड बँक, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, टायटन, एशियन पेंट्स या कंपन्यांच्या शेअरचे भाव तेजीत होते.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरोधात मावळ भूमिका घेतली असली तरी त्यांच्या भूमिकेत सातत्य नसते. त्यामुळे गुंतवणूकदार सावध आहेत. ट्रम्प यांनी फेडरल रिझर्वचे अध्यक्ष जेरोम पाववेल यांच्याबाबत पुन्हा नकारात्मक वक्तव्य केले आहे. त्यामुळे जागतिक बाजारातही गुरुवारी मंद वातावरण होते.
ग्राहक वस्तू क्षेत्राबाबत चिंता
जागतिक आर्थिक परिस्थिती खराब आहे. याचा नकारात्मक परिणाम भारतीय बाजारात होऊ शकतो असे समजले जात असतानाच ग्राहक वस्तू क्षेत्रातील कंपन्यांनी कमी नफा असलेले ताळेबंद जाहीर केले आहेत. यामुळे गुंतवणूकदारात चिंतचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र काही विश्लेषकांनी सांगितले की ही परिस्थिती लवकरात सुधारण्याची शक्यता आहे. कारण रिझर्व बँकेने व्याजदरात कपात केलेली आहे.
युरोपियन शेअर बाजाराचे निर्देशांक कमी पातळीवर होते. दक्षिण कोरिया, हाँगकाँग मधील शेअर बाजाराचे निर्देशांक कमी होते. तर चीन आणि जपानचे शेअर बाजार निर्देशांक वाढले होते. काल अमेरिकन शेअर बाजाराचे निर्देशांक अडीच टक्क्यापर्यंत वाढले होते. अमेरिकेचा व्यापार करार जोपर्यंत डझनभर देशारोबर होत नाही तोपर्यंत जागतिक शेअर बाजारात अस्थिर परिस्थिती राहण्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली.
परदेशी गुंतवणूकदारांकडून खरेदी
भारतीय शेअर बाजाराच्या दृष्टिकोनातून जमिनीची बाब म्हणजे सध्या परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात खरेदी करीत आहेत. या गुंतवणूकदारांनी गेल्या पंधरवड्यात डॉलर कमकुवत झाल्यामुळे खरेदी वाढविली आहे. बुधवारी या गुंतवणूकदारानी भारतीय शेअर बाजारात 3,332 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. यामुळे या आठवड्यात निर्देशांक वाढण्यास मदत झाली आहे.
0000000000000
पाकिस्तानच्या शेअर बाजाराचे निर्देशांक कोसळले
भारताबरोबर वाढलेल्या तणावाचा परिणाम
इस्लामाबाद, दि. 24 – पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आल्यामुळे पाकिस्तानचा विकासदर कोसळणार असल्याचे भाकीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने केले असतानाच भारत पाकिस्तान दरम्यांचा तणाव वाढला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या शेअर बाजाराचे निर्देशांक गुरुवारी कोसळले. कराची शेअर बाजाराचा निर्देशांक 2,100 अंकांनी म्हणजे 1.85 टक्क्यांनी कोसळला.
दहशतवादाच्या पहलगाम मधील हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तान विरोधात अनेक उपाय योजना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तानला होणार्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार असल्यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
त्याचबरोबर पाकिस्तानही भारताविरोधात काही उपाय योजना करण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत या दोन्ही देशांचे लक्ष अर्थकारणावरून विचलित होणार आहेत. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थावर होण्याची शक्यता असल्यामुळे गुंतवणूकदार विक्री करीत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.
पाकिस्तानने भारताविरोधातील आपली भूमिका अधिक प्रखर करत जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. भारताने जमिनीवरून हवेत मारा करणार्या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये जाहीर सभेत प्रत्येक दहशतवाद्याला ओळखून शिक्षा केली जाईल असे स्पष्ट केले आहे.
