नवी दिल्ली – रिझर्व्ह बॅंकेने सलग तीन वेळा व्याजदरात केलेली कपात स्वागतार्ह आहे मात्र केवळ व्याजदर कपात करून भागणार नाही त्यासाठी बॅंका आणि बिगर बॅंकिंग वित्तीय संस्थातील भांडवल सुलभता वाढविण्याची गरज आहे. तरच मंदावलेली उत्पादकता वाढू शकेल असे उद्योजकांच्या संघटनांनी म्हटले आहे.
पतधोरणावर या संघटनांनी समाधान व्यक्त केले. फिक्किया संस्थेचे अध्यक्ष संदीप सोमानी म्हणाले की, महागाई कमी असल्यामुळे आणखी एका व्याजदर कपातीला वाव आहे. त्याचबरोबर इतर बॅंकांनी लवकर व्याजदरात कपात करावी यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. सध्या विकासदर पाच वर्षाच्या नीचांकी पातळीवर गेला आहे. त्याचबरोबर चालू आर्थिक वर्षाचा विकासदरही रिझर्व्ह बॅंकेने कमी करून सात टक्के केला आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
व्याजदर कपातीची घोषणा करतानाच आगामी काळातही परिस्थिती पाहून व्याजदर कपातीच्या शक्यतेवर विचार करणार असल्याचे सांगितल्याबद्दल असोचेम या संघटनेचे अध्यक्ष बी. के. गोयंका यांनी समाधान व्यक्त केले.