यामुळे पाकिस्तानच्या शेअर बाजारात सकाळपासूनच विक्रीचे वातावरण होते. ते बाजार बंद होईपर्यंत कायम राहिले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानचा विकास दर अंदाज कमी करून तो केवळ 2.6% केला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानमधील महागाई वाढवली 5.1% वर जाणार असल्याचे सांगितले आहे. या घडामोडीचाही पाकिस्तानी शेअर बाजारावर परिणाम झाला असल्याचे सांगण्यात आले.
000000000
गुंतवणूकदारांनी आपल्याला समजतात असेच व्यवहार करावे
बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक सुंदररामन राममूर्ती यांचा सल्ला
कोलकत्ता, दि. 24 – गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीसंदर्भातील नव्या बाबीची निरंतर माहिती घेत राहणे आवश्यक असते. त्याचबरोबर आपण घेतलेल्या निर्णयाच्या परिणामाची माहिती त्यांना अपेक्षित असते, असे मुंबई शेअर बाजाराचे व्यवस्थापकीय संचालक सुंदररामन राममूर्ती यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, केवळ नियंत्रणे गुंतवणूकदारांना वाचू शकणार नाहीत, जोपर्यंत गुंतवणूकदार गुंतवणूक करताना पुरेशी काळजी घेणार नाहीत.
तुम्हाला समजेल अशाच वित्तीय साधनाचे व्यवहार करा. तरच तुम्ही कशा प्रकारचे व्यवहार करत आहात, त्याचे काय नकारात्मक आणि सकारात्मक परिणाम होणार आहेत हे तुम्हाला समजेल. जर तुम्ही न समजणार्या बाबी केल्यात तर मात्र तुमच्यासाठी प्रश्न निर्माण होईल, असे राममूर्ती यांनी गुंतवणूकदारांना बजावले.
सध्या विविध बाजाराबाबत माहिती वेगाने प्रसारित होत असते. त्याचबरोबर जागतिक एकीकरणामुळे विविध घटनाक्रमाचे बाजारावर परिणाम होत असतात. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी निरंतर सावध राहून आपल्या गुंतवणुकीवर परिणाम करणार्या बाबीची माहिती मिळविले पाहिजे.
गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर बर्यापैकी नफा होतो, तेव्हा गुंतवणूकदार हे आपल्या स्वतःच्या हुशारीचे फळ असल्याचे सांगतात. मात्र जेव्हा या गुंतवणूकदारांनी घेतलेल्या निर्णयामुळे तोटा होतो, तेव्हा मात्र बाजार नियंत्रकाच्या डोक्यावर त्याचे खापर फोडले जाते. असा प्रकार वारंवार घडतो. गुंतवणूकदारानी स्वतःच्या निर्णयाची जबाबदारी स्वतः घेतली तर चुका टळू शकतील असे त्यांनी सांगितले. जर तुम्ही स्वतःचा बचाव केला नाही तर कोणताही नियम किंवा नियंत्रण तुम्हाला वाचवू शकणार नाही.
कोलकत्ता चेंबर ऑफ कॉमर्सने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना रिटेल गुंतवणूकदारांना सल्ला देताना त्यांनी सांगितले की, रिटेल गुंतवणूकदाराकडे शेअर बाजाराची जास्त ज्ञान नसते, त्यामुळे या गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक करणे योग्य ठरते. त्यातही थेमेटीक फंडाऐवजी लार्ज कॅप फंडाचा पर्याय निवडणे कमी जोखीमीचे असते. महिला आणि युवकांनी शक्य तितक्या लवकर गुंतवणूक करण्याचे कौशल्य शिकण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तरच आपल्या समृद्धीत वाढ होते असे ते म्हणाले.
ऐकिव माहितीवर निर्णय घेऊ नका
ऐकिव माहितीवर गुंतवणुकीसारखा महत्त्वाचा निर्णय घेणे पूर्णतः चुकीचे आहे. मात्र आपल्याकडे असा प्रकार सर्रास होतो असे राममूर्ती यांनी सांगितले आणि याबद्दल असमाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, तुम्ही भाजी घेताना तपशीलात चौकशी करून पारखूनभाजी घेता. मात्र तुम्ही जेव्हा कष्टाने कमविलेला पैसा गुंतवण्याचा निर्णय घेता तेव्हा तुम्ही ऐकिव माहितीवर त्यासंदर्भात निर्णय कसे काय घेऊ शकता. ही आपल्या स्वभावातील चूक आपण दुरुस्ती केली तरच आपली गुंतवणूक सुरक्षित राहण्याची शक्यता वाढते.
00000000
लघुु उद्योग वाढणे आवश्यक
महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापकीय संचालक निधू सक्सेना यांची माहीती
पुणे, दि. 24 – प्रधानमंत्री मुद्रा योजनेला 10 वर्षे पूर्ण होत असून बँक ऑफ महाराष्ट्र या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला आहे. 2015 साली सुरू झाल्यापासून, ही योजना देशभरातील सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना आर्थिक मदत देऊन त्यांना सक्षम बनवण्यात मोलाची भूमिका बजावत आहे, आणि बँक ऑफ महाराष्ट्र त्यात महत्त्वाचा भाग ठरली आहे.
या 10 वर्षांच्या यशस्वी वाटचाली निमित्त बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निधू सक्सेना म्हणाले, भारत जर 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करत असेल, तर सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना सक्षम करणे ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. मुद्रा योजना ही केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नाही, तर ती अशा लोकांसाठी आशेचा किरण आहे ज्यांच्याकडे कल्पना आहेत पण भांडवल नाही. बँक ऑफ महाराष्ट्रला या मिशनचा भाग होण्याचा अभिमान आहे, कारण ही योजना खर्या अर्थाने ’विकसित भारत’ घडवण्यासाठी खालच्या स्तरावरून उद्योजक घडवत आहे.
2015 पासून आजपर्यंत, प्रधानमंत्री मुद्रा योजनेद्वारे देशभरात 52 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना एकूण 33 लाख कोटींचे कर्ज देण्यात आले आहे. फक्त आर्थिक वर्ष 2024-25 मध्येच बँक ऑफ महाराष्ट्र आणि सहप्रायोजित महाराष्ट्र ग्रामीण बँकेने 10 लाखांहून अधिक सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना 5,550 कोटींचे मुद्रा कर्ज मंजूर केले आहे. बँकेचा एकूण मुद्रा पोर्टफोलिओ 8,066 कोटी आहे.
बँकेने ग्रामीण आणि निमशहरी भागावर लक्ष केंद्रीत केले असून शिशु, किशोर, तरुण आणि तरुण प्लस अशा सर्व गटांमध्ये कर्ज वितरण वाढवले आहे. त्यामुळे फक्त या आर्थिक वर्षातच मुद्रा कर्जामध्ये 20% नी वाढ झाली आहे.
————–
हिंदुस्तान युनिलिव्हरच्या नफ्यावर परिपरिणा
नवी दिल्ली, दि. 24 – ग्राहक वस्तू क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडला चौथ्या तिमाही झालेला नफा 3.3 टक्क्यांनी कमी होऊन 2,475 कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत कंपनीला 2,561 कोटी रुपयाचा नफा झाला होता.
या तिमाहीत कंपनीचा महसूल 2.68 टक्क्यांनी वाढून 15,416 कोटी रुपये इतका झाला आहे. सरलेल्या पूर्ण वर्षांमध्ये कंपनीचा नफा 3.78 टक्क्यांनी वाढून 10,671 कोटी रुपये इतका झाला आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रोहित जावा यांनी सांगितले की, खराब परिस्थितीतही कंपनीने चांगली कामगिरी केली असून या क्षेत्रात आपले नेतृत्व कायम ठेवले आहे. या ताळेबंदानंतर कंपनीच्या शेअरचा भाव 2.81 टक्क्यांनी कमी होऊन 2,354 रुपये प्रति शेअर या पातळीवर गेला होता.
किर्लोस्कर न्यूमॅटिक
किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनीने जाहीर केलेल्या ताळेबंदानुसार या कंपनीला चौथ्या तिमाहीत झालेला नफा वार्षिक पातळीवर पस्तीस टक्क्यांनी वाढून 81 कोटी रुपये इतका झाला आहे. सरलेल्या वर्षात कंपनीचा नफा वाढवून 211 कोटी रुपये इतका झाला आहे. त्या अगोदरच्या वर्षात कंपनीला 133 कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनीने भागधारकांना सरलेल्या वर्षासाठी एकूण पाचशे टक्के इतका लाभांश जाहीर केला आहे. हा कंपनीच्या इतिहासातील सर्वात जास्त लाभांश आहे.
एसबीआय लाइफ
एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनीने जाहीर केलेल्या ताळेबंदानुसार या कंपनीला चौथ्या तिमाहीत झालेला नफा किंचित वाढून 813 कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत कंपनीला 811 कोटी रुपयांचा नफा झाला होता. या तिमाहीत कंपनीचे प्रीमियम उत्पन्न कमी होऊन 23,861 कोटी रुपये झाले आहे. जे की गेल्या वर्षी या तिमहीत 25,116 कोटी रुपये होते. सरलेल्या पूर्ण वर्षांमध्ये कंपनीचा नफा 27 टक्क्यांनी वाढून 2,413 कोटी रुपये झाला आहे.
00000
काश्मीरच्या पर्यटन व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता
अगोदर केलेले बुकिंग रद्द होण्याचे प्रमाण वाढणार
नवी दिल्ली, दि. 24 – काश्मीर मध्ये झालेल्या हिंसाचारामुळे काश्मीर मधील पर्यटन व्यवसायावर याचा लघु पल्ल्यात तरी नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ज्या पर्यटकांनी अगोदरच प्रवासाचे आणि निवासाचे बुकिंग केले आहे ते बुकिंग रद्द करण्यासाठी ग्राहक प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.
ही शक्यता ध्यानात घेऊन पर्यटन कंपन्या या विमान कंपन्या आणि हॉटेल कंपन्याबरोबर चर्चा करीत असल्याचे सांगण्यात आले. काश्मीरमध्ये घडलेली नकारात्मक परिस्थिती पाहता ज्या पर्यटकांनी अगोदर बुकिंग केले आहे त्यांना बुकिंग कॅन्सल करताना शुल्क लागू नये तसेच तारीख बदलताना शुल्क लागू नये यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत असे बर्याच पर्यटन कंपन्यांनी नमूद केले.
क्लिअर ट्रीप या कंपनीच्या मुख्य व्यवसाय अधिकारी मंजिरी सिंगल यांनी सांगितले की, ही घटना घडल्यानंतर विमानाचे बुकिंग रद्द करण्याची मागणी सात पटीने वाढली आहे. तर भविष्यातील पर्यटनाच्या बुकिंगचे प्रमाण 40% ने कमी झाले आहे.
मेक माय ट्रीपच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही ग्राहक आणि विमान कंपन्या व हॉटेल चालकांना कमीत कमी त्रास होईल अशा पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करीत आहोत. ज्यांच्या पर्यटनाच्या तारखा 30 एप्रिल पर्यंत आहेत अशा पर्यटकांचे बुकिंग विनाशुल्क कॅन्सल करण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करीत आहोत असे काही पर्यटन कंपन्यांनी स्पष्ट केले.
0000000
देशांतर्गत पोलाद उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोलाद उद्योगाला आवाहन
मुंबई, दि. 24 – भारताला पोलाद उत्पादनात स्वयंपूर्ण होण्याची गरज आहे. तरच भारतातील विविध उद्योग खर्या अर्थाने वेगाने वाढण्यास मदत होणार आहे. यासाठी देशातील पोलाद कंपन्यांनी भारताला पोलाद क्षेत्रात बळकट करण्याची गरज असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.
इंडिया स्टील परिषदेत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, पोलादाचे खनिज मिळविण्यासाठी भारत सरकार देशातील कंपन्यांच्या मदतीने इतर देशाबरोबर सहकार्य करणार आहे. त्याचबरोबर देशातील पोलाद खनिजाचा जास्तीत जास्त कार्यक्षम वापर करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पोलादाचा वापर विविध क्षेत्रात गरजेचा असतो. सर्व क्षेत्राचा विकास पोलादावर अवलंबून असतो. त्यामुळे भारताची पोलाद क्षमता वाढविण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे.
भारत सरकारने पायाभूत सुविधा क्षेत्रावर भर दिला आहे. रस्ते उभारले जात आहेत. रेल्वेचे विस्तारीकरण केले जात आहे. नवी विमानतळे उभारली जात आहेत. त्याचबरोबर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम माती घेण्यात आले आहे. या सर्वाला पोलादाची गरज आहे आणि आगामी काळात या घडामोडी वाढणार असल्यामुळे पोलादाची आवश्यकता वाढणार असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले.
भारतात तयार केलेल्या पोलादाचा चांद्रयान आणि विक्रांत जहाजात वापर करण्यात आलेला आहे. अशा प्रकारचे आधुनिक पोलाद आपल्याला अधिक प्रमाणात तयार करावे लागणार आहे. आपण पोलादाची शून्य आयात आणि जास्तीत जास्त निर्यात करण्याचा संकल्प केल्यानंतर आपण या क्षेत्रात वेगाने स्वावलंबी होऊ शकू असे मोदी यांनी स्पष्ट केले.
दरडोई वापर कमी
पोलादा बरोबरच कोळसा, निकेल आणि मॅग्नीज या धातूच्या कच्च्या मालाची भारताला गरज आहे. त्यासाठी विविध देशाबरोबर सहकार्य करार करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सध्या भारताची पोलादन उत्पादन क्षमता 179 दशलक्ष टन आहे. ती 2030 पर्यंत 300 दशलक्ष टन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सध्या भारतात दरडोई पोलाद वापर 98 किलो आहे तो 2030 पर्यंत 160 किलो करण्याचा संकल्प उद्योगाने करावा.
00000
भारत पाकिस्तान दरम्यानचा व्यापार शून्यावर येणार
नवी दिल्ली, दि. 24 – भारत पाकिस्तान दरम्यानचा व्यापार अगोदरच कमी होता. आता भारत -पाकिस्तान तणाव वाढला आहे. त्यामुळे भारताने पाकिस्तानसोबतचा व्यापार पूर्णपणे बंद केला आहे. थेट व्यापाराबरोबरच तिसर्या पार्टीच्या माध्यमातून होणार्या व्यापारावर भारताने बंधन घातले आहे. यामुळे या दोन्ही देशादरम्यानचा व्यापार आता शून्यावर येणार असल्याचे निर्यातदाराच्या संघटनेने म्हटले आहे.
भारत पाकिस्तान दरम्यानचा व्यापार काही प्रमाणात अट्टारी येथून होत होता. हे ठाणे आता पूर्णपणे बंद करण्यात आल्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानंतर पाकिस्ताननेही भारतासोबतचा व्यापार पूर्णपणे बंद करण्याची घोषणा केली आहे. या संघटनेचे अध्यक्ष एस सी रल्हन यांनी सांगितले की, भारताच्या एकूण परकीय व्यापारामध्ये पाकिस्तानला होणारा व्यापार केवळ 0.06 टक्के इतका होता. तो आता 0% वर येणार आहे.
———–
53 लाख वाहनांची निर्यात
नवी दिल्ली, दि. 24 – भारतातील वाहन क्षेत्र वेगाने वाढत असून आता निर्यातही वाढू लागली आहे. 2024-25 मध्ये भारतातील वाहन उद्योगाने केलेली निर्यात 19 टक्क्यांनी वाढून 53 लाख युनिट झाली असल्याची माहिती सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स या संघटनेने जारी केली आहे.
ज्या वाहनांची जास्त प्रमाणात निर्यात झाली त्यामध्ये प्रवासी वाहन, दुचाकी वाहन, व्यावसायिक वाहन, इत्यादीचा समावेश आहे. 2023- 24 मध्ये 45 लाख वाहनांची निर्यात झाली होती. या संघटनेने जारी केलेल्या माहितीनुसार प्रवासी वाहनांची निर्यात 15 टक्क्यांनी वाढून 7.7 लाख युनिट झाली आहे. जी की गेल्या वर्षी 6.7 लाख युनिट इतकी होती. जगातील बहुतांश वाहन कंपन्यांचे उत्पादन प्रकल्प भारतामध्ये आहेत. त्यामुळे या कंपन्या भारतातील बाजारपेठेबरोबरच जागतिक बाजारपेठेसाठी वाहनांची निर्मिती करत आहेत. त्यामुळे या क्षेत्रातून निर्यात वाढत असल्याचे सांगण्यात आले.
सरलेल्या वर्षात दुचाकीची विक्री तब्बल 21 टक्क्यांनी वाढून 41.98 लाख युनिट इतकी झाली आहे. जीकी त्या अगोदरच्या वर्षांमध्ये 34.58 लाख युनिटी होतर. अफ्रीका लॅटिन अमेरिकेतील आर्थिक परिस्थिती स्थिर आहे. त्यामुळे भारतातून मागणी वाढली आहे.
तीन चाकी वाहनांची निर्यात दोन टक्क्यांनी वाढवून 3.1 लाख युनिट झाली. व्यवसायिक वाहनांची विक्री 23 टक्क्यांनी वाढून 65 हजारावर गेली आहे. या संघटनेचे अध्यक्ष शैलेश चंद्र यांनी सांगितले की, भारतातील वाहनांचा दर्जा आता जागतिक पातळीवरचा होत आहे, त्यामुळे भारतातील वाहनांची नियात वेगाने वाढण्यास मदत होत आहे. प्रवासी वाहन, दुचाकीचे जागतिक बाजारपेठेला आकर्षण वाढले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
————–
संत्र्याचे उत्पादन वाढविण्यास वाव
नितीन गडकरी संत्रा उत्पादक शेतकर्यांना आवाहन
नागपूर, दि. 24 – विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकर्यांनी व्यावसायिक दृष्टिकोन बाळगून गुणवत्तापूर्ण संत्रा उत्पादन करून त्याचे विपणन आधुनिक तंत्रज्ञानाने केल्यास त्यांची आर्थिक भरभराट होईल. याकरिता इतर शेतकर्यांच्या यशोगाथा तसेच नवनवीन प्रयोग यांची माहिती घेऊन संत्र्याचे एकरी उत्पादन 20 टनाच्या वर जाईल असा संकल्प करण्याचे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकर्यांना आज नागपूर येथे केले.
ऍग्रोव्हिजन फाऊंडेशनतर्फे वनामती येथे आयोजित संत्रा उत्पादक शेतकर्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी संबोधित करताना ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था नागपूरचे संचालक डॉ. दिलीप घोष उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना गडकरी यांनी सांगितलं की उत्तम बीज हे फळाच्या वाढीसाठी महत्त्वाचं असून रोपवाटिकां मधून संत्र्याची रोपे ही रोगमुक्त तसेच जास्त उत्पादन देणारी असली पाहिजे यासाठी – रोपवाटिकांना अद्यावत करण्याचे आवाहन त्यांनी नर्सरी धारकांना केले. नर्सरी अॅक्ट मध्ये सुधारणा करण्याचे तसेच शासकीय माध्यमातून अशा रोपवाटीकांना अनुदान देखील उपलब्ध करण्याचे धोरण आखण्याचे त्यांनी ऍग्रो व्हिजनच्या फाउंडेशनच्या पदाधिकार्यांना सांगितले. ड्रोन द्वारे खत – कीटकनाशक फवारणी, सेंद्रिय खताचा वापर यामुळे शेतकर्यांना त्यांच्या उत्पादनाच्या वाढीमध्ये होईल.
जमीन पाणी तसेच खताचे नियोजन करून उत्पादन खर्च देखील कमी करण्याकडे शेतकर्यांनी लक्ष दिले पाहिजे. यांत्रिक उपकरणांसाठी शेतकरी उत्पादक संस्थांच्या माध्यमातून ते कसे कमी पैशात उपलब्ध होतील यासाठी देखील शेतकरी उत्पादक संघटनांनी पुढाकार घेतला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
या कार्यशाळेमध्ये तज्ञांनी आपल्या सादरीकरणाद्वारे संत्रा उत्पादकांसाठी बियाण्यांची निवड, फळ लागवड या विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